Saturday, January 28, 2012

स्वच्छंद प्रवास आणि लोककथांचा अनुवाद Tour and Folk Tales

स्वच्छंद प्रवास आणि लोककथांचा अनुवाद
Tour and Translation Folk Tales  
 
 कर्नाटकातल्या बहुतेक सगळ्या विद्यापीठांनी आपापल्या परिसरातल्या लोककथांचं संशोधन-संकलन केलं आहे. माझ्याकडून तत्परतेनं या लोककथांची निवड होईल आणि एखाद्या नियतकालिकातून मी त्या प्रकाशितही करू शकेन असं वाटलं होतं! पण वेगवेगळी कामं येत राहिली. त्यामुळे हे काम राहूनच जाईल की काय अशी भीती वाटायला लागली आहे... सांगत आहेत प्रसिध्द अनुवादक

> डॉ. उमा वि. कुलकर्णी

आयुष्यात मनात आलेलं सगळं आपल्याला मिळेलच, अशा मानसिकतेत जगणाऱ्या पिढीपैकी मी नसल्यामुळे आयुष्यात काय राहून गेलंय असं आवर्जून आठवूनच बघावं लागेल. प्रथमदर्शनी तर असंच जाणवतं की अनुवाद क्षेत्रात एखाद-दुसरा अनुवाद करून, साहित्य-क्षेत्रात काही ना काही केल्याचं समाधान मिळवत आयुष्य काढता येईल असं वाटत असताना या क्षेत्रात जे काही करायला मिळालं आणि मिळतंय हेच भरपूर आहे.

तरीही अगदी बारीकसे काही कोपरे असतातच. अशा कोपऱ्यांविषयी असमाधान बागळत आयुष्यभर ते कुरवाळणं काही योग्य नसलं तरी, या लेखाच्या निमित्तानं त्यांच्याकडे एक नजर टाकता येईल एवढं खरं!

अगदी लहानपणापासून मला प्रवासाची अपरिमित हौस. इतकी की त्या वेळी मला भटक्या जमातीचा हेवा वाटायचा. (पुढे त्यांची आत्मचरित्रं वाचून त्यांच्या अडचणीही समजल्या म्हणा!) घरी आलेले पाहुणे जायला निघाले की त्यांच्याबरोबर आपणही जावं असं वाटायचं. सात भावंडांपैकी एक असल्यामुळे उगाच गंमतीसाठी प्रवास. हे प्रकरण तेव्हा नव्हतंच. तरीही वर्षाकाठी उसाचं गुऱ्हाळ असेल तेव्हा आम्ही सगळे आमच्या गावी बेडकीहाळला जात असू. तिथं 'कोडीच्या मळ्यावर गुऱ्हाळासाठी जाण्यासाठी आवर्जून बैलगाडी सांगितलेली असे.

त्यातही बैलगाडीनं बेडकीहाळ ने नरसोबावाडी असा जो प्रवास होई तो आजही माझ्या स्मरणात आहे. पहाटे अडीच-तीनला उठायचं आणि दोन बैलगाड्या जुंपून प्रवासाला निघायचं. त्यातली बायका-मुलांसाठीच्या गाडीला सवारी बांधलेली असे. या दोनही बैलगाड्यांची बोरगावच्या खडकाळ माळावर शर्यत लावली जायची. आजही मला आठवणारी कडाक्याच्या थंडीची आठवण इथलीच आहे. माझ्या जीवनातील पराकोटीची थंडी मी भल्या पहाटे अनवाणी, पायी दूधगंगा नदी ओलांडताना आणि त्या नंतर अनवाणी गोट्या-वाळूवरून कसं-बसं धावत जाऊन पुन्हा बैलगाडीत बसेपर्यंत अनुभवली आहे! त्यानंतर आम्ही हिमालयात प्रवास केला. गंगोत्रीला गोमुखापर्यंत जाऊन आलो. अगदी नथुला पासला बर्फवर्षावही अनुभवला. पण मला आजही थंडी म्हटली की तीच थंडी आणि तळपायांना टोचणारे ते नदीकाठचे गोटे आठवतात.

त्यानंतर मात्र आम्हाला गावाकडं टॅक्सीनं नेण्यात येऊ लागलं. प्रवास सुखाचा होऊ लागला आणि बैलगाडीची ती मजा कायमची आठवणीपुरतीच राहिली. तेवढी थंडीही कधी वाजली नाही.

तसा आम्ही पुढच्या आयुष्यातही बराच प्रवास केला. माझे मिस्टर विरुपाक्ष सरकारी नोकरीत असताना दर चार वर्षांनी आम्ही बाहेर पडायचोच. शिवाय माझा प्रबंधाचा विषय 'दविड देवालये हा असल्यामुळे त्याही निमित्तानं दक्षिण भारताचा प्रवास झाला. अनुवादाच्या गरजेनुसार आम्ही कर्नाटकाच्या विविध भागात फिरत असतो. मागं आमची विजय-सुपर होती. तिच्यावरूनही मुंंबई-महाबळेश्वर अशी खूप भटकंती केली. विरूपाक्षांच्या रिटायरमेंटनंतर १९९० साली आम्ही भुसावळजवळच्या वरणगावहून पुण्यालाही तिच्यावरून आलो होतो; आमचा मित्र परिवार आणि नातेवाईकांबरोबरही खूप हिंडलो. अजूनही हिंडत असतो. तरीही... तरीही.

माझ्या मनातलं एक प्रवासाचं स्वप्न आहे. काहीही न ठरवता एक गाडी घेऊन प्रवासासाठी बाहेर पडायचं. मनाला येईल तिथं मुक्काम करायचा. शक्यतो बरोबर तंबू न्यायचा. गावाबाहेर मुक्काम करायचा आणि काही महिने फिरून जेव्हा घराची तीव्रपणे आठवण येईल तेव्हाच घरी परतायचं! अक्षरश: कुठल्या दिशेनं जायचं तेही आयत्या वेळी ठरवायचं. घरी परतल्यावरही 'आपण काय पाहिलं? याचा विचार करायचा नाही. अशी काहीशी माझी अपेक्षा आहे. फक्त सीझन चांगला बघायचा आणि कमी पडणार नाहीत इतके पैसे बरोबर घ्यायचे, भरपूर खायला घ्यायचं.... बस्स!

तशीच आणखी एक इच्छा म्हणजे दिवसच्या दिवस जंगलात काढून तिथल्या प्राण्यांबरोबर रमायचं! भरपूर फोटो काढायचे. ('डिस्कव्हरी चॅनेल बघ त्या पेक्षा असा काहीजण यावर सल्ला देतील. तरीही)

या दोन्ही इच्छा राहून गेल्या आहेत, असंच मी आता तरी मनाते. कारण असा प्रवास करायला आवश्यक असलेला निवांतपणा आता मिळत नाही आणि शरीराची साथ मिळेल याचीही खात्री वाटत नाही.

अजूनही आम्ही प्रवास करत असलो तरी, अशा प्रकारचा प्रवास म्हणजे एक केवळ स्वप्नच असेल. हेही समजायचं वय असल्यामुळे त्याबद्दल खंतही नाही. एक मात्र खरं, भारतातच बघायला खूप आहे असा अनुभव असल्यामुळे परदेश प्रवासाची मात्र अजिबात अपेक्षा नाही.

राहून गेलेली आणखी एक गोष्ट लेखनाविषयीची आहे.

अनुवादाच्या सुरुवातीला मला कारंतांची एक कादंबरी अनुवादित करायची होती. जेव्हा आम्ही परवानगीसाठी कारंतांना विचारलं तेव्हा, त्याचा अनुवाद आणखी कुणी करत असल्याचं समजलं. नंतर मराठीमध्ये ती कादंबरी 'मृत्यूनंतर' या नावानं आलीही. त्यात कारंतांनी कादंबरीच्या माध्यमातून त्यांचं मृृत्युत्तर जीवनाविषयी असलेलं चिंतन मांडलं आहे. 'माणूस जिवंत असेपर्यंत कसा जगतो ते महत्त्वाचं; त्याच्या त्या जगण्यानुसार माणसं त्याची भल्या-बुऱ्या कारणानं आठवण काढतात, हे जितकी वर्ष राहील तेच खरं तर मृत्यूत्तर जीवन असा गंभीर विचार मांडणारी ही कादंबरी आहे. ती अनुवादित करायला मला मिळाली असती तर, मला हवी होती. पण नाही मिळाली. एका कादंबरीचे दोन अनुवाद होऊ नयेत असंही नाही. तरीही राहून गेलं हे मात्र खरं.

त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणजे मला कारंतांचे विचार व्यक्त करणारं पुस्तक ('कारंत-चिंतन' हे मी दिलेलं नाव) अनुवादित करायला मिळाल्यामुळे ही खंत काहीशी कमी झाली आहे.

हा अनुवाद करायची मला संधी मिळाली नसली तरी, ती कादंबरी मराठीत उपलब्ध आहे; ही गोष्ट तरी बरी आहे. पण दुसरी खंत मात्र तशी नाही.

लोककथा हा माझ्या अतिशय आस्थेचा विषय आहे. आधुनिक कन्नड साहित्याचा अनुवाद करतानाही त्या मला वेळोवेळी भेटत असतात. अगदी छोटीशी लोककथाही खूप काही सांगून जाते. मराठी साहित्यात मला त्यांचा अभाव फार जाणवला. कन्नडमधला यावनूर महादेव यांच्यासारखा दलित लेखकही आपल्या कथा-कादंबऱ्यांत ती परंपरा सोडत नाही. तसंच तिथला नाटक हा कला-प्रकारही त्याभोवती अनेकदा फिरताना दिसतो. तो एकीकडे स्थानिक पातळीवर असतो तर, दुसरीकडे सार्वत्रिकही असतो. त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या जिवंत संगीतामुळे जे चैतन्य रंगमंचावर उसळतं ते तर अद्भुत असतं. तिथली बी. जयश्ाीसारखी दिग्दशिर्का याचा प्रभावीपणे वापर करते. गिरीश कार्नाड आणि चंदशेखर कंबार यांच्यासारखे नाटककार एकच लोककथा ऐकून दोन-दोन प्रभावी नाटकं लिहितात... असो.

काही वर्षांपूवीर् डॉ. एम. एम. कुलबुगीर् यांच्याशी बोलताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली. कर्नाटकातल्या बहुतेक सगळ्या विद्यापीठांनी आपापल्या परिसरातल्या लोककथांचं संशोधन आणि संकलन केलं आहे. (इतरही कलांचं तिथं संशोधक-संकलन चालतं) डॉ. कलबुगीर् हे कन्नड भाषेला वाहिलेल्या हंपी विद्यापीठाचे माजी कुलगुरू असल्यामुळे त्यांनी स्वत:च्या संग्रहातले या विषयावरचे ग्रंथ आम्हाला लगोलग काढून दिले. त्या वेळी मला वाटलं. माझ्याकडून तत्परतेनं या लोककथांची निवड होईल आणि एखाद्या नियतकालिकातून मी त्या नियमितपणे प्रकाशितही करू शकेन!

पण त्याच वेळी आम्हा दोघांच्याही हातात वेगवेगळी कामं येत राहिली. (विरूपाक्षही मराठी आणि इंग्लिशमधलं साहित्य कन्नडमध्ये अनुवादित करत असतात.) अजूनही तो ओघ कायम आहे आणि वयोपरत्वे तासन्तास काम करण्याबरोबर जास्तीचं वाचन काढण्यासाठी वेळही मिळेनासा झाला आहे. त्यामुळे यानंतर हे काम राहूनच जाईल की काय अशी भीती वाटायला लागली आहे.

तसं हे काम कायमचं राहून गेलं, तर मात्र मला हुरहूर वाटल्याशिवाय राहणार नाही!

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive