Sunday, July 15, 2012

आध्यात्मिक अनुभवाचा सहोदर

आमची मॅट्रिकची प्रिलिमिनरी परीक्षा शाळेत चालली होती. रोज तीन-तीन तासांचे दोन पेपर लिहून आणि पुन्हा अभ्यास करून मी थकून गेलो होतो. शेवटला पेपर होता मराठीचा. पेपरात निबंधाला दोन-तीन विषय दिले होते. त्यातला एक लघुनिबंधाला योग्य होता. तो मी निवडला. बाकीच्या प्रश्ानंना उत्तरं ंलिहायची आणि मग शेवटी निवांतपणे त्या मला आवडलेल्या विषयावर लघुनिबंध लिहायचा असं मी ठरवलं आणि त्याप्रमाणे इतर प्रश्नांची उत्तरं लिहून टाकली.

तसं पाहिलं तर ललित लेखनाला अनुकूल अशी तेव्हा माझी शारीरिक आणि मानसिक अवस्था नव्हती; पण का आणि कसं झालं कोण जाणे, पण एकदम तंदी लागल्यासारखं झालं. माझा थकवा, तो परीक्षेचा हॉल, मी बसलो होतो ते बाकडं आणि आमच्यावर कडक नजर ठेवणारे ते पर्यवेक्षकाचं काम करणारे शिक्षक हे सगळं मी विसरून गेलो आणि त्या विषयावर लिहिण्यात माझं मन अगदी रमून गेलं. अनेक रम्य कल्पना माझ्या मनात एकामागून एक फुलं उधळावी तशा उमलू लागल्या आणि मी आनंदाच्या जलाशयात डुंबू लागलो. अगदी भारून गेल्यासारखा मी लिहीत होतो. सुदैवानं परीक्षेचा वेळ संपत आला तेव्हा माझाही निबंध लिहून झाला आणि मी तृप्त मनानं उत्तरपत्रिका पर्यवेक्षकांच्या हवाली केली.

परीक्षा झाल्यावर आम्ही नेहमीप्रमाणे शिक्षकांच्या जवळ 'पेपर तपासून झाले का? मार्क सांगा.' अशी भुणभुण लावली. मराठीत किती मार्क मिळतात याची कोणालाच काळजी नव्हती. तरी पण सवय म्हणून आम्ही मराठीचे पेपर तपासणाऱ्या अलूसरकर मास्तरांच्या मागेही भुणभुण लावली. अलूरकर मास्तर होते चांगले; पण आम्ही सगळे दगड आणि धोंडे आहोत असं ते आम्हाला नेहमी खडसावून सांगत असत. तसंच त्यांनी केलं; पण मला पाहून त्यांनी माझा हात धरला. मला जवळ ओढलं आणि ते सगळ्या मुलांना सांगू लागले की, तुमच्यापैकी एकानं परीक्षेच्या पेपरात अप्रतिम निबंध लिहिला आहे. मी तो निबंध लिहिला आहे, असं ते म्हणेनात! माझा हात त्यांनी कितीतरी वेळ धरून ठेवला होता आणि ते तो कुरवाळीत होते. त्यारून माझ्याच निबंधाविषयी ते बोलत आहेत, हे माझ्या आणि इतर मुलांच्याही ध्यानात आलं. त्यामुळे मी हरखून गेलो. तो निबंध मला बघायला मिळावा असं मला वाटत होतं; पण शाळेच्या नियमांप्रमाणे प्रिलिमनरी परीक्षेचे पेपर मुलांना पाहायला देत नसत. त्यामुळे मला तो कधीच बघायला मिळाला नाही आणि माझ्या मनाला चुटपुट लागून राहिली.

हा जो मला अनुभव आला तो आध्यात्मिक नव्हता; पण त्याचा सख्खा भाऊ म्हणता येईल, असा होता. तपाचरण करताना जशा हालअपेष्टा होतात, तशाच माझ्या परीक्षेचा अभ्यास करताना आणि पेपर लिहिताना झाल्या होत्या आणि मग एकाएकी या मनाच्या व शरीराच्या त्रस्त, विकल अवस्थेतून माझी सुटका झाली आणि साहित्यनिमिर्तीचा विलक्षण, अपूर्व असा आनंद मला लाभला होता.

अशा प्रकारचा अनुभव मला नंतर अनेकदा आला. मी ग्रँटरोड स्टेशनच्या रुक्ष परिसरात काही कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा 'अभिरुची'च्या दिवाळी अंकासाठी मला कथा लिहायची आहे, असं कुठेतरी मनात होतं आणि पाहता पाहता 'कडू आणि गोड' कथेची गोड नायिका मनात आली. मनाच्या डोळ्यांना दिसू लागली. मग तिचा तो काहीसा कडक वाटणारा नवरा अवतरला. मग तिची जाऊ, भावजी आणि सासूबाई आल्या. तिचे सरळसाधे भावोजी आले आणि कथा चाचपडत, रस्ता चुकत मार्गला लागली. तिच्यात अनेक कटू अनुभव होते. तरी ती गोड होते आणि हा गोडवा मध ठिबकावा तसा माझ्या मनात ठिबकू लागला. मुंबईच्या त्या रुक्ष, बकाल भागात मी 'शरीरानं होतो, ठरल्याप्रमाणे कामं करीत होतो; पण मी मनानं त्यातून बाहेर पडलो होतो आणि आमच्या व इतर संयुक्त कुटुंबांच्या घडणीतून, राहणीतून आणि अनुभवातून 'कडू आणि गोड' ही मला व अनेक वाचकांना अव्याजमनोहर वाटणारी कथा मनात आकार घेत होती. असाच अनुभव मला 'ज्वाला' ही कथा लिहिताना आला. त्यात आमच्या गावातलं, पण काहीसं गावाबाहेर असलेलं देवीचं भयाण एकाकी वाटणारं देऊळ एकदम जिवंत झालं आणि आपल्या पोटात दडलेली एक भीषण कथा त्यानं मला सांगितली.

अर्थात साऱ्याच कथा काही अशा सुचत नाहीत. एखादी झोपेत मनात निर्माण होते आणि जागा झाल्यावर मी ती लिहून काढतो. एखादी अर्धवट तयार होते, मनात तशीच पडून राहते अणि मग केव्हातरी ती पुरी होते. हे जे निमिर्तीचे अनेकविध अनुभव मला आले, तसेच अनेकविध अनुभव, परमेश्वराचा शोध घेताना साधकाला आलेले दिसतात. दुर्वासांचा वेगळा, विश्वामित्राचा वेगळा, रामकृष्ण परमहंसांचा वेगळा आणि त्यांचे शिष्य असलेल्या विवेकानंदांचा आणखी वेगळा, ख्रिस्ताचाही वेगळा. याविषयी वाचलं की, माझ्यासारख्या नास्तिकाचं मनही सद्गदित होतं.

- गंगाधर गाडगीळ

No comments:

Post a Comment

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive