Friday, January 6, 2012

पैसे दुप्पट करणा-या स्कीमना भुलू नका



पोंझी स्कीमच्या गाजरांना भुलू नका




१९२० साली अमेरिकेमध्ये चार्ल्स पोंझी नावाच्या व्यक्तीने एक योजना जाहीर केली. त्यामध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना ४५ दिवसांमध्ये ५० टक्के आणि ९० दिवसांमध्ये १०० टक्के परताव्याची हमी दिली होती. योजना जाहीर करणारी कंपनी पोस्टल रिप्लाय कूपन्समध्ये ट्रेडिंग करणार, असे सांगितले गेले. जिथे या कूपन्सचा भाव कमी असेल तिथून खरेदी आणि जिथे जास्त असेल तिथे विक्री - ज्याला आबिर्ट्रॅज म्हणतात - असे त्या ट्रेडिंगचे स्वरूप होते. ९० दिवसांमध्ये पैसे दुप्पट करण्याच्या लालसेपोटी भरपूर लोकांनी यात पैसे गुंतवले आणि एके दिवशी हा फुगा फुटला! पोंझी आणि कंपनी नवीन लोकांच्या भांडवलामधूनच जुन्या लोकांचे व्याज देत होती. एके दिवशी हा घोटाळा लक्षात आला, कूपन्सच्या भावांवर निर्बंध लादले गेले आणि पैसे गुंतवणाऱ्यांंच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. चार्ल्स पोंझीला अटक झाली आणि हे प्रकरण संपुष्टात आले...


पोंझी स्कीम अशा असतात...


तेव्हापासून अशा पद्धतीच्या घोटाळ्यांना 'पोंझी स्कीम' म्हटले जाऊ लागले. या पद्धतीचे घोटाळे आजही चालू आहेत. २०११मध्ये भारतात अशा घोटाळ्यांचे बरेच प्रकार घडले. या सर्व घोटाळ्यांचा अभ्यास केल्यावर लक्षात येते की यामध्ये लोकांच्या भावनांशी खेळ केला जातो. सामान्य माणसाचे मनोव्यापार बारकाईने अभ्यासून हे प्रकार केले जातात. भारतात मोठ्या प्रमाणात असलेल्या मध्यमवगीर्यांना लक्ष्य बनवले जाते. मध्यमवगीर्य म्हणजे ज्याचा महिन्याच्या एक तारखेला मिळालेला पगार २० तारखेच्या आसपास संपत आलेला असतो आणि त्याचा ताण त्याच्या मनावर कायम असतो. त्याच्या मनात कुठेतरी आपल्याला मोठे घबाड मिळावे, आपल्याला प्रत्येक गोष्ट घेता यायला हवी, अशी स्वप्ने तरळत असतात. शेअर बाजारात अमुक एक रंकाचा राजा झाला, अशा दंतकथा तो ऐकतो. त्यात एखादी अतिशय फायदेशीर योजना त्याला समजते. 'एक लाख गुंतवा, दर महिना दहा टक्के घ्या' किंवा 'मेंबर व्हा, अजून मेंबर जोडा आणि कमिशन कमवा' या स्वरूपाच्या या योजना असतात. लोक त्याला भुलतात आणि कुठूनतरी पैसे उभे करून या योजनेत गुंतवतात. काही दिवसांनी बातमी येते, की संबंधित कंपनी आपला गाशा गुंडाळून फरार झाली. हळहळ करण्याव्यतिरिक्त या सामान्य गुंतवणूकदारांच्या हातात काहीच उरत नाही.


व्याजाचे गौडबंगाल


पोंझी स्कीम्समध्ये लोकांच्या रकमेमधूनच व्याज दिले जात असल्याचे एक उदाहरण : स्कीम ऑपरेटर योजना जाहीर करतात. अमुक रक्कम आमच्याकडे गुंतवा, आम्ही त्यावर दरमहा १० टक्के व्याज देऊ, असे सांगतात. सुरुवातीला समजा दहा लोकांनी प्रत्येकी एक लाख रु. दिले. योजना सुरू झाल्यावर पहिल्या महिन्यात प्रत्येकाला १० टक्के म्हणजे, दहा-दहा हजार व्याज मिळते. गुंतवणूकदार खूश होतात.


प्रत्येकजण या योजनेची माहिती आपापल्या ओळखीच्यांना देतो. दहा माणसांकरवी प्रत्येकी सरासरी पाच लोक अजून पैसे या योजनेत घालतात. म्हणजे, नवीन ५० लोकांनी या योजनेत पैसे गुंतवले. आता ६० लोकांचे पैसे कंपनीकडे आले. दुसऱ्या महिन्यात परत सर्वांना १० टक्के व्याज दिले जाते. मग ते त्यांच्या ओळखीचे पाच लोक आणतात. पण त्यांना हे कळत नाही, की कंपनीकडे एकूण ६० लाख रु. जमल्यावर मगच ७ लाख रु. व्याजापोटी वाटलेत. दोन महिने सलग व्याज मिळाले की पैसे गुंतवणाऱ्यांची संख्यासुद्धा वाढत जाते आणि ही संख्यावाढ मल्टिपल्समध्ये असल्यामुळे कंपनीकडे पैसे येण्याचे प्रमाण पैसे दिले जाण्यापेक्षा खूप जास्त असते.


गुंतवण्यास इच्छुक लोक संपले की ही वाढ थांबते. नवीन भरती थांबली की ही कंपनी दरमहा तितके व्याज देण्यास असमर्थ बनते आणि हा घोटाळा उघडकीस येतो. लुटले गेलेले गुंतवणूकदार कोर्टकचेऱ्या व पोलिस अश्या चक्रात अडकतात. गुंतवलेले पैसे परत मिळण्याची शक्यता दुमिर्ळ असते. यातसुद्धा


अशा योजना चालवणाऱ्या ऑपरेटरनी दरवेळी लोकांची फसवणूक करण्याच्या उद्देशांनेच योजना काढली असेल, असे नाही. खास करून शेअर माकेर्टमध्ये ज्या योजना निघतात - आम्ही तुमच्या वतीने ट्रेडिंग करतो आणि दरमहा तुम्हाला ५ टक्के, १० टक्के देतो - त्यामध्ये ती योजना चालू करणाराही भयंकर नुकसानीत जातो. फक्त तो ते आधी ओळखू शकत नाही. अशा वेळी गुंतवणुकदारांना निश्चित परताव्याची हमी दिली असेल तर पैसे देणार कुठून? मग अजून नवे बकरे आणा, आणि त्यांनी गुंतवलेल्या पैशांमधून जुन्या लोकांना परतावा द्या, हे प्रकार सुरू होतात.


फसवणूक कशी टाळावी?


आपली फसवणूक होऊ न देणे आपल्याच हातात आहे. विनाकष्ट पैसे मिळतील, असा कोणताच व्यवसाय नसावा. २०११ साली जे चार-पाच घोटाळे झाले, त्यात एक गोष्ट सर्वत्र दिसून आली. जास्त व्याज किंवा परताव्याच्या आमिषाने एकामागून एक अनेकांनी या योजनांमध्ये पैसे गुंतवले. यामध्ये 'शीप फॅक्टर', म्हणजे 'मेंढ्यांच्या कळपाचे तत्त्व' प्रभावीपणे वापरले गेले. मेंढ्यांच्या कळपामध्ये एक मेंढी जाईल त्याच दिशेने इतर मेंढ्या जाऊ लागतात, तसे घडले. काही योजनांमध्ये तुमच्यासारखे मेंबर्स जोडा, म्हणजे तुम्हाला अमुक कमिशन मिळेल, हे गाजर होते, तर काहींमध्ये एखाद्याला अमुक व्याज मिळाले, तर आता आपल्यालाही मिळेल, या आशेने लोकांनी पैसे गुंतवले. पण या पैसे गुंतवणाऱ्या लोकांनी हा विचार नाही केला की इतके व्याज देण्यासाठी कंपनीकडे पैसे येतात कुठून? आम्ही शेअर बाजारात ट्रेडिंग करून फायदा कमावतो, या कंपनीच्या सांगण्यावर लोकांनी डोळे झाकून पैसे दिले. याचे कारण म्हणजे, शेअर बाजाराबद्दल असलेले एक गूढ कुतूहल. शेअर बाजार म्हणजे अल्लाउद्दिनचा जादूचा दिवा नाही. इथे पैसे मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. कंपन्यांचा अभ्यास करावा लागतो, नुकसान थांबवण्यासाठीचे तंत्र-मंत्र वापरावे लागतात.


शेअर बाजारात किंवा इतर मार्गांनी कोणी दरमहा ५ टक्के, १० टक्के देऊ करत असेल तर सावध व्हा. अधिक व्याजाच्या अपेक्षेने पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या थोडी नसली, तरी ती फार जास्तसुद्धा नाही. कधी ना कधी हा फुगा फुटणार. त्यामुळे कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. लोभ बाजूला ठेवा आणि आपल्या कष्टाची कमाई वाचवा.


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive