Tuesday, December 14, 2010

किल्ले जयगड




रत्नागिरी जिल्ह्यातील दंतूर असलेला सागरकिनारा पर्यटकांना नेहमीच आर्षीत करीत असतो रत्नागिरी बरोबर पावस आणि गणपतीपुळे ही धार्मिक स्थळेही नेहेमीच भावीकांसाठी श्रद्धास्थाने ठरली आहेत. गणपतीपुळे च्या उत्तरेला जयगडाचा किल्ला हा उत्तम असूनही मोजकेच पर्यटक इकडे फिरकतात.

मुंबई-पणजी महामार्गावरील संगमेश्वर हे गाव ओलांडल्यावर घाटाच्या माथ्यावर निवळी फाटा लागतो. येथून जयगडाला अथवा गणपतीपुळे येथे जाण्यासाठी गाडीमार्ग आहे. तसेच रत्नागिरी कडून गणपतीपुळे मालगुंड मार्गेही जयगड गाठता येतो.जयगडाचा किल्ला पठारावर आहे. हे पठार समुद्रात काहीसे आत घुसलेले असल्यामुळे याच्या तिन्ही बाजुंना सागराने घेरलेले आहे. येथेच शाल्मीही नदी सागराला येवून मिळते. त्यामुळे नैसर्गिक आणि सुरक्षीत असे बंदर म्हणून जयगड पुर्वीपासून प्रसिद्ध आहे.

जयगड हे गाव किल्ल्याच्या दक्षिणेकडील उतारावर वसलेले आहे. जयगड हे गाव सध्या जिंदाल औष्णिक प्रकल्पामुळे बरेच प्रसिद्धीला आले आहे. जयगड गावात जाणार्‍या फाटय़ापासून आपण पाच मिनिटांमधे जयगडाचा बालेकिल्ल्याच्या प्रवेशव्दाराजवळ येवून पोहोचतो.

सध्या बालेकिल्ल्याचा संपूर्ण परिसर तारेची जाळी लावून संरक्षीत केलेला आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर सात-आठ फूट खोलीचा खंदक आहे. हा कातळकोरीव खंदक असून तो पाण्याने भरण्यासाठी बनविलेला नाही. त्यामुळे तो कायमच कोरडा असतो. शत्रू तटाला येवून भिडू नये म्हणून हा खंदक बालेकिल्ल्या भोवती खोदलेला आहे. प्रवेशद्वाराच्या डावीकडून तटबंदीला वळला घालून गेलेला खंदक पार खालपर्यंत नेलेले आहे. उजवीकडील बाजुला खंदकाला एक प्रवेशद्वारही केलेले आहे. खंदकाला प्रवेशद्वार असलेली ही रचना वेगळ्या प्रकारची आहे.

दोन बुरुजांमधे लपवलेला दरवाजा आहे. प्रवेशद्वारावर पुर्वी नगारखाना असावा अशी त्याची रचना आहे. काही वर्षापुर्वीपर्यंत या नगारखान्याच्या जागेत एक उत्तम विश्रामगृहही बांधलेले होते. सध्या ते बंद केल्यामुळे पूर्णपणे मोडकळीस आलेले आहे.
दरवाजावर कमलपुष्पे कोरलेली आहेत. दरवाजामधे पहारेकर्‍यांच्या देवडय़ा आहेत. आत आल्यावर तटबंदीवर जाण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग दिसतो. तटबंदीवर जाण्यासाठी जागोजाग असे मार्ग केलेले आहेत तटबंदीच्या मधल्या जागेत एक तीन मजली उंच इमारत आपले लक्ष वेधून घेते. या भव्य इमारतीचे छत नष्ट झालेले आहे. याला वाडा अथवा राजवाडा असेही म्हणतात. काहीजण याला कान्होजी आंग्रेयांचा वाडा असेही म्हणतात.

या वाडय़ा शेजारीच पाण्याचा मोठी विहीर आहे. मात्र तो झाडी झुडुपांनी पुर्णपणे झाकला गेला आहे. बाजुलाच गणपतीचे मंदिर आहे. गणपती मंदिरासमोर लहानशी दीपमाळ आहे. दीपमाळे जवळच जयबाचे स्मारक आहे. तटाला लागूनच असलेले हे स्मारक जयबाच्या बलीदानाची स्मृती म्हणून उभारलेले आहे. जयगडाची बांधणी करताना त्याचा तट वारंवार ढासळत होता. त्याचे बांधकाम पक्के व्हावे म्हणून नरबळी द्यावा लागेल अशी लोकांची समजूत होती तटबंदी साठी जयबा तयार झाला. त्याला तटबंदीमधे जीवंत चिणून तटाचे बांधकाम पुर्ण करण्यात आले. जयबाच्या या त्यागपुर्ण बलीदानामुळे तटबंदी उभी राहीली. म्हणून गडाचे नाव जयगड ठेवण्यात आले अशी कथा प्रसिध्द आहे.

तटबंदीवरुन पुर्ण गडफेटी करता येते. गडावरुन समुद्राकडील देखवा उत्तम दिसतो. तटबंदीमधील बुरुज गोलाकार असून त्यामधे जागोजाग मार्‍याच्या जागा केलेल्या आहेत. बुरुजावर तोफांसाठी केलेली सोय दिसते मात्र तोफां आढळत नाहीत. गडफेरी करण्यासाठी तास दीडतासाचा अवधी पुरेसा आहे. दरवाजाच्या बाहेरील खंदकामधील दरवाजातून आत गेल्यावर खंदकाच्या टोकाकडील भागात पायर्‍या आहेत. येथून खालच्या भागात जाता येते. खली जांभ्या दगडा कोरलेली गुहा आहे. यात मोहमाया देवीचे मंदिर असून ही ग्रामस्थ असलेल्या घाटगे यांची कुलदेवता आहे. समुद्रकाठापर्यंत उतरल्यावर एक लहान दरवाजा तसेच बुरुज ही पहायला मिळतात. समुद्राकाठचा पडकोटाचा भाग पाहून आपण डांबरी सडकेने धक्क्याकडे येवू शकतो व येथून आपण करहाटेश्वर मंदिराकडेही जावू शकतो.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive