Sunday, November 18, 2012

महाराष्ट्र बाळासाहेबांचे चिरंतन स्मरण करील - शरद पवार

राजकीय रणांगणात प्रतिस्पर्ध्यांच्या भूमिकेत भलेही सर्व ताकदीनिशी त्यांनी माझ्या राजकारणाला विरोध केला असेल , स्वत : रेखाटलेल्या व्यंगचित्रात आणि जाहीर सभांमधून ठाकरी शब्दात माझा समाचार घेतला असेल , मात्र व्यक्तिगत जीवनात बाळासाहेब ठाकरेंचा कौटुंबिक जिव्हाळा आणि स्नेह मला माझ्या कुटुंबियांना कायम लाभला , म्हणूनच आज मी दु : खी आहे . अत्यंत दिलदार अंत : करणाचा सच्चा मित्र मी आज गमावला आहे . यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर अवघा महाराष्ट्र त्यांच्या इतकेच चिरंतन स्मरण बाळासाहेब ठाकरेंचेही करील या विषयी माझ्या मनात शंका नाही .

बाळासाहेबांचा आणि माझा संबंध तसा शिवसेनेच्या जन्मापासून . गर्दीत उभे राहून शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या स्थापनेची पहिली सभा मी ऐकली . आम्हा दोघांचा परस्परांशी परिचय बी . के . देसाईंनी करून दिला . राजकारणाच्या धकाधकीत एकमेकांना विरोध करण्याचा प्रसंग अनेकदा आला मात्र व्यक्तिगत मैत्रीवर त्याचा प्रभाव बाळासाहेबांनी कधी पडू दिला नाही . सुप्रिया लहान असताना ' मातोश्री ' बंगल्यावर मीनाताई ठाकरेंच्या अंगाखांद्यावर खेळली . बाळासाहेबांची मुलेही तेव्हा लहानच होती . माझ्या पत्नीचे ठाकरे दाम्पत्याने कायम अगत्याने स्वागत केले . बाळासाहेबांच्या निधनाने उभय कुटुंबाचे जवळपास पंचेचाळीस वर्षांचे हे स्नेहबंध आज स्तब्ध झाले आहेत .

महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेबांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे अत्यंत गरीब कुटुंबातल्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी केवळ राजकीय प्रतिष्ठाच दिली नाही तर राज्याच्या सर्वोच्च सत्तेच्या खुर्चीतही नेऊन बसवले . कृषी औद्योगिक चळवळीच्या उभारणीतून समाजकारणाव्दारे राजकारण उभे करण्याचा पायंडा ग्रामीण महाराष्ट्रात यशवंतरावांनी पाडला . त्याचे नेतृत्व मात्र प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रस्थापित नेत्यांकडे होते . बाळासाहेबांचा केंद्रबिंदू मात्र मुंबईतला आणि महाराष्ट्रातला सामान्य मराठी माणूस होता . कार्यकर्त्याच्या व्यक्तिगत चारित्र्यापेक्षाही संघटनात्मक गुणवत्तेला त्यांनी विशेष महत्त्व दिले आणि समाजकारणातूनच शिवसेनेच्या राजकारणाची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली .

परिणामांची पर्वा करता मनाला जे पटेल त्यानुसारच राजकारण करणारा लोकनेता म्हणजे बाळासाहेब . देशात बोटचेपी लोकशाही मला मान्य नाही अशी गर्जना करीत इंदिरा गांधींच्या आणिबाणीला त्यांनी हार्दीक पाठिंबा दिला , इतकेच नव्हे तर इंदिरा काँग्रेस हा नवा पक्ष स्थापन झाल्यानंतर बॅरिस्टर अंतुलेंच्या विनंतीनुसार आपले निवडून येणारे उमेदवारही त्यांनी या नव्या पक्षाला पाठिंबा देण्यासाठी मागे घेतले . राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या प्रतिभाताई पाटील यांना उमेदवारीची संधी मिळाली तेव्हा त्यानंतर प्रणव मुखर्जींना शिवसेनेचा पाठिंबा मिळावा म्हणून मी स्वत : मुखर्जींना घेऊन बाळासाहेबांकडे गेलो . दोन्ही वेळेस भाजपच्या संबंधांची पर्वा करता बाळासाहेबांनी दोघांनाही शिवसेनेचा पाठिंबा दिला .

pawar_bt.jpg 
 महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्न असो की दत्ता सामंतांच्या संपानंतर गिरणी कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न , बाळासाहेब आणि मी एका व्यासपीठावर आलो . महाराष्ट्राच्या राजकीय , सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांबाबत अनेकदा आम्ही एकमेकांना साथ दिली . मात्र मराठी मनाचा बारकाईने अभ्यास असलेल्या बाळासाहेबांनी शिवसेनेचे राजकारण पुढे नेतांना एक विशिष्ठ अंतर कायम राखले . प्रतिस्पर्धी पक्षाचा नेता म्हणून ठाकरी भाषेत माझा उल्लेख कधी बारामतीचा म्हमद्या तर कधी मैद्याचे पोते अशा शब्दांतही केला . मात्र प्रसंगी आमच्या खाजगी मैत्रीलाही ते मनापासून जागले . राज्यसभेसाठी पहिल्यांदा सुप्रिया उभी राहिली , तेव्हा प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना भाजपचा असेल , म्हणून बाळासाहेबांशी मी संवादही साधला नाही . ही गोष्ट समजताच त्यांनी फोनवर मला बरेच खडसावले . सुप्रिया आयुष्यात पहिल्यांदा निवडणूक लढवते आहे आणि तुम्ही मला सांगितलेसुद्धा नाही . तिची निवडणूक बिनविरोधच झाली पाहिजे , यासाठी बाळासाहेबांनी युतीचा उमेदवार उभा राहू दिला नाही . राजकारणात अशी दिलेरी आज कुठेही पहायला मिळत नाही , म्हणूनच बाळासाहेबांच्या निधनाने व्यक्तिश : मी अतिशय व्यथित आहे . एक जवळचा स्नेही कायमचा हरपल्याची वेदना मनात आहे .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive