Tuesday, September 3, 2013

पाप-पुण्य

सध्या श्रावण महिन्यानिमित्त आपल्या देशामध्ये सगळीकडे ' धार्मिक ' वातावरण दिसून येत आहे . दरवर्षीच या महिन्यात टीव्हीवरती चॅनल्सवर , वर्तमानपत्रात , मासिकांमध्ये सगळीकडे धर्म - अधर्म , नीती - अनीती , पाप - पुण्य यांच्या चर्चा झडताना दिसतात . सगळे धार्मिक गुरू , उपदेशक माणसाला पुण्य वाढवण्यासाठी विविध उपदेश देतात आणि त्यामुळे प्रभावित होऊन आपल्यासारखी सामान्य माणसेही थोडेसे का होईना , पुण्य आपल्या गाठीशी कसे पडेल याच विवंचनेत पडतात . मग कोणी सोमवारी उपवास करतात , कोणी महिनाभर चपला घालत नाहीत , कोणी झाडाला प्रदक्षिणा मारतात इत्यादी इत्यादी . या सर्व क्रियांनी फक्त त्या व्यक्तीच्या मनाचे समाधान होते . या सर्व क्रियांना आपण धार्मिक म्हणतो . पण जो धर्म आज आपल्यासमोर ज्या रूपात उभा आहे , तेच त्याचे खरे स्वरूप आहे का , हाही प्रश्न विचार करण्यासारखा आहे .

कोणताही धर्म हा मुळात चांगलाच असतो . परंतु नंतरच्या काळात त्या धर्माचे अनुयायी त्याचे स्वरूप इतके विकृत करून टाकतात , की मूळ धर्मसंस्थापकालाही तो धर्म आवडेनासा व्हावा . पाप आणि पुण्य म्हणजे काय , याविषयी कोणतेही निश्चित मत बनवता येऊ शकत नाही . बऱ्याच वेळेला पाप - पुण्य , नीती - अनीती , सत्य - असत्य यांच्या सीमारेषा इतक्या पुसट असतात , की त्यांच्या बाबतीत सर्वांचे एकमत होऊ शकत नाही . पुष्कळ वेळा एखादी गोष्ट पापातही मोडत नाही आणि पुण्यातही मोडत नाही ; परंतु पाप - पुण्याचे ठेकेदार तिच्यावर आपापला शिक्का मारल्याशिवाय राहत नाहीत . बऱ्याच वेळेला एखाद्या व्यक्तीसाठी जे पाप असते , ते दुसऱ्या व्यक्तीसाठी पुण्य असू शकते . खरे पाहिले , तर पाप वा पुण्य या क्रियाच आहेत , असे मला वाटत नाही . वस्तुत : कोणतीही क्रिया करताना ती आपण का करतो आहोत , याविषयीचा आपला विवेकभाव जागृत असेल , तर आपल्या हातून वाईट कर्म होऊच शकणार नाही . सदसद्विवेकबुद्धी जागृत असताना कुणी पाप करील , हे अशक्यच आहे .

एकदा एक तरुण एका साधूकडे आला म्हणाला , ' मला आपला शिष्य व्हायचे आहे . तुम्ही मला शिष्य म्हणून स्वीकाराल काय ?' साधू म्हणाला , ' तुझे स्वागत असो . परमेश्वराच्या दारात नेहमी सर्वांचे स्वागतच होते .' तो तरुण काहीसा बेचैन झाला आणि म्हणाला , ' परंतु माझ्यात फार उणिवा आहेत . मी फार पापी आहे . मी जुगार खेळतो , दारू पितो , व्यसनी आहे .' साधू म्हणाला , ' या सर्वांमुळे कसलाच फरक पडत नाही . परंतु हे बघ ! मी तुला शिष्य म्हणून स्वीकारले आहे , तसे तूही माझे एक म्हणणे मान्य कर . निदान इतके तरी लक्षात ठेव की , तू जे काम करशील , ते सजगपणे कर , पूर्णपणे जागृतीत कर . तुला माहीत असू दे , की तू ते का करतो आहेस . असे असेल तर तुझ्या हातून कधी पाप होणारच नाही . कारण माणसाचा अंतरात्मा त्याला कधीही वाईट मार्गावर नेत नाही . अंतर्मनाची जागृती हेच अध्यात्माचे खरे सार आहे .'

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive