Privacy Policy

Friday, July 8, 2011

पाचक आलं


पाचक आलं
पावसाळा सुरू झाला आहे. अशा मस्त वातावरणात छानपैकी आल्याचा गरमागरम चहा प्यायला मिळाला तर पावसाळ्याच्या आनंद वाढतो. खरं तर पावसाळा असो वा नसो, आलं टाकून बनवलेला चहा प्यायल्यावर शरीरात तरतरी येते. मन उत्साहित होते. थकवा दूर होतो. काम करायला उत्साह येतो. अशा या आल्याचा उपयोग केवळ चहाची चव वाढवण्यासाठीच होत नाही तर पावसाळ्यात उद्भवणार्‍या विविध आजारांवर औषध म्हणूनही होतो. 
- आले तीक्ष्ण, अग्निप्रदीपक, वायूहारक, तिखट, कफहारक, उष्ण व रुक्ष असे आहे. 
- आले जेवणाच्या आधी मिठाबरोबर खाल्यास अरुचीवर फायदा होतो. 
- आले व पुदिनाच्या रसात थोडे सैंधव घालून प्यायल्याने पोटशूळ बरा होतो. 
- अरुची वाढणे, गॅसचा त्रास होणे. करपट ढेकरा येणे. अपचन, भूक न लागणे, मलावरोध होणे यावर सोपा उपाय म्हणजे चमचाभर आल्याच्या रसात तेवढाच लिंबाचा रस घेऊन त्यात थोडे सैंधव घालून रोज सकाळी घेणे.
- आल्याचा व कांद्याचा रस एकत्र घेतल्याने उलटी बंद होते. 
- घशात साचलेला कफ काढण्यासाठी दोन चमचे आल्याच्या रसात चमचाभर मध घालून प्यावे. यामुळे पोटातला वायूही दूर होतो. खोकल्यामध्ये, दम, श्‍वास लागणे इत्यादी विकारांवरही या उपायाने गुण येतो. 
- ताप आलेल्या व्यक्तीस आल्याचा व पुदिन्याचा रस दिल्यास घाम येऊन ताप उतरतो. 
- सर्दी झाली असता चहामध्ये आले ठेचून घालावे व तो चहा प्यावा. आराम मिळतो. 
- लहान मुलांना दूध पचत नसेल तर त्यात थोडे आले ठेचून उकळवावे व मग ते दूध द्यावे. 
- आवाज बसला असेल किंवा घसा दुखत असेल तर आले, लवंग, मीठ एकत्र करून खावे. 
- आल्याचा रस खडीसाखरेसोबत घेतला असता भोवळ येणे, चक्कर येणे थांबते. 
- आल्याचा तुकडा तोंडात ठेवून चघळल्याने उचकी बंद होते. 
टीप- ज्यांना कोरडा खोकला, आम्लपित्त, रक्तदाब, पंडुरोग किंवा मूत्रविकार आहे त्यांनी आल्याचे सेवन टाळावे. 
- पावसाळ्यातील अनेक आजार हे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे होतात. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आलं हे उत्तम औषध आहे. साधारण जंतू संसर्गापासून ते कर्करोगाच्या पेशींना प्रतिबंध करण्याचे काम आलं करते. 
- आल्याच काढा- आल्याचा काढा बनवण्यासाठी १५ ग्रॅम आलं वाटून एक कप पाण्यात टाकून उकळवावे व गाळावे. हा काढा असाच घेऊ शकता. यात लिंबू, गुळ किंवा मध, पुदिना टाकल्यास मस्त पाचक सरबत बनते.


No comments:

Post a Comment