Search here anything you like

Loading...

Saturday, January 28, 2012

स्वच्छंद प्रवास आणि लोककथांचा अनुवाद Tour and Folk Tales

स्वच्छंद प्रवास आणि लोककथांचा अनुवाद
Tour and Translation Folk Tales  
 
 कर्नाटकातल्या बहुतेक सगळ्या विद्यापीठांनी आपापल्या परिसरातल्या लोककथांचं संशोधन-संकलन केलं आहे. माझ्याकडून तत्परतेनं या लोककथांची निवड होईल आणि एखाद्या नियतकालिकातून मी त्या प्रकाशितही करू शकेन असं वाटलं होतं! पण वेगवेगळी कामं येत राहिली. त्यामुळे हे काम राहूनच जाईल की काय अशी भीती वाटायला लागली आहे... सांगत आहेत प्रसिध्द अनुवादक

> डॉ. उमा वि. कुलकर्णी

आयुष्यात मनात आलेलं सगळं आपल्याला मिळेलच, अशा मानसिकतेत जगणाऱ्या पिढीपैकी मी नसल्यामुळे आयुष्यात काय राहून गेलंय असं आवर्जून आठवूनच बघावं लागेल. प्रथमदर्शनी तर असंच जाणवतं की अनुवाद क्षेत्रात एखाद-दुसरा अनुवाद करून, साहित्य-क्षेत्रात काही ना काही केल्याचं समाधान मिळवत आयुष्य काढता येईल असं वाटत असताना या क्षेत्रात जे काही करायला मिळालं आणि मिळतंय हेच भरपूर आहे.

तरीही अगदी बारीकसे काही कोपरे असतातच. अशा कोपऱ्यांविषयी असमाधान बागळत आयुष्यभर ते कुरवाळणं काही योग्य नसलं तरी, या लेखाच्या निमित्तानं त्यांच्याकडे एक नजर टाकता येईल एवढं खरं!

अगदी लहानपणापासून मला प्रवासाची अपरिमित हौस. इतकी की त्या वेळी मला भटक्या जमातीचा हेवा वाटायचा. (पुढे त्यांची आत्मचरित्रं वाचून त्यांच्या अडचणीही समजल्या म्हणा!) घरी आलेले पाहुणे जायला निघाले की त्यांच्याबरोबर आपणही जावं असं वाटायचं. सात भावंडांपैकी एक असल्यामुळे उगाच गंमतीसाठी प्रवास. हे प्रकरण तेव्हा नव्हतंच. तरीही वर्षाकाठी उसाचं गुऱ्हाळ असेल तेव्हा आम्ही सगळे आमच्या गावी बेडकीहाळला जात असू. तिथं 'कोडीच्या मळ्यावर गुऱ्हाळासाठी जाण्यासाठी आवर्जून बैलगाडी सांगितलेली असे.

त्यातही बैलगाडीनं बेडकीहाळ ने नरसोबावाडी असा जो प्रवास होई तो आजही माझ्या स्मरणात आहे. पहाटे अडीच-तीनला उठायचं आणि दोन बैलगाड्या जुंपून प्रवासाला निघायचं. त्यातली बायका-मुलांसाठीच्या गाडीला सवारी बांधलेली असे. या दोनही बैलगाड्यांची बोरगावच्या खडकाळ माळावर शर्यत लावली जायची. आजही मला आठवणारी कडाक्याच्या थंडीची आठवण इथलीच आहे. माझ्या जीवनातील पराकोटीची थंडी मी भल्या पहाटे अनवाणी, पायी दूधगंगा नदी ओलांडताना आणि त्या नंतर अनवाणी गोट्या-वाळूवरून कसं-बसं धावत जाऊन पुन्हा बैलगाडीत बसेपर्यंत अनुभवली आहे! त्यानंतर आम्ही हिमालयात प्रवास केला. गंगोत्रीला गोमुखापर्यंत जाऊन आलो. अगदी नथुला पासला बर्फवर्षावही अनुभवला. पण मला आजही थंडी म्हटली की तीच थंडी आणि तळपायांना टोचणारे ते नदीकाठचे गोटे आठवतात.

त्यानंतर मात्र आम्हाला गावाकडं टॅक्सीनं नेण्यात येऊ लागलं. प्रवास सुखाचा होऊ लागला आणि बैलगाडीची ती मजा कायमची आठवणीपुरतीच राहिली. तेवढी थंडीही कधी वाजली नाही.

तसा आम्ही पुढच्या आयुष्यातही बराच प्रवास केला. माझे मिस्टर विरुपाक्ष सरकारी नोकरीत असताना दर चार वर्षांनी आम्ही बाहेर पडायचोच. शिवाय माझा प्रबंधाचा विषय 'दविड देवालये हा असल्यामुळे त्याही निमित्तानं दक्षिण भारताचा प्रवास झाला. अनुवादाच्या गरजेनुसार आम्ही कर्नाटकाच्या विविध भागात फिरत असतो. मागं आमची विजय-सुपर होती. तिच्यावरूनही मुंंबई-महाबळेश्वर अशी खूप भटकंती केली. विरूपाक्षांच्या रिटायरमेंटनंतर १९९० साली आम्ही भुसावळजवळच्या वरणगावहून पुण्यालाही तिच्यावरून आलो होतो; आमचा मित्र परिवार आणि नातेवाईकांबरोबरही खूप हिंडलो. अजूनही हिंडत असतो. तरीही... तरीही.

माझ्या मनातलं एक प्रवासाचं स्वप्न आहे. काहीही न ठरवता एक गाडी घेऊन प्रवासासाठी बाहेर पडायचं. मनाला येईल तिथं मुक्काम करायचा. शक्यतो बरोबर तंबू न्यायचा. गावाबाहेर मुक्काम करायचा आणि काही महिने फिरून जेव्हा घराची तीव्रपणे आठवण येईल तेव्हाच घरी परतायचं! अक्षरश: कुठल्या दिशेनं जायचं तेही आयत्या वेळी ठरवायचं. घरी परतल्यावरही 'आपण काय पाहिलं? याचा विचार करायचा नाही. अशी काहीशी माझी अपेक्षा आहे. फक्त सीझन चांगला बघायचा आणि कमी पडणार नाहीत इतके पैसे बरोबर घ्यायचे, भरपूर खायला घ्यायचं.... बस्स!

तशीच आणखी एक इच्छा म्हणजे दिवसच्या दिवस जंगलात काढून तिथल्या प्राण्यांबरोबर रमायचं! भरपूर फोटो काढायचे. ('डिस्कव्हरी चॅनेल बघ त्या पेक्षा असा काहीजण यावर सल्ला देतील. तरीही)

या दोन्ही इच्छा राहून गेल्या आहेत, असंच मी आता तरी मनाते. कारण असा प्रवास करायला आवश्यक असलेला निवांतपणा आता मिळत नाही आणि शरीराची साथ मिळेल याचीही खात्री वाटत नाही.

अजूनही आम्ही प्रवास करत असलो तरी, अशा प्रकारचा प्रवास म्हणजे एक केवळ स्वप्नच असेल. हेही समजायचं वय असल्यामुळे त्याबद्दल खंतही नाही. एक मात्र खरं, भारतातच बघायला खूप आहे असा अनुभव असल्यामुळे परदेश प्रवासाची मात्र अजिबात अपेक्षा नाही.

राहून गेलेली आणखी एक गोष्ट लेखनाविषयीची आहे.

अनुवादाच्या सुरुवातीला मला कारंतांची एक कादंबरी अनुवादित करायची होती. जेव्हा आम्ही परवानगीसाठी कारंतांना विचारलं तेव्हा, त्याचा अनुवाद आणखी कुणी करत असल्याचं समजलं. नंतर मराठीमध्ये ती कादंबरी 'मृत्यूनंतर' या नावानं आलीही. त्यात कारंतांनी कादंबरीच्या माध्यमातून त्यांचं मृृत्युत्तर जीवनाविषयी असलेलं चिंतन मांडलं आहे. 'माणूस जिवंत असेपर्यंत कसा जगतो ते महत्त्वाचं; त्याच्या त्या जगण्यानुसार माणसं त्याची भल्या-बुऱ्या कारणानं आठवण काढतात, हे जितकी वर्ष राहील तेच खरं तर मृत्यूत्तर जीवन असा गंभीर विचार मांडणारी ही कादंबरी आहे. ती अनुवादित करायला मला मिळाली असती तर, मला हवी होती. पण नाही मिळाली. एका कादंबरीचे दोन अनुवाद होऊ नयेत असंही नाही. तरीही राहून गेलं हे मात्र खरं.

त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे मला कारंतांचे विचार व्यक्त करणारं पुस्तक ('कारंत-चिंतन' हे मी दिलेलं नाव) अनुवादित करायला मिळाल्यामुळे ही खंत काहीशी कमी झाली आहे.

हा अनुवाद करायची मला संधी मिळाली नसली तरी, ती कादंबरी मराठीत उपलब्ध आहे; ही गोष्ट तरी बरी आहे. पण दुसरी खंत मात्र तशी नाही.

लोककथा हा माझ्या अतिशय आस्थेचा विषय आहे. आधुनिक कन्नड साहित्याचा अनुवाद करतानाही त्या मला वेळोवेळी भेटत असतात. अगदी छोटीशी लोककथाही खूप काही सांगून जाते. मराठी साहित्यात मला त्यांचा अभाव फार जाणवला. कन्नडमधला यावनूर महादेव यांच्यासारखा दलित लेखकही आपल्या कथा-कादंबऱ्यांत ती परंपरा सोडत नाही. तसंच तिथला नाटक हा कला-प्रकारही त्याभोवती अनेकदा फिरताना दिसतो. तो एकीकडे स्थानिक पातळीवर असतो तर, दुसरीकडे सार्वत्रिकही असतो. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या जिवंत संगीतामुळे जे चैतन्य रंगमंचावर उसळतं ते तर अद्भुत असतं. तिथली बी. जयश्ाीसारखी दिग्दशिर्का याचा प्रभावीपणे वापर करते. गिरीश कार्नाड आणि चंदशेखर कंबार यांच्यासारखे नाटककार एकच लोककथा ऐकून दोन-दोन प्रभावी नाटकं लिहितात... असो.

काही वर्षांपूवीर् डॉ. एम. एम. कुलबुगीर् यांच्याशी बोलताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. कर्नाटकातल्या बहुतेक सगळ्या विद्यापीठांनी आपापल्या परिसरातल्या लोककथांचं संशोधन आणि संकलन केलं आहे. (इतरही कलांचं तिथं संशोधक-संकलन चालतं) डॉ. कलबुगीर् हे कन्नड भाषेला वाहिलेल्या हंपी विद्यापीठाचे माजी कुलगुरू असल्यामुळे त्यांनी स्वत:च्या संग्रहातले या विषयावरचे ग्रंथ आम्हाला लगोलग काढून दिले. त्या वेळी मला वाटलं. माझ्याकडून तत्परतेनं या लोककथांची निवड होईल आणि एखाद्या नियतकालिकातून मी त्या नियमितपणे प्रकाशितही करू शकेन!

पण त्याच वेळी आम्हा दोघांच्याही हातात वेगवेगळी कामं येत राहिली. (विरूपाक्षही मराठी आणि इंग्लिशमधलं साहित्य कन्नडमध्ये अनुवादित करत असतात.) अजूनही तो ओघ कायम आहे आणि वयोपरत्वे तासन्तास काम करण्याबरोबर जास्तीचं वाचन काढण्यासाठी वेळही मिळेनासा झाला आहे. त्यामुळे यानंतर हे काम राहूनच जाईल की काय अशी भीती वाटायला लागली आहे.

तसं हे काम कायमचं राहून गेलं, तर मात्र मला हुरहूर वाटल्याशिवाय राहणार नाही!

पानिपत - ऐतिहासिक कादंबरी Panipat - Historical Novel

पानिपत - ऐतिहासिक कादंबरी Panipat - Historical Novel

कीर्तिकुमार शिंदे
‘‘शी! शी! पानिपत हा किती अभद्र शब्द आहे. हे शीर्षक तुमच्या कादंबरीला अजिबात देऊ नका,’’ असा सल्ला ज्येष्ठ नाटककार बाळ कोल्हटकर यांनी २२ वर्षांपूर्वी एका पंचविशीतल्या प्रशासकीय अधिकाऱ्याला दिला होता. त्या तरुण अधिकाऱ्याने भरपूर पायपीट करून, संशोधन करून, रात्रीचा दिवस करून एक कादंबरी लिहिली होती.
पण भविष्याच्या उदरात या कादंबरीविषयी काही तरी भव्यदिव्य दडलेलं असावं. पानिपतच्या लढाईने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला एक वेगळं वळण दिलं. काहीसा तसाच त्या लेखकाच्या कादंबरीने मराठी साहित्यसृष्टीला व ‘पानिपत’ या शब्दालाही एक वेगळा अर्थ दिला. ती कादंबरी महाप्रचंड लोकप्रिय ठरली. तिने अनेक उच्चांक रचले. गेल्या २२ वर्षांत या कादंबरीच्या मराठीत २९ आवृत्त्या प्रकाशित झाल्या. अनेक भाषांत तिचे अनुवाद झाले. लेखकावर पुरस्कारांचा वर्षांव झाला..
येत्या मकरसंक्रांतीला पानिपतच्या लढाईला २५० वर्षे पूर्ण होत आहेत आणि विश्वास पाटील यांच्या ‘पानिपत’ची ३० वी आवृत्तीही प्रकाशित होत आहे. या दुग्धशर्करा योगाचं निमित्त साधून या कादंबरीच्या जन्माची प्रत्यक्ष लेखकानेच सांगितलेली ही कहाणी..
पानिपतची लढाई म्हणजे मराठी माणसाच्या मनातली भळभळती जखमच. अशा विषयावर ऐतिहासिक कादंबरी लिहायचं तुम्हाला कसं सुचलं?
रियासतकार सरदेसाई यांच्या ‘द न्यू हिस्टरी ऑफ मराठाज्’ या ग्रंथाचा तिसरा खंड वाचत असताना त्यातल्या पानिपतची लढाई या प्रकरणाने माझं लक्ष वेधून घेतलं. चांगलं ७०-८० पानांचं भलंमोठं असं ते प्रकरण होतं. ते वाचत असतानाच मी या विषयाकडे आकर्षित झालो. इतकंच नव्हे तर नजीबखानची, ज्याचं तोपर्यंत काळकूट, सर्प, जहरी नाग, उलटय़ा काळजाचा अशा नानाविध पद्धतीने वर्णन केलं जात होतं, त्याची प्रतिमाच माझ्या डोळ्यासमोर साकार व्हायला लागली. मी या विषयावर अधिक अभ्यास करायला सुरुवात केली.
तुमच्या आधीही पानिपतच्या लढाईवर बरंच लिहिलं गेलं होतं..
हो. माझ्या आधीही पानिपत या विषयावर अनेकांनी लिहिलं होतं. पानिपतच्या लढाईवर १२ कादंबऱ्या, १७-१८ नाटकं, काही प्रवासवर्णनं पूर्वीच प्रकाशित झाली होती. १९३० च्या सुमारास प्रकाशित झालेली चिंतामण वैद्यांची ‘दुर्दैवी रंगू’ ही कादंबरीसुद्धा गाजली होती. पण त्यात नजीबखानचा साधा उल्लेखही नव्हता. हा नजीब कुणाला सापडलाच नव्हता. खरं तर त्यानेच अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दालीला मराठय़ांपासून दिल्लीला वाचवण्यासाठी हिंदुस्तानात येण्याची विनंती पत्राद्वारे केली होती. हिटलरसाठी गोबेल्सने जसं प्रचाराचं भयंकर तंत्र वापरलं तसं नजीबखानने त्याच्या काळात वापरलं. हिंदू विरूद्ध मुस्लिम, शिया विरूद्ध सुन्नी, उत्तर हिंदुस्तानी विरूद्ध दख्खनी अशा त्याने काडय़ा लावल्या. भांडणं काढली.
या नजीबखानसारख्या अनेक व्यक्तिरेखा तुमच्या ‘पानिपत’ कादंबरीत आहेत. त्या उभ्या करताना तुम्हाला काही विशेष मेहनत घ्यावी लागली का?
मेहनत तर खूपच घेतली. चार-पाच र्वष माझं संशोधन-वाचन-पानिपतला प्रत्यक्ष भेट असं चालू होतं. व्यक्तिरेखांविषयी म्हणायचं झालं तर सदाशिवराव भाऊ म्हणजे वेडा, लेचापेचा सेनापती असं म्हटलं जायचं. पानिपतच्या लढाईला राघोबांना सेनापती म्हणून पाठवलं असतं तर मराठय़ांनी पानिपतची लढाई जिंकली असती, असंही म्हटलं जायचं. पण माझ्या संशोधनातून माझ्यासमोर वेगळंच चित्र निर्माण होत होतं.
वि. गो. खोबरेकर यांनी ‘मराठय़ांच्या स्वाऱ्यांचे मुक्काम’ या पुस्तकात बाजीरावापासून भाऊसाहेब पेशव्यांपर्यंतच्या सर्व पेशव्यांच्या उत्तरेतील लढायांचे मुक्काम, त्यासाठी झालेला खर्च यांचा अत्यंत सविस्तर अभ्यास केला आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर सदाशिवराव भाऊंच्या ऐवजी कोणीही दुसरा सेनापती म्हणून लढला असता तरी काही फरक पडला नसता हे सत्य अधोरखित झालं.
पाटलांचं ‘पानिपत’ हिंदीतही टॉपलाच!
मराठीप्रमाणे ‘पानिपत’ची हिंदी आवृत्तीही गेली अनेक वर्षे विक्रीचा उच्चांक गाठत आहे. या हिंदी ‘पानिपत’च्या जन्माची कहाणी विश्वास पाटील यांनी आवर्जून सांगितली.
पी. व्ही. नरसिंहराव जेव्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते (देशाचे पंतप्रधान बनण्यापूर्वी) तेव्हा एकदा मुंबई भेटीवर आले असता त्यांना ‘पानिपत’ कादंबरीविषयी कळालं. त्यांनी ताबडतोब कादंबरी मागवून घेतली. नरसिंहराव यांना स्वत:ला मराठी भाषा उत्तम येत होती. काही मराठी पुस्तकांचा त्यांनी तेलुगूमध्ये अनुवादही केला होता. त्यावेळी ते ज्ञानपीठ अकादमीचे अध्यक्षसुद्धा होते आणि लगेचच त्यांनी या कादंबरीचा हिंदी अनुवाद करून घेतला.
आज इतक्या वर्षांनंतरही ही कादंबरी हिंदीत टॉपला असून हिंदीत ज्या पुस्तकांची सर्वाधिक विक्री होते त्यातून सर्वाधिक रॉयल्टी मिळणाऱ्या पहिल्या पाच लेखकांमध्ये विश्वास पाटील यांचा समावेश होतो.

मुळात भाऊसाहेब कधीच ‘फडावरचा कारकून’ नव्हता. मराठय़ांचं तोफदळ प्रबळ व्हावं म्हणून फ्रेंचांकडून तोफा घेणं, फ्रेंचांचा सेनापती फोडून मराठा सैन्यात आणणं तसंच अनेक लढायांचा अनुभव त्याच्याकडे होता.
१९४०च्या सुमारास मध्यप्रदेशात एक ‘हितचिंतक’ नावाचा विशेषांक निघाला होता. मी मोठय़ा प्रयत्नांनी तो मिळवला. या अंकात रियासतकार सरदेसाई यांचा ‘भाऊसाहेबांच्या जीवनाचे धागेदोरे’ हा अप्रतिम लेख वाचायला मिळाला. त्यामुळे सदाशिवराव भाऊची धूसर प्रतिमा हळूहळू स्पष्ट व्हायला लागली.
नानासाहेब, विश्वासराव, सदाशिवरावभाऊ, राघोबा, समशेरबहाद्दर, शिंदे, होळकर .. दुसऱ्या बाजूला अब्दाली, शहावलीखान, नजीबखान .. अशा असंख्य व्यक्तिरेखा प्रत्यक्ष कागदावर उतरवणं महाकठिणच. तुम्ही हे कसं काय जमवलं?
‘पानिपत’ हा विषय जेव्हा मला सुचला तेव्हा मला मौर्य काळातल्या ‘त्या’ अज्ञात शिल्पकारांच्या जमातीची याद आली. त्यांच्या कल्पनेत असलेली शिल्पं साकारण्यासाठी जेव्हा त्यांना अजंठा-वेरूळच्या डोंगरातला एकसंध दगड दिसला असेल तेव्हा त्यांना किती आनंद झाला असेल? पानिपतचा विषयही त्या अवाढव्य डोंगराइतकाच प्रचंड आहे. त्या इतिहासाच्या डोंगरातून जर चांगलं शिल्प कोरायचं असेल तर आपण आपली छिन्नी- लेखणी जबाबदारीने वापरायला हवी याचं मला पूर्ण भान होतं.
मी आधी पूर्ण अभ्यास केला. त्यासाठी चार-पाच र्वष थांबलो. हा विषय मनात पूर्ण मुरू दिला. त्यानंतर पाचशे-पाचशे पानांच्या दोन वह्याच केल्या. या वह्यांमध्ये मी एकेका व्यक्तिरेखेचं सविस्तर वर्णन लिहून काढलं. तो दिसतो कसा, त्याचं वय काय, त्याची कौटुंबिक-सामाजिक पाश्र्वभूमी काय अशा सगळ्या नोंदी करून ठेवल्या. माझ्या या नोट्सचा मला प्रत्यक्ष लेखनाच्या वेळी खूपच फायदा झाला.
त्या काळातली भाषा कशी उभी केलीत?
पानिपतच्या लढाईच्या काळाचा फील यावा यासाठी मी तत्कालीन अस्सल कागदपत्रं अभ्यासली. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण त्या दरम्यान पानिपतमधून महाराष्ट्राला व महाराष्ट्राकडून पानिपतला अशी हजारो पत्रं लिहिली गेली होती. सुदैवाने आजही ती उपलब्ध आहेत. या पत्रांमध्ये लढाईच्या वर्णनापासून ‘चिंगी गरोदर आहे’ इथपर्यंतची वर्णनं मिळाली. या पत्रांमुळे त्यावेळच्या चालीरीती, भाषा समजून घ्यायला खूपच मदत झाली. तोफेसाठी वापरला जाणारा ‘सुतरनाळ’ हा सुंदर मराठी शब्दही असाच समजला.
याशिवाय अरबी-फारसी भाषेतील बखरी- ‘तवारीका’ यांच्यावरही खूप भर दिला. तेव्हाच्या मध्यपूर्वेतल्या राजांची एक गोष्ट खूप चांगली होती. ती म्हणजे राजासोबत तिथले उत्तमोत्तम कवी, इतिहासकार, भूगोलतज्ज्ञ असायचे. त्यांनी केलेल्या वर्णनातून पानिपतची प्रत्यक्ष स्थिती, तिथलं वातावरण समजून घेता आलं. अशी चौफेर तयारी केली.
असाही एक प्रकाशक..
प्रकाशक हा मुळात व्यापारी असतो. त्यामुळे व्यापाऱ्याकडचा बिलंदरपणा प्रकाशकाकडे येतोच. तसं पाहिलं तर जगातले बहुतेक प्रकाशक सारखेच असतात! पण यालाही काही अपवाद आहेत. बंगलोरच्या सपना बुक हाऊसने माझी सगळी पुस्तकं कन्नडमध्ये अनुवादित करून प्रकाशित केली आहेत. वीरेंद्र शहा या प्रकाशनाचे मालक. त्यांचं वैशिष्टय़ म्हणजे लेखकाला पुस्तकाची पहिली छापील प्रत ते जेव्हा पाठवतात तेव्हाच त्या आवृत्तीसाठी लेखकाला मिळणाऱ्या संपूर्ण रॉयल्टीच्या रकमेचा चेकही पाठवतात. मला वाटतं, प्रत्यक्ष पुस्तक विक्री होण्यापूर्वीच लेखकाला संपूर्ण मानधनाचा आगाऊ चेक पाठवणारा हा जगातला एकमेव प्रकाशक असावा. मी जेव्हा त्यांना विचारलं की, ‘‘इतर प्रकाशक असं कधी करत नाहीत. मग तुम्हाला कसं काय हे जमतं?’’ यावर वीरेंद्र शहा यांचं उत्तर होतं: ‘‘प्रकाशक प्रिंटरला किंवा कागद पुरवणाऱ्याला पैसे देण्याचं कधी टाळतो का? मग त्याने लेखकाला त्याचे पैसे देण्याचं का टाळावं? लेखकाने जर त्याचं काम केलेलं आहे, तर त्याला त्याचे पैसे ताबडतोब मिळायलाच हवेत!’’
वीरेंद्र शहा यांनी असा पारदर्शक व्यवसाय केला, कन्नड साहित्य निर्मितीला प्रोत्साहन दिलं म्हणूनच त्यांना कर्नाटक सरकारचा ‘कर्नाटक राज्योत्सव प्रशस्ती’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- विश्वास पाटील

..आणि प्रत्यक्ष लेखन? कितीवेळा पुनर्लेखन करावं लागलं?
सगळी तयारी झाल्यावर एकदा लिहायला बसलो. ६०-७० पानं लिहून काढली. पण मनासारखं उतरत नव्हतं. जे लिहिलं त्याबाबत मी स्वत:च समाधानी नव्हतो. ब्रेक घेतला. पुन्हा वर्षभर अभ्यास- वाचन, मनन, चिंतन केलं.
अखेर नोव्हेंबर १९८७मध्ये लिहायला बसलो. एक मे १९८८ पर्यंत संपूर्ण कादंबरी लिहून काढली. अगदी एकटाकी. पुनर्लेखन वगैरे करण्याची गरजच पडली नाही.
माझ्या सुदैवाने तेव्हा सरकारी नोकरीत पाच दिवसांचा आठवडा होता. शनिवार-रविवार तर पूर्ण मिळायचेच. पण दररोज रात्रभर जागूनसुद्धा लेखन केलं.
लेखकाने कादंबरी लिहून पूर्ण केल्यानंतर ती एखाद्या प्रकाशकाने प्रकाशित करेपर्यंतच्या काळातही खूप काही घडत असतं. तुमचा या बाबतीतला अनुभव कसा होता?
मूळात ही कादंबरी श्रीविद्या प्रकाशनचे मधुकाका कुलकर्णी काढणार होते. तशी आमची चर्चाही झाली होती. ‘पानिपत’ लिहिण्याआधी मी लिहिलेल्या ‘क्रांतीसूर्य’ या लघुकादंबरीचा ड्राफ्ट त्यांनी वाचला होता. मी चांगलं लिहू शकेन याबाबत त्यांना खात्री होती. ठरल्याप्रमाणे मी त्यांना ‘पानिपत’चा ड्राफ्ट दिला. त्यांनी मुंबई-पुणे रेल्वे प्रवासातच त्यातलं एक प्रकरण वाचलं आणि ‘‘कादंबरी सुंदर झालीए, ती आपण प्रकाशित करणारच’’ असं कळवलं. ‘‘पण कादंबरीची पृष्ठसंख्या जास्त आहे. ती निम्मी करून द्या’’ असं त्यांचं म्हणणं होतं.
आता ५५० पृष्ठांची कादंबरी थोडीफार कमी करता आली असती, पण निम्मी करून देणं मला अशक्यच होतं. तेव्हा माझ्यासोबत शंकर सारडा होते. ते म्हणाले, ‘‘तुम्ही जे लिहिलंय ते महाकाव्याच्या तोडीचं आहे. कादंबरीची पृष्ठसंख्या अजिबात कमी करू नका.’’
‘राजहंस प्रकाशन’च्या दिलीप माजगावकरांशी माझी ओळख होती. तेव्हा माजगावकरांनी साप्ताहिक ‘माणूस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या काही चांगल्या लेखमालांची पुस्तके प्रकाशित केली होती. मी अनुवादित केलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भाषणांचा संग्रह ‘चलो दिल्ली’ त्यांनीच प्रकाशित केला होता. मी त्यांना कादंबरीचा पाच फाईल्सचा ड्राफ्ट दिला तेव्हा त्यातील उपशीर्षकं- दिल्लीवर हमला, तख्त की तीर्थ, संगरतांडव, पांढरं आभाळ वाचूनच ते खूष झाले. त्यांनी एका झपाटय़ात ती कादंबरी वाचून काढली आणि मुख्य म्हणजे चार-पाच महिन्यांतच नोव्हेंबर १९८८ मध्ये प्रकाशित केली देखील. कादंबरीची जाहिरातही उत्तम केली. पुढे थोडय़ाच दिवसांत ‘पानिपत’ या कादंबरीमुळे लेखक म्हणून विश्वास पाटील आणि प्रकाशक म्हणून दिलीप माजगावकर या दोघांना महाराष्ट्रात ठसठशीत ओळख निर्माण झाली.
शत्रूच्या व्यक्तिरेखेलाही तुम्ही तुमच्या कादंबरीत पूर्ण न्याय दिलाय..
माझं असं स्पष्ट मत आहे की किमान अभ्यास करताना तरी आपण आपल्या शत्रूकडेही मित्रासारखं पहायला हवं. त्याच्या दोषांचा अभ्यास करताना त्याच्यातील गुणांचाही अभ्यास करायला हवा. आपल्याकडे मात्र परंपरागत पद्धतीने शत्रूंना-मुस्लिमांना राक्षसाचे अवतार म्हणूनच रंगवण्यात आलंय. पण मी जेव्हा अब्दालीचा अभ्यास केला तेव्हा मला त्याच्यात नायकाचे अनेक गुण आढळले. आपण महात्मा गांधींना जसं भारताचे राष्ट्रपिता मानतो अगदी तसंच अब्दालीला आधुनिक अफगाणिस्तानचा राष्ट्रपिता मानलं जातं हे फारसं कुणाला माहीतच नव्हतं. तत्कालीन जगातल्या पहिल्या पाच प्रबळ बादशहांपैकी तो एक होता. त्यामुळे एवढय़ा प्रबळ शत्रूशी दोन हात करायला जेव्हा उत्तर भारतातले हिंदू-मुस्लिम राजे, राजपूत सरदार कुणीही तयार होत नव्हतं तेव्हा सह्याद्री पर्वताची सावली सोडून मराठेच दिल्लीच्या पातशाहीच्या संरक्षणासाठी लढायला गेले ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब नव्हे का? आपला ज्याने पराभव केला तो कुणी लेचापेचा सरदार नव्हता तर जगातला अत्यंत प्रबळ असा एक बादशहा होता हेसुद्धा आपण विसरून चालणार नाही. आपण लढाईत पराभूत होऊनही अजिंक्यच ठरलो असं माझं स्पष्ट मत आहे.
पण या लढाईमुळे मराठय़ांच्या स्वाभिमानाचा चक्काचूर झाला.. दिल्लीच्या राजकारणात त्यांचे नाक कापले गेले.. असं बरंच काही म्हटलं जातं. तुम्हाला हे मान्य आहे का?
मला हे अजिबात मान्य नाही.
पानिपतच्या लढाईत मराठय़ांचं कपाळ फुटलं म्हणून गंगा-यमुनेच्या काठावर वावरायला पुढच्या काळात मराठी घोडी कचरली नाहीत. देशाच्या राजकारणात त्यानंतरही मराठय़ांची भूमिका कायम महत्त्वाचीच राहिली. पानिपतच्या लढाईमध्ये शिंदे, होळकर, गायकवाड हे मराठे सरदार आघाडीवर होते. पानिपतच्या लढाईमुळेच या सर्वाना दिल्लीच्या अर्थात उत्तरेतल्या राजकारणाचा अनुभव मिळाला. या अखिल भारतीय पातळीवरच्या अनुभवाच्या जोरावरच शिंद्यांनी ग्वाल्हेरमध्ये, होळकरांनी इंदूरमध्ये तर गायकवाडांनी बडौद्यात आपापली राज्यं स्थापन केली. पानिपतच्या पराभवाची राख कपाळाला लावूनच ते फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उत्तर हिंदुस्तानात दिग्विजयी ठरले.
पानिपतच्या लढाईत महादजी शिंदे यांचा एक पाय निकामी झाला. पण याच मराठा सरदाराने पुढच्या वीस वर्षांत सहा बादशहांना दिल्लीच्या गादीवर बसवलं. इतिहासाने त्यांची दखल ‘किंगमेकर’ म्हणून घेतली आहे हे विशेष.
मी हे जे म्हणतोय त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे पानिपतनंतर अहमदशहा अब्दालीच उलट मराठय़ांना एवढा घाबरला की पुढच्या त्याच्या ३०-४० वर्षांच्या कारकिर्दीत त्याने पंजाब ओलांडून हिंदुस्तानात येण्याचं धाडस एकदाही केलं नाही!
म्हणूनच माझ्या मते ‘पानिपत’ची लढाई म्हणजे मराठय़ांचं ‘पानिपत’ नव्हे, खरं तर तो ‘पुण्यपथ’ आहे.

You can purchase this Marathi novel Panipat here

लोकप्रिय रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या गाजलेल्या ३८ कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद Agatha christie in Marathi

लोकप्रिय रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या गाजलेल्या ३८ कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद

Agatha christie all books in Marathi

लोकप्रिय रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या गाजलेल्या ३८ कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद प्रकल्प ‘पद्मगंधा प्रकाशन’तर्फे हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या १० कादंबऱ्यांचा संच २५ फेब्रुवारी रोजी प्रकाशित होत आहे. नाटककार प्रा. मधुकर तोरडमल यांनी या कादंबऱ्यांचा अनुवाद केलेला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली ही बातचीत..
रहस्यकथा या साहित्यप्रकाराला आपल्याकडे भरपूर वाचकवर्ग आहे. इंग्रजी किंवा अन्य परदेशी भाषांमधून ‘शेरलॉक होम्स’ तसंच अन्य रहस्यकथा- कादंबऱ्या मराठीत अनुवादित झालेल्या आहेत. इंग्रजीतील लोकप्रिय रहस्यकथा लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या गाजलेल्या ३८ कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद प्रकल्प ‘पद्मगंधा प्रकाशन’तर्फे हाती घेण्यात आलेला आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या दहा कादंबऱ्यांचा संच २५ फेब्रुवारी रोजी प्रकाशित होत आहे. ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक प्रा. मधुकर तोरडमल यांनी या कादंबऱ्यांचा अनुवाद केलेला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत..
अगाथा ख्रिस्तीच्या तब्बल ३८ कादंबऱ्यांचा अनुवाद करावा, ही कल्पना कशी सुचली?
ही कल्पना माझी नाही. पद्मगंधा प्रकाशनाचे अरुण जाखडे यांची ही मूळ कल्पना. त्यांनी हे धाडसी पाऊल उचलले. अगाथा ख्रिस्तीच्या सर्व कादंबऱ्यांचे हक्क जाखडे यांनी घेतले. अनुवाद करण्यापूर्वी मी अगाथा ख्रिस्ती यांची एकही कादंबरी वाचली नव्हती. मात्र, त्यांच्या लेखनाशी परिचय होता. कै. विद्याधर गोखले यांनी अगाथा ख्रिस्ती यांच्या ‘विटनेस फ्रॉम प्रॉसिक्युशन’चे ‘साक्षीदार’ या नावाने एक नाटक लिहिले होते. या नाटकात मी भूमिका केली होती. ‘शेरलॉक होम्स’ वाचला होता. एक दिवस अरुण जाखडे अगाथाच्या पुस्तकांचा गठ्ठा घेऊन माझ्या घरी आले. तिच्या
कादंबऱ्यांचा एकहाती अनुवाद त्यांना हवा होता. हे अनुवाद मी करावेत, अशी विनंती त्यांनी केली. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे मी तसा नाटक-चित्रपटांच्या व्यापातून मोकळा झालेलो होतो. घरीच असल्यामुळे मला वेळही होता. सतत कार्यमग्न असलेल्या माणसाला असा रिकामा वेळ मिळाला की अस्वस्थ व्हायला होते. अनुवादाचे हे मोठे काम मिळाल्याने मी कामात व्यग्र राहणार होतो. त्यामुळे मी ‘हो’ म्हटले.
आत्तापर्यंत किती कादंबऱ्यांचा अनुवाद पूर्ण झाला आहे? तुमची अनुवादाची पद्धत कशी आहे?
गेली दोन वर्षे मी अगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्यांवर काम करतोय. ३८ पैकी आत्तापर्यंत २० कादंबऱ्या भाषांतरित करून प्रकाशकांकडे सुपूर्द केल्या आहेत. सध्या २२ व्या कादंबरीच्या अनुवादाचे काम सुरू आहे. संपूर्ण कादंबरीचे वाचन करायचे आणि मग त्याचे भाषांतर करायचे, अशी माझी पद्धत नाही. कादंबरी वाचायला सुरुवात केली की एक-दोन पाने वाचून झाली की त्याचे लगेचच भाषांतर करायचे, अशी पद्धत मी ठेवली आहे.
भाषांतर करताना काय काळजी घेतली?
खरे तर मला या सर्व कादंबऱ्यांचे रूपांतर करायला जास्त आवडले असते. परंतु रूपांतर नको, भाषांतरच हवे, अशी प्रकाशकांची अट असल्याने अगाथाच्या लेखनातील मूळ गाभा कायम ठेवून शब्दश: भाषांतर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. कथानकातील गावांची आणि पात्रांची नावे तशीच ठेवली आहेत. काही कादंबऱ्यांमध्ये तेथील समाजजीवन, त्यांची जीवनशैली, खाद्यपदार्थ, मद्याचे विविध प्रकार, सामाजिक, ऐतिहासिक वर्णने आली आहेत. म्हटले तर त्याचा आपल्या येथील वाचकांशी संबंध नाही. त्यामुळे काही ठिकाणी अनुवादक म्हणून स्वातंत्र्य घेऊन ते वर्णन मी कमी केले किंवा भाषांतरासाठी ते वगळले आहे. तसेच भाषांतर बोजड न होता मराठी वाचकांना ते आपलेसे वाटेल आणि सामान्यातील सामान्य वाचकाला ते कळेल, याची काळजी घेतली आहे.
अनुवाद करताना अगाथा ख्रिस्तीच्या लेखनाची कोणती वैशिष्टय़े जाणवली?
सर्वात प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे या कादंबऱ्यांमध्ये कुठेही एकसुरीपणा नाही. प्रत्येक कादंबरी वेगळी वाटते. वाचकाला आपण रुळलेल्या वाटेवरून जात आहोत, असे अजिबात वाटत नाही. कोणातरी एका व्यक्तीचा खून होणे आणि त्याच्या खुनासाठी काही जणांवर संशय असणे व शेवटी खरा खुनी कोण, याचा उलगडा होणे, असे साधे कथासूत्र असले तरी संपूर्ण कादंबरी वाचकाला अक्षरश: खिळवून ठेवते. वाचक त्यात गुंतत जातो. प्रत्येक कादंबरीचा शेवटही धक्कादायक आहे. यातील प्रत्येक पात्राला स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यामुळे ती खोटी न वाटता वास्तवातील वाटतात. ख्रिस्ती यांची ‘हक्र्युल पायरो’ ही प्रमुख व्यक्तिरेखा ‘शेरलॉक होम्स’पेक्षा वेगळी आहे. त्यांची तपासाची दिशाही वेगळ्या प्रकारची आहे. लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी असल्याने वाचकांना कुठेही कंटाळा येत नाही.
कादंबरी किंवा कोणत्याही कलाकृतीचे रूपांतर किंवा अनुवाद/ भाषांतर यापैकी जास्त आव्हानात्मक काय वाटते?
अन्य भाषेतील साहित्याचे मराठीत रूपांतर करण्याचे काम जास्त आव्हानात्मक आहे असे मला वाटते. अनुवाद/ भाषांतरामध्येही सर्जनशीलता किंवा कौशल्य असले तरी रूपांतर करताना आपली संस्कृती, भाषा, विचार, सामाजिक वातावरण यांचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. समांतर घटना घेऊन हे रूपांतर आपल्या संस्कृतीशी जुळेल आणि आपल्या वाचकांना रुचेल, अशा प्रकारे करावे लागते. भाषांतरात तसे स्वातंत्र्य नसते. तुम्हाला मूळ गाभा तसाच ठेवून केवळ अनुवाद करायचा असतो.
या प्रकल्पाला वाचकांकडून कसा प्रतिसाद मिळेल असे वाटते?
मराठी वाचकांना रहस्यकथा हा वाङ्मयप्रकार आवडतो. रहस्यकथालेखक बाबुराव अर्नाळकर हे याचे मोठे उदाहरण आहे. आज महाराष्ट्रात अगदी खेडोपाडी ते त्यांच्या पुस्तकांमुळे पोहोचले आहेत. त्यामुळे याचेही मराठी वाचकांकडून चांगले स्वागत होईल असा विश्वास वाटतो.

Purchase books here

जगप्रसिद्ध कादंबरीचा सुरस मराठी अवतार "द हॉबिट.' The Hobbit in marathi

गेल्या अर्धशतकात मराठी साहित्यात अनुवाद वाङ्‌मयाची एक उसळी मारणारी लाट आली आहे. स्वतंत्र ललित साहित्याच्या बरोबर किंबहुना काकणभर अधिकच, अनुवाद साहित्याला मराठीत "स्पेस' मिळत आहे. याच प्रवाहातील एक कादंबरी म्हणजे "द हॉबिट.'

जे. आर. आर. टॉल्किन या विख्यात कादंबरीकारानं हे पुस्तक मुलांसाठी लिहिलं. 1937 मध्ये स्वत:च्या मुलांसाठी लिहिलेल्या या कादंबरीनं मग इतर अनेक मुलांना आणि मोठ्यांनाही वेड लावलं आणि वाचकविश्‍वात या कादंबरीनं लोकप्रियता मिळविली.

ही कादंबरी खरं तर टॉल्किनच्याच "द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' या आणखी एका गाजलेल्या कादंबरीचा पूर्वरंग आहे; पण हा पूर्वरंग उत्तररंगाइतकाच नयनमनोहर आणि चित्तचक्षुचमत्कारिक आहे.

"द हॉबिट' ही एक कल्पनारम्य गूढकथा आहे किंवा गूढ अशी कल्पनाकथा आहे. मुलांसाठीच असल्यामुळे तीमध्ये मुलांच्या कल्पनाविश्‍वात जे जे साहसी, धाडसी, गूढ, कल्पनारम्य, अगम्य असे असेल ते ते सर्व या कादंबरीत आहे. मुलांच्या विश्‍वातील मनोव्यापाराला तार्किक व तर्कसंगत प्रश्‍न विचारायचे नसतात किंवा त्या प्रश्‍नांची उत्तरं कार्यकारणभाव सिद्धान्ताचा वापर करून शोधायची नसतात. कल्पनारम्य मनोव्यापार हीच ती संगती आहे.

टॉल्किनने याच सूत्राचा वापर करून "द हॉबिट' लिहिली आहे. पराक्रम, धाडस, जादू, चमत्कार या सर्व गोष्टींची रेलचेल "द हॉबिट'मध्ये असल्याने वाचक त्यात आकंठ बुडून जातो आणि त्यातील ड्‌वार्फसबरोबर त्याचाही प्रवास सुरू होतो. "द हॉबिट' हाच एक चित्तथरारक प्रवास आहे. कारण टॉल्किनने कादंबरीच्या पर्यायी नावातच त्या प्रवासाचे सूचन केले आहे.

"द हॉबिट : किंवा तिथं आणि पुन्हा परत' असं या कादंबरीचं नामकरण लेखकानंच केलेलं आहे. "तिथं आणि पुन्हा परत' या प्रवासाची ही डबलक्राऊन आकाराची 242 पाने आहेत. हा प्रवास प्रदीर्घ, किचकट, अफलातून, रोमांचकारी, कधीकधी कंटाळवाणा, तर कधी कमालीची उत्सुकता वाढविणारा आहे. या प्रवासात बिळं आहेत, टेकड्या आहेत, आगपाणी आहे; आणि एरवीच्या सरळ जीवनात कधीही येऊ शकणार नाहीत असे लोकविलक्षण अनुभव या कादंबरीतील शब्दाशब्दांतून वाचकाला अनुभवायला मिळतील.

एका अनपेक्षित पाटीपासून सुरू झालेला हा प्रवास बिल्बो बघत असतो. ही गोष्ट नेमकी आहे तरी काय? एका श्रीमंत हॉबिटचं नाव होतं बॅगिन्स! एक बॅगिन्स एका धाडसाला कसा सामोरा गेला आणि पूर्णपणे अनपेक्षित अशा गोष्टी कशा करू-बोलू लागला त्याची ही रंजक व रम्य गोष्ट आहे. हे हॉबिट्‌स बूट वापरत नाहीत, कारण त्यांना त्याची गरजच नसते. मोठ्ठं पोट, भडक रंगाचे कपडे, पावलांवर निसर्गत:च मांसाचा जाड तळवा, डोक्‍यावर जाड उबदार तपकिरी केसांचं जंगल, लांबसडक बोटं, असे हे हॉबिट्‌स हसतात मात्र छान!

वर्तुळातून वर्तुळ आणि त्यातून अनेक वर्तुळं निर्माण व्हावीत तसा हा त्यांचा प्रवास असतो आणि प्रवास जसा हॉबिट्‌स, बिल्बो यांचा आहे तसाच तो वाचकांचाही आहे, किंबहुना वाचक हेच खरे या विलक्षण प्रवासाचे प्रवासी आहेत.

सारा निसर्ग उघड्या पुस्तकासारखा लेखकानं वाचकांसमोर मांडला आहे. त्यामुळे या कादंबरीच्या प्रवाहातील गूढरम्यता निसर्गसौंदर्याच्या लयीत जोजवली आहे शब्दमय हे वाचकांना सहजी जाणवेल आणि एक अननुभूत विश्‍वाची शब्दाच्या अनुभूती वाचक घेऊ शकतील.

यातील बिल्बोच्या बरोबर या गूढरम्य दुनियेचा प्रवास वाचक करतो तेव्हा आपण कोणत्या भयंकर वा अभयंकर विश्‍वात बिल्बोसोबत गेलो हे त्याला कळतही नाही; पण नंतर जाणवतं मात्र नक्की!

बिल्बो बॅगिन्स एका प्रचंड मोठ्या आणि अतिशय धोकादायक अशा स्मॉग द मॅग्निफिसंट या ड्रॅगनच्या खजिन्यावर हल्ला करण्याच्या योजनेत सामील होतो. बिल्बो यासाठी नाखूष होता, पण नंतर तो या मोहिमेत युक्तिबाजपणे डोके लढवतो. स्वत:चीच कौशल्ये वापरून स्वत:च चकित होतो.

थोडक्‍यात, "द हॉबिट्‌स' हा एक चकित प्रवास आहे. या पुस्तकाची वैशिष्ट्यं म्हणजे ऍलन ली या जगप्रसिद्ध चित्रकाराची रेखाटने या पुस्तकात आहेत. त्यांची छपाई नयनमनोहर आहे. 1937 च्या या कादंबरीला 1997 मध्ये ऍलन ली यांची चित्रे मिळाली आणि या कादंबरीची वाचनीयता अधिक वाढली. ती दर्शनीय व प्रेक्षणीय झाली. भारतात जरी ही कादंबरी इतकी लोकप्रिय झालेली नव्हती तरी परदेशात तिच्या पताका फडकत होत्या. "द टाइम्स' या जगप्रसिद्ध वर्तमानपत्रात या कादंबरीविषयी लिहिलं आहे.

""इंग्लिश भाषिकांचं जग दोन भागांत विभागलं गेलं आहे. एक म्हणजे ज्यांनी "द हॉबिट' आणि "द लॉर्ड ऑफ द रिंग्ज' ही पुस्तके वाचली आहेत ते आणि जे आता ती वाचणार आहेत ते.'' "संडे टाइम्स' आणि "ऑब्झर्व्हर' यांनीही कौतुक करताना म्हटलंय : ""ड्‌वार्फस आणि एल्व्हज, भीतिदायक गॉब्लिन्स आणि ट्रॉल्स, यांच्या पराक्रमाची उत्तम पद्धतीनं लिहिलेली ही कथा आहे. प्रवास आणि जादूमय धाडसे यांचा उद्‌ध्वस्त करणारा शेवट असल्याने हे पुस्तक म्हणजे भावना उद्दिपित करणारं जणू महाकाव्य.'' ही कलाकृती निर्दोष व अत्युत्तम आहे, असं "ऑब्झर्व्हर' म्हणतो.

महाकाव्याबाबत भारतीय कल्पना वेगळ्या आहेत त्यामध्ये हे पुस्तक समाविष्ट होणे शक्‍य नाही. पण महाकाव्यासारखा प्रदीर्घ कालखंड, विशाल पट, विस्तृत लोकसमूह आणि घटना-प्रसंगांची रेलचेल यामधून मनुष्य स्वभावाचं दर्शन घडविणारं हे पुस्तक म्हणजे अनोखी कलाकृती आहे, यात शंका नाही. मूळ संहितेशी प्रामाणिक असणारा अनुवाद हेच याचं बलस्थान आहे.

हॉबिट , जे. आर. आर. टॉल्किन, अनुवाद - मीना किणीकर,  डायमंड पब्लिकेशन्स,

डॉ. न. म. जोशी


Purchase Marathi book here

Book Summary of The Hobbit

The Hobbit is a tale of high adventure undertaken by a company of dwarves in search of dragon-guarded gold.

A reluctant partner in this perilous quest is Bilbo Baggins, a comfort-loving and unambitious hobbit. Filled with encounters with trolls, goblins, elves, giant spiders, riddles and the discovery of a Ring, this wonderful story also forms a prelude to The Lord of the Rings.

About The Author
John Ronald Reuel Tolkien was born on the 3rd January, 1892 at Bloemfontein in the Orange Free State, but at the age of four he and his brother were taken back to England by their mother. After his father?s death the family moved to Sarehole, on the south-eastern edge of Birmingham. Tolkien spent a happy childhood in the countryside and his sensibility to the rural landscape can clearly be seen in his writing and his pictures.

His mother died when he was only twelve and both he and his brother were made wards of the local priest and sent to King Edward?s School, Birmingham, where Tolkien shone in his classical work. After completing a First in English Language and Literature at Oxford, Tolkien married Edith Bratt. He was also commissioned in the Lancashire Fusiliers and fought in the battle of the Somme. After the war, he obtained a post on the New English Dictionary and began to write the mythological and legendary cycle which he originally called The Book of Lost Tales but which eventually became known as The Silmarillion.

In 1920 Tolkien was appointed Reader in English Language at the University of Leeds which was the beginning of a distinguished academic career culminating with his election as Rawlinson and Bosworth Professor of Anglo-Saxon at Oxford. Meanwhile Tolkien wrote for his children and told them the story of The Hobbit. It was his publisher, Stanley Unwin, who asked for a sequel to The Hobbit and gradually Tolkien wrote The Lord of the Rings, a huge story that took twelve years to complete and which was not published until Tolkien was approaching retirement. After retirement Tolkien and his wife lived near Oxford, but then moved to Bournemouth. Tolkien returned to Oxford after his wife?s death in 1971. He died on 2 September 1973 leaving The Silmarillion to be edited for publication by his son, Christopher.

Click here to Purchase this book in English

स्वास्थ्याचे रहस्य - विक्रमार्क आणि वेताळ Vikram ani Vetal katha - Secret of health

स्वास्थ्याचे रहस्य - secret of health


निश्चयाचा पक्का विक्रमार्क पुन्हां झाडाजवळ गेला, प्रेत उतरवून त्याने ते खांद्यावर घेतले आणि तो स्मशानाकडे चालूं लागला. तेव्हां प्रेतांत लपलेला वेताळ त्याला म्हणूं लागला, ‘‘राजन्, तुझे हे परिश्रम पाहून मला तुझी दया येते आहे.’ तू हे स्वतःसाठीच करतो आहेस कीं इतरांसाठी? स्वतःसाठी कठोर परिश्रम करणारे मी अनेक बहादुर व कुशल वीर पाहिले आहेत. परंतु कधीकधी अशा लोकांचं मन पालटतं आणि ते ध्येय सिद्धी न होताच आपले काम अर्धवट सोडून देतात. तुझा हा हट्ट पाहून मला तर वाटतं कीं कुणालातरी दिलेला शब्द पाळण्यासाठी तू इतके कष्ट सोसतो आहेस. कुपात्रीं दिलेलं दान जसं वाईट, तसंच कुमार्गी व्यक्तिला दिलेलं वचनही तितकंच वाईट! त्याचं उदाहरण म्हणून मी तुला पुष्कर व विलास यांची कथा सांगतो ती लक्ष देऊन ऐक. त्याने तुझा थकवाही कमी होईल.’’ आणि वेताळाने ती कहाणी सांगायला सुरवात केली.

 पुष्कर दिवसभर ढोरमेहनत करीत होता, पण त्याला पोटापुरते उत्पन्नदेखील मिळत नव्हते. त्याची कमाई तुटपुंजी होती. आपले हे दरिद्री आयुष्य बघून तो नेहमी काळजींत असे. त्याला स्वतःची चीड यायची. एकदा एका विवाहसमारंभाच्या ठिकाणीं पुष्करला काम मिळाले. विहिरीचे पाणी रहाटाने काढायचे, मोठी पातेली घांसायची, हे काम होते. दिवसभर पाहुणे मंडळी येत होती. येणार्‍यांचे आगतस्वागत होत होते, स्वादिष्ट पक्वान्नांचे भोजन सर्वांसाठी तयार होत होते. जेवून जाणारा प्रत्येक पाहुणा जेवणाची स्तुती करून, तृप्त होऊनच जात होता. अधूनमधून पुष्करला खायला दिले जात होते. त्यामुळें त्याला सांगितलेली कामें तो मोठ्या उत्साहाने व मन लावून करत होता.
आचार्‍यांच्या चवदार पदार्थांवर खूष होऊन तो त्यांना म्हणाला, ‘‘तुम्हा लोकांचा स्वयंपाक किती चविष्ट आहे! तुम्हाला रोज कुठे ना कुठे कामें मिळतच असतील ना! तुम्ही मलाही तुमच्याबरोबर घेऊन जाल कां? जे पडेल तें काम मी नीट, मन लावून करीन. मलाही रोज पोटभर, सुग्रस जेवण मिळेल, चालेल कां तुम्हाला?’’
ते आचारी हंसायला लागले, ‘‘अरे, तू अगदी भोजनभाऊ दिसतोस कीं रे! आम्ही तुझी ही इच्छा कांही पूर्ण करूं शकणार नाही. कारण आम्हाला इतकी मोठी कामें रोजरोज मिळत नाहीत. जी मिळतात तिथें आमच्यापैकीं एकदोघेजण जाऊन ते काम करतात. आणि वरकामासाठी जी माणसें ठेवतात ना, त्यांची जिम्मेदारी असते नवरा किंवा नवरीच्या आईवडिलांची! असं रोज चारी ठाव जेवण जेवायची तुला इच्छा आहे खरी, पण त्याच्या-साठीं एखाद्या बड्या घरांत तू जन्म घ्यायला हवा होतास!’’
जेव्हां पुष्करने प्रथमच ऐकलं की बड्या श्रीमंत घरांतून रोजच असं चमचमीत जेवण असतं, तेव्हां तो आश्चर्याने थक्क झाला. त्याचा आश्चर्यचकित चेहरा पाहून त्या आचार्‍यांनी विचारले, ‘‘अजूनपर्यंत तू कुणा मोठ्या धनिकाच्या घरीं काम केलंच नाहीस कां? ते लोक घरांतदेखील रेशमी कपडे वापरतात, मऊ मुलायम बिछान्यावर झोंपतात, सारी सुखें त्यांना उपभोगायला मिळतात.’’ त्यांनी पुष्करला उदाहरणें देऊन अनेक गोष्टी सांगितल्या.

 ती सर्व सुरम्य माहिती ऐकल्यानंतर पुष्करला आपले जीवन निरर्थक आहे असे वाटायला लागले. मोठा श्रीमंत माणूस होण्याची त्याला प्रबळ इच्छा झाली. कांहीही करून श्रीमंत व्हायचंच असे त्याने ठरवलं. गांवाबाहेर असलेल्या मठांत एक नवीन साधू आला होता. पुष्कर त्या साधूला जाऊन भेटला व त्याने आपले दुःख त्याला सांगितले.
त्याच्या बोण्यावर साधू हंसतहंसत म्हणाला, ‘‘अरे बाळा, प्रत्येक वृक्ष आपल्या ठिकाणीं स्थिर उभा असतो आणि गोड फळें देतो. नदी ही जीवनदात्री आई असते. ती खळाळत सार्‍या देशभर हिंडते आणि लोकांना प्यायला गोड पाणी देते. या सृष्टीमधें प्रत्येकाचा ढंग वेगवेगळा असतो. कमी वा जास्ती असेल. पण तुला जे सुख वाटतंय ना, ते सुख नव्हे! जे तुला कष्ट वाटत आहेत, ते कष्टही नव्हेत. परंतु एक गोष्ट मात्र सत्य आहे. या संसारात कष्टाशिवाय कुणालाही कांहीही मिळत नसतं, आणि त्याचं पोट भरतही नसतं. ही सारी परमेश्वराची लीला आहे.’’
परंतु या उपदेशाचा पुष्करवर कांहीच परिणाम झाला नाही. त्याने गयावया करत साधूला विनंती केली कीं त्याला श्रीमंत घरांतच राहायचंय म्हणून पुढचा जन्म श्रीमंताघरी व्हावा. तेव्हां साधूने त्याला एक औषधी मुळी दिली आणि म्हटले, ‘‘शेजारच्या गांवातच विलास नांवाचा एक धनवंत आहे. दोन वर्षांपूर्वीं त्याची पत्नी वारली. त्याचे दोन्ही मुलगा व्यापाराच्या निमित्ताने परदेशी गेले आहेत. त्याची एक नातेवाईक बहीण त्याचे घर सांभाळते. तू त्याच्याकडे जा. तुम्ही दोघांनी एकाच वेळेला ही मुळी हातांत धरलीत आणि एकमेकांच्या शरीरांत प्रवेश करायची इच्छा धरलीत कीं तुमची इच्छा पूर्ण होईल. याला परकायाप्रवेश म्हणतात. दोघांच्या शरीराची अदलाबदल होईल.’’
‘‘स्वामीजी, आपण म्हणता कीं विलास धनाढ्य आहेत, व भाग्यवान आहेत. माझ्या शरीरांत प्रवेश करायला ते राजी होतील?’’ पुष्करने आपली शंका व्यक्त केली.
‘‘जरुर राजी होतील. गेली कांही वर्षें तो तुझ्यासारख्या माणसाच्या शोधांत आहे. पण हे ठरवण्यापूर्वीं पूर्णपणें विचार कर. तू तरुण आहेस. तो वयस्कर आहे. या परकाया प्रवेशाचा प्रयोग करायचा म्हणजे तू तुझे वय त्याच्या स्वाधीन करतो आहेस.’’ साधूने त्याला सावध करीत म्हटले.

 ‘‘मला वयापेक्षां सुख जास्ती महत्वाचे आहे. कारण एखाद्या कावळ्यासारखा उभा जन्म घालवण्यापेक्षां मला सहा महिने कां होईना, पण हंसासारखं ऐटींत जगता येईल.’’ पुष्करने निश्चयी स्वरांत उत्तर दिले. ‘‘बाह्यरूपावर जाऊन तू घाईगडबड करुं नकोस. या जगांत कावळ्याकडून आपल्याला काय मिळालं नाही आणि हंसाकडून काय मिळालंय याचा माणसाने पूर्णपणें विचार करुनच कोणताही निर्णय घ्यायला हवा.’’ असं म्हणून साधुने पुष्करला पुन्हां एकदा धोक्याची सूचना दिली.
तरी पुष्करवर त्या बोलण्याचा कांहीच परिणाम झाला नाही. दुसर्‍याच दिवशी तो विलासला भेटायला त्याच्या गांवी गेला. त्याला भेटून पुष्करने आपला मनोदय सांगितला. विलासने खूष होऊन म्हटलं, ‘‘मी तर तुझ्यासारख्या माणसाचीच वाट पहातो आहे. आत्तापासून माझं शरीर हे तुझं आहे आणि तुझं शरीर माझं! जोपर्यंत तुला वाटेल तोपर्यंत आपण असेच राहूं.’’
त्यानंतर त्या औषधी मुळीच्या साहाय्याने त्यांनी एकमेकांच्या शरीरांत प्रवेश केला. परकाया प्रवेश झाला. तेव्हांपासून पुष्कर त्या घराचा मालक झाला आणि विलास त्याचा नोकर बनला. शरीरांत परिवर्तन झाल्यानंतर पुष्करला उत्साहाचे भरते आले. मिठाई खायची तीव्र इच्छा त्याला झाली. त्याने विलासच्या बहिणीला बोलावून सांगितले, ‘‘ताई, आज मिठाई बनवा.’’
तिने आचार्‍यांकडून वीस लाडू बनवले आणि पुष्करमधल्या विलासच्यासमोर ठेवून त्याला म्हटले, ‘‘अरे पुष्कर, ज्या दिवसापासून तू इथें कामाला लागला आहेस, त्या दिवसापासून तुझे नशीब उजळले आहे बघ. तुला जितके लाडू खायचे असतील तितके खा. पण ते मालकांच्यासमोर खायचे हे लक्षांत ठेव. कारण कांही महिने एका आजारामुळें ते बेचैन आहेत. त्या आजाराचे अद्याप निदान होत नाही. जे त्यांना खाता येत नाही, ते नोकरांनी त्यांच्यासमोर खाल्लं कीं त्यांना उलट फार आनंद वाटतो.’’
पुष्करच्या शरीरांतल्या विलासने चार लाडू खाल्ले आणि तो म्हणायला लागला, ‘‘बा वा, अशी मिठाई कित्येक वर्षांत खाल्ली नव्हती.’’ विलासच्या शरीरांतल्या पुष्कर पुटपुटला, ‘‘ज्या शरीरांत मी परकाया प्रवेश केला आहे, ते शरीर भले कितीही रोगांची शिकार असले तरी लाडू खाल्ल्याशिवाय मी कांही राहाणार नाही.’’ आणि त्याने दोन लाडू मटकावले. विलासची बहीण त्याला थांबवत म्हणाली, ‘‘अरे दादा, हे काय केलंस तू? आता झालं ते झालं - आता नदीच्या कांठापर्यंत भराभरा पायी चालत जाऊन परत ये.

 वैद्यबुवा नेहमी तुला सांगत असतात कीं सातत्याने व्यायाम करत राहिल्याने जे कांही खायचं असेल ते तुम्ही खाऊं शकाल. पण तू तर एकदम आळशी आहेस. जरासा देखील पायी चालायला नाखूष असतोस. ही असली सुस्ती चांगली नाही.’’
दोघेही नदीकिनार्‍यापर्यंत भराभरा चालत गेले व परतले. त्यावेळीं विलासच्या रोगग्रस्त शरीरांतल्या पुष्करला एकामागून एक कटकटी निर्माण होऊं लागल्या. यापूर्वीं भरपूर मेहनत करुनही पोटभरण्याइतके मिळत नव्हते. आता हवे ते खायला मिळण्यासारखे असून ते पचवण्यासाठी त्याच्याजवळ एकमात्र उपाय शिल्लक होता. ते होता व्यायाम. म्हणून तो दररोज निरनिराळ्या प्रकारचे व्यायाम करायला लागला. कांही महिने नियमितपणें व्यायाम केल्यानंतर पुष्करच्या शरीरांतले रोग कमी होऊं लागले.
तिकडे पुष्करच्या शरीरांत राहणार्‍या विलासलाही अनेक समस्यांशी सामना करावा लागला. शरीरांत ताकद असूनही नोकराचे काम करण्यांत त्याला जराही इच्छा नव्हती. नुसतं बसून खावं असंच त्याला वाटायचं. जसे दिवस जात होते, तसा विलासच्या शरीरांतला पुष्कर विलासवर जास्त काम लादूं लागला व त्याच्याकडून कामें करवून घेऊं लागला. एक दिवस पुष्करमधल्या विलासने कळवळून म्हटले, ‘‘माझ्यामुळें तू मालक झाला आहेस. म्हणून तू कृतज्ञता म्हणून तरी माझ्याशी आदराने वागायला हवंस. घरकामाला आणखी एखादा नोकर ठेव. मला आराम करुं दे कीं!’’
पुष्करने त्याची मागणी झिडकारत म्हटले, ‘‘मी जसं सांगीन, तशी कामें करीत राहा. नाहीतर आपण पुन्हां आपल्या शरीरांची अदलाबदल करुन टाकूं आणि हवं तसं जीवन जगूं!’’ घरांतली कामें करण्यांत त्रास जरूर होता, पण पुष्करचे शरीर तरुण असल्यामुळें विलासला ते शरीर इतक्या लौकर सोडायची इच्छा नव्हती.
एक वर्ष उलटले. एक दिवस ह्या दोघांना भेटायला तो साधू आला. दोघांनीही त्याला आदराने वंदन केले आणि आपापले अनुभव सांगितले. तेव्हां साधूने पुष्करला म्हटले, ‘‘एक वर्षभर तू विलासच्या शरीरांत राहिलास. संपत्ती जे जे सुख देते, ते सर्व तू अनुभवलंस. आता विलासचं शरीर सोडून दे आणि पुन्हां तुझ्या शरीरांत प्रवेश कर.’’ पुष्कर लगेच म्हणाला, ‘‘मी याला तयार आहे. पण माझी एक अट आहे. त्यानंतर मात्र विलासने मला त्याच्या घरीं नोकर म्हणून ठेवलं पाहिजे.’’
त्यावर विलासने नाराजीने म्हटलं, ‘‘स्वामीजी, मी ह्याला जरुर माझ्याकडे नोकर म्हणून ठेवला असता, पण सध्यां माझ्या शरीरांत असलेला जो पुष्कर आहे, तो कृतघ्न आहे. मी घराचा मालक होतो, तरीसुद्धां ह्याने माझ्याकडून सर्व प्रकारची कामें करवून घेतली, अनेक प्रकारांनी याने मला त्रास दिला आहे. अशा कृतघ्न माणसाला मी कशासाठी माझ्या घरांत ठेवूं? ते न्यायाचं कसं होईल?’’
तेव्हां साधू जरा कठोर स्वरांत म्हणाला, ‘‘ते अगदी योग्य व उचित न्यायाचं होईल. एकमेकांमुळें तुमच्या शारिरीक व मानसिक दोषांतून तुम्ही मुक्त झाला आहात. पुष्कर मुळींच कृतघ्न नाही.’’ असं म्हणून साधूने त्या औषधी मुळीच्या साहाय्याने त्या दोघांना पुन्हां आपापल्या शरीरांत प्रवेश करुन दिला आणि त्यांना आशिर्वाद देऊन तो निघून गेला.
ही गोष्ट सांगून वेताळ राजाला म्हणाला, ‘‘राजन्, साधूच्या बोलण्यामधें ना कांही न्याय, ना कांही नैतिक मूल्य! पुष्करला कृतघ्न नाही म्हणणे हे अयोग्य व चूक नाही कां ठरत? पुष्कर व विलास यांच्यामधे जी खरी समस्या उभी होती, ती सोडून, साधूने आपल्या चतुर वाणीने या समस्येला वेगळेच स्वरुप दिले, आणि निराकरण केले. माझ्या शंकेचे उत्तर माहीत असूनदेखील जर तू मौन पत्करलेस तर तुझ्या डोक्याची अनेक शकले होतील हे लक्षांत ठेव.’’
विक्रमार्क म्हणाला, ‘‘साधू केवळ महान शक्तींचा पूजक होता असे नव्हे, तर मानवी स्वभावाचा उत्तम ज्ञाता ही होता. त्याने पुष्करला कृतघ्न ठरवले नाही, कारण वयस्कर विलासच्या शरीरांत प्रवेश केल्यानंतरच त्याच्या लक्षांत आले कीं ऐषारामी जीवन शैलीमुळें विलास अनेक रोगांची शिकार बनला होता. कोणतेही लहानसे कामदेखील करायची त्याला संवय नव्हती. व्यायामापासून तो कायमच लांब राहिला. हे जेव्हां त्याला समजले तेव्हां त्याचे तरुण शरीर याच रोगाची शिकार होऊं नये म्हणून त्याने विलासला कामाला जुंपले. आपल्या शरीराबद्दल जागरुक राहण्याची व नियमितपणें व्यायाम करण्याची संवय विलासला लावली. अशा तर्‍हेने विलासची प्रकृति सुधारली. अप्रत्यक्षपणें विलासचे पुष्करने भलेच केले. म्हणून त्याला कृतघ्न ठरवणें चूक होते.’’ राजाचे मौनभंग झाल्यामुळें वेताळ पुन्हां शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

     





रत्नकंकण - विक्रमार्क आणि वेताळ Vikram ani Vetal katha


रत्नकंकण


 

निश्चयी विक्रमार्क पुन्हां झाडाजवळ गेला. झाडावरचे शव त्याने खाली उतरवले आणि आपल्या खांद्यावर घेतले. स्मशानाच्या दिशेने तो पूर्ववत चालूं लागला. तेव्हां प्रेतांत लपलेला वेताळ त्याला म्हणाला, ‘‘राजन्, तू थकलेला नाहीस. परंतु तुला सांगून सांगून मी मात्र थकलो आहे. तू राजा आहेस. प्रजेच्या-बाबतीत तुझ्यावर अनेक जवाबदार्‍या आहेत. त्या सर्व विसरुन तू या भयानक जागी इतक्या रात्रीं कां वांया घालवतो आहेस? कार्य सिद्धीसाठी तू जे परिश्रम करतो आहेस, त्याचं कौतुक केल्यावाचून मला राहावत नाही. परंतु या जगांत कांहीजण असे असतात कीं त्यांचे काम ते विनासायास साधून घेतात. आदित्य हा असाच एक तरुण होता. त्याने अनेक कष्ट झेलले, मनस्ताप सोसला. तरी त्याने आपला कार्यसिद्धी पुरी केली. पण अगदी ऐन मोक्याच्या क्षणीं त्या कार्याचे फळही त्याने ठोकरले, व आपल्या हातांतून जाऊं दिले. तुझ्याबाबतीत तू असली चूक करुं नयेस असं मला वाटतं. तुला सावध करण्यासाठी मी त्याची कहाणी तुला सांगतो. नीट लक्ष देऊन ऐक.’’ आणि वेताळाने आदित्यची कथा सांगायला सुरवात केली.


रत्नपुर राज्यांतल्या वज्रपुर नांवाच्या खेड्यांत आदित्य हा तरुण राहात होता. तो खूप हुशार आणि चटपटीत होता. आपल्या आईवडिलांचा मान तो राखीत असे. त्यांची शेती लहानशी होती. त्यामुळें कष्टांचे जे फळ मिळायला हवे ते त्याला मिळत नव्हते. त्याचे वाडवडीलदेखील त्याच परिस्थितींतून गेलेले होते. वज्रपुरांत पाऊस वेळेवर पडला तर चांगले पीकपाणी होत होते. पण पाऊस चांगला पडला तरी चांगले पीक हाती लागेलच याची खात्री नसे. त्याचं कारण होतं. त्या गांवाजवळ असणारी बाष्पधारा नदी. ती नेहमी कोरडीच असे. तिला केव्हां पूर येईल ते सांगता येत नसे. उगमाजवळ जोरदार पाऊस पडला तर अचानक पूर येई आणि गांव आणि शेते जलमय होत असत.
गांवातल्या प्रजाजनांनी ग्रमाधिकार्‍याच्या मार्फत अनेकवेळा सरकारला विनंती केलेली होती कीं त्या नदीवर एक बंधारा बांधून घ्यावा म्हणजे पुराच्या पाण्यापासून गांव सुरक्षित राहील. राजाच्या अधिकार्‍यांमार्फत देखील त्यांनी राजाला विनंती केली होती. पण दुर्देवाने, याबाबतीत राजाने आजपर्यंत फारसे लक्ष दिले नाही. गांवकर्‍यांना गांव सोडून जाणेही शक्य नव्हते, म्हणून दुष्काळी प्रदेश असला तरी ते तिथेच राहात होते.
त्यावर्षीं चांगला पाऊस झाला. यंदा पीक उत्तम येईल व वर्षभर आराम करता येईल याची आदित्याला खात्री होती. आणि झालंदेखील तसंच. पीक चांगलं आलं. मळणी करुन पीक घरी नेण्याची सारी तयारी त्याने केली आणि दुर्देवाने, नदीला प्रचंड पूर आला, नि सारे पीक नष्ट झाले. त्यावेळीं शेतांत गाई बकर्‍यांच्या बरोबर त्याचे आईवडील होते, ते देखील सारे पुरांत वाहून गेले. ते दृश्य बघून आदित्य दुःखाने वेडा झाला. तो धाय मोकलून रडायला लागला. त्यानंतर त्या गावांत राहण्याची त्याला इच्छाच उरली नाही. त्याचे मन विरक्त बनले, व दुःखाने तो तिथून निघून गेला.

दोन दिवस तो चालत राहिला. त्याला कुठे जायचं होतं आणि तो कोणत्या दिशेला जात होता हेदेखील त्याला ठाऊक नव्हतं. तिसर्‍या दिवशी एका वडाच्या झाडाखाली थोडी विश्रांति घेऊन जेव्हां तो तिथून निघाला, तेव्हां त्या झाडींत कांहीतरी चकाकत असल्याचा त्याला भास झाला. त्याने जवळ जाऊन ती वस्तू उचलून पाहिली. ते एक हिर्‍यांचे कंकण होते. त्याच्यावर राजमुद्रा होती. आदित्यने ते कंकण आपल्या कपड्यांत लपवले आणि तो मार्गस्थ झाला.
संध्याकाळपर्यंत तो शशांकपुर या राजधानीच्या वेशीजवळच्या शहरांत पोंचला. जेव्हां तो शहरांतल्या एका रस्त्यावरुन चालला होता, तेव्हां राजाचा एक सैनिक तिथें दवंडी पिटताना दिसला.
‘‘राज्यांतल्या नागरिकांना ही शेवटची घोषणा आहे. कांही दिवसांपूर्वीं महाराजांचे रत्नकंकण हरवले आहे ते अजून सांपडलेले नाही. चोरांचा तपास चालूं आहे. जर हे रत्नकंकण कुणी महाराजांना आणून दिले तर त्याला भरपूर इनाम दिले जाईल. पण जर चोर सांपडला आणि त्याने ते कंकण महाराजांना दिले नाही, तर मात्र त्याला फांशीची कठोर शिक्षा नाईलाजाने द्यावी लागेल. तेव्हां उद्यापर्यंत महाराजांची राजमुद्रा आणून द्यावी आणि बक्षीस मिळवावे हो ऽऽऽ!’’
तिथल्या लोकांशी बोलून आदित्यने त्या रत्नकंकणाबद्दल चौकशी केली, तेव्हां त्याला समजले कीं महाराजांचे पूर्वज प्रत्येक पिढींत ते हिरेजडित कंकण वापरत आले होते. म्हणून महाराजांना त्या कंकणाचे अतिशय महत्व होते. तो पिढीजात दागिना होता. महाराजांनी महिनाभर सतत घोषणा केली होती कीं जो कुणी ते कंकण पौर्णिमेपूर्वीं आणून देईल त्याला भरघोस इनाम मिळेल. जर तोपर्यंत ते कंकण महाराजांच्यापाशी परत आले नाही तर मात्र त्यानंतर ज्याच्यापाशी ते असेल त्याला अटक होईल व त्याला फांशीची शिक्षा होईल. ही दवंडी गांवोगांवी दिली. जात होती परंतु अद्याप कंकणाविषयी कांहीच माहिती मिळालेली नव्हती. ते हरवले होते कीं चोरीला गेले होते याचाही उलगडा झालेला नव्हता. सार्‍या राज्यांत या कंकणाबद्दल चर्चा सुरुं होती. लोक तर्ककुतर्क करीत होते.

शशांकपुरांत आदित्य आणखी दोन दिवस थांबला आणि तिसर्‍या दिवशी तो राजसभेंत गेला. त्याने महाराजांना आदराने वंदन केले आणि भर सभेंत ते हिरेजडित सुंदर कंकण त्याने महाराजांच्यासमोर ठेवले.
ते बघून महाराजांना अतिशय आनंद झाला. त्यांचे डोळे समाधानाने चमकूं लागले. आश्चर्यचकित झालेल्या दरबार्‍यांसमोर महाराजांनी आदित्यला विचारले, ‘‘हे कंकण तुला कुठे नि केव्हां मिळाले?’’
‘‘तीन दिवसांपूर्वीं शशांकपुराच्या वेशीबाहेर असलेल्या रानांतल्या एका वडाच्या झाडाखाली मी थोडी विश्रांति घेतली. उठलो तेव्हां जवळच्या झाडींत कांहीतरी चकाकत असलेले दिसले. निव्वळ कुतुहल म्हणून मी जवळ जाऊन पाहिले तर हे कंकण तिथे कुणीतरी टाकलेले दिसले.’’ आदित्यने सत्य परिस्थिती सांगितली. ‘‘तर मग तू त्याच दिवशी हे कंकण माझ्या-जवळ कां आणून दिलं नाहीस? त्याबद्दल तुला फार मोठं इनाम आम्ही दिलं असतं.’’ महाराजांनी म्हटलं.  कांहीही उत्तर न देता आदित्य निमूटपणें खाली मान घालून उभा होता.
‘‘पौर्णिमेच्यानंतर जो कंकण आणून देईल त्याला कठोर शिक्षा दिली जाईल, हे तुला माहीत होतं कां?’’ महाराजांनी करड्या स्वरांत विचारलं.
‘‘माहीत होतं महाराज’’ आदित्यने मान डोलावीत म्हटले राहिले. नंतर सिंहासनावरुन खाली उतरुन त्यांनी आदित्यला प्रेमाने मिठी मारली व म्हटले, ‘‘तुला जे कांही हवं असेल ते माग.’’
आदित्यने महाराजांना प्रणाम केला व म्हटले, ‘‘महाराज, आपल्या राज्याच्या दक्षिणेच्या टोंकाला वज्रपुर हे छोटेसे गांव आहे तिथला मी रहिवासी आहे. तिथले गांवकरी बाष्पधारा नदीच्याकारणाने फार दुःखीकष्टी आहेत. त्या नदीला एक बंधारा बांधून गांवकर्‍यांची घरेदारे व शेती वांचवावी म्हणून आपल्याला अनेकदा विनंती केलेली आहे.
मी आपला प्रामाणिक नागरिक म्हणून माझे कर्तव्य केलेले आहे. आपण राज्यकर्ते आहात, तेव्हां हा बंधारा बांधणे हे आपले कर्तव्य ठरते. आपण मला आता जायची अनुमती द्यावी.’’ असं म्हणून प्रणाम करुन तो सभेतून मागल्या पावलीं परत फिरला.’’
ही कहाणी सांगून वेताळाने विक्रमार्क राजाला विचारले, ‘‘ते कंकण परत करण्यासाठी महाराजांनी जो अवधी दिला होता, त्यानंतरच आदित्यने ते कंकण राजाला दिले. ही त्याच्यासाठी एक सुवर्णसंधी होती. तो कांहीही मागू शकत होता. पण त्याने नदीवर बंधारा बांधावा अशी इच्छा व्यक्त केली. गांवकर्‍यांचा लाभ होईल अशी योजना त्याने आंखली. त्याने जाणूनबुजून हातांत आलेली ही संधी कां सोडली? माझ्या या शंकेचे उत्तर माहीत असूनदेखील जर तू मौन पत्करलेस तर तुझ्या मस्तकाची अनेक शकलें होऊन पडतील.’’
विक्रमार्क म्हणाला, ‘‘आदित्य प्रामाणिक आहे. त्याला आपल्या श्रमावर पूर्णपणे विश्वास आहे. ते कंकण परत देताना त्याने बक्षिसाची अभिलाषा धरली नव्हती. म्हणूनच त्याने राजाची पौर्णिमेची मुदत संपल्यानंतर ते कंकण परत दिले. स्वतःसाठी कांहीही न मागता जनतेच्या कल्याणासाठी बंधारा बांधावा अशी त्याने राजाला विनंती केली. आपल्या जन्मग्रमाबद्दल त्याला किती प्रेम आहे आणि दुसर्‍यासाठी सत्कर्म करण्याची भावना त्याच्यांत किती आहे हे सिद्ध करणारी ही घटना आहे. त्याचा प्रामाणिकपणा व चांगली बुद्धी बघून राजाने त्याला प्रेमाने मिठी मारली.’’
राजाचे मौनभंग करण्यांत सफल झालेला वेताळ शवासहित अदृश्य झाला आणि पुन्हां झाडावर जाऊन बसला.





 Vikram ani Vetal katha