Monday, May 17, 2010

मराठी साम्राज्याचा इतिहास: मराठेशाही : धामधुमीचा काळ -छत्रपती राजाराम महाराज

राजारामाच्या काळापासुन स्वराज्यावरचा एकछत्री अमंल (खर्या अर्थाने) संपला. नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्मान झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपुर, कोल्हापुर, सातारा, बडोदा नंतरच्या काळात ग्वाल्हेर , उज्जेन ईंदोर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती. ती निर्मान का झाली, त्या पाठीमागे पार्श्वभुमी काय हे पाहन्यासाठी आपल्याला राजारामाच्या काळात जावे लागते कारण त्याचा उगम तिथे आहे. नंतर शाहु प्रामुख्याने बाळाजी विश्वनाथ बाजीराव यांनी त्यात फेररचना करुन मराठा मंडळ कसे अस्तित्वात आणले केली हे नंतरचा काही लेखात पाहूयात.

मराठेशाही सन १६८८ ते १७००

प्रस्तुत लेखात आपण छत्रपती संभाजी नंतरच्या मराठा राज्याची वाटचाल पाहानार आहोत. थोरल्या राजांनी जे कामावले ते राखन्याची जबाबदारी छत्रपती संभाजींवर आली ते त्यांनी राखले पण त्यांचा अकाली घरपकडी नंतर हत्ये मुळे मराठेशाहीचा पार कणा मोडुन गेला. स्वराज्यास छत्रपती म्हणुन राजारामाला मंचकावर बसवीले. हा कालावधी या छोट्या हिंदु राज्याला फारच धामधुमीचा, दुष्काळाचा कधी कधी नामुष्कीचा गेला. छत्रपती राजाराम नंतर त्यांचा पत्नी महाराणी ताराबाई यांनी राज्य पाहीले तो काळ गाजविला राज्य (थोडेसे का होइना जिंवत ठेवले) त्या कालावधीस आपण थोडक्यात भेट देऊ.

छत्रपती राजाराम हा सन १६७० च्या २४ फेब्रुवारीला जन्मला. जन्मताना तो पायाकडुन जन्मला म्हणुन सर्वजन चिंतीत झाले असता शिवाजी महाराजांनी हा पातशाही पालथी घालेल असे भविष्य वर्तवीले. (ही कथा) जरी राजारामाने पातशीही पालथी घातली नाही तरी त्याने पातशाहाला मात्र झुंजवत ठेवुन यश मिळु दिले नाही, पातशाही खिळखिळी केली. राजारामास लिहीता वाचता येत होते. मोठ्या भावाप्रमाने तो ना कवि होता नाही स्वैराचारी. राजाराम हा शांत घिरगंभीर प्रकृतीचा होता. राजाराम महाराजांचे लक्ष्करी शिक्षन हे हंबीरराव मोहीत्यांकडे ( स्वराज्याचे सरसेनापती नात्याने सख्खे मामा) झाले. हबिंरराव हे कुडतोजी (प्रतापराव) गुजरानंतरचे सेनापती. प्रतापराव गेल्यावर शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची मुलगी जानकीबाई हिच्याशी राजारामाचे लग्न लावले.

वतनदारीस प्रारंभ

फेब १६८९ रोजी संभाजी महाराजांना पकडले. गादीचा औरस वारस शाहु त्यावेळी वर्षाचा पण न्हवता. त्याला छत्रपती सारख्या महत्वाच्या पदावर बसवायच्या ऐवजी येसुबाई आणि मंत्रीमंडळाने राजारामला बसवायचा निर्णय घेतला लगेच १२ फेब रोजी राजाराम छत्रपती झाले.
राजाराम महाराज छत्रपती जरी झाले तरी त्यांचापुढील परिस्थीती खराब होती. महाराज संभाजी अटकेत होते, मराठे सरदार औरंगजेबाच्या बाजुला झुकले जाऊ लागले. चारीकडुन स्वराज्यावर होनारा हल्ला, स्थानीक लोकांची फंदफितुरी, औरंगजेबाशी लढा द्यायला लागनारा पैश्याची चनचन हे सर्व प्रश्न होते. स्वराज्य तर राखायचे, मराठे शाहीला जिंवत तर ठेवायचे पण हाती बळ नाही, पैसा नाही अशी भिषन परिस्तिथी. औरंगजेबाचे सैन्याने एकाच वेळेस अनेक आघाड्या उघडल्या होत्या ते राजारामाच्या मागेच लागले, ह्यामुळे महाराणी येसुबाईंनी राजारामाला दुर जिंजीस जाउन राज्य राखन्याचा सल्ला दिला. प्रल्दाद निराजी यांना प्रतिनिधी पद ( जे अष्टप्रधानांच्या वरचे होते) देऊ केले. ह्या पदामुळे राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत प्रतिनिधी सर्व निर्णय घेऊ शकत होते. वरिल सर्व परिस्तिथी पाहाता राजाराम महाराजांनी जिंजीला जान्याचा निर्णय लगेच अमलांत आणला. मोगलांचा वेढा स्वराज्या भोवती घट्ट होत होता. राजाराम महाराजांनी गड सोडुन किल्लेदारांना मोठ्या सरदारांना भेट देन्यास आरंभ केला, त्यांना आपल्या बाजुस वळविन्यास बोलनी लावली. बरेच सरदार मोगलांस मिळाले होते, त्यांची चाचपणी केली. होता होईतो मराठा लोकांना एकत्र आणन्यास सुरु केले. पण यात एक मोठी मेख मोगलांनी मारुन ठेवली होती. संभाजीच्या कालावधी शेवटच्या काही वर्षात औरंगजेब स्वतः दक्षिनेत असल्यामुळे मराठा सरदारांना मोगली सत्तेत समाविष्ट करन्यासाठी मोगलांनी वतने द्यायला सुरु केले. फोडा आणि वतने देऊन मराठी लोकांना निष्क्रीय (स्वराज्याचा बाबतीत) करायला सुरु केले होते आणि वतनदारीची पध्दत जी शिवाजी महाराजांनी मोडाली होती ती परत वर आली. याचा आपल्या छोट्या मराठी राज्याला फार तोटा झाला. त्यातच महाराष्ट्रात भिषण दुष्काळ पडला. लालुच, दुष्काळ आणि वतनाचा लोभ हे तिन कारणे एकत्र आल्यामुळे स्वराज्यातील बहुतेक देशमुख, पाटील, सरदार मोगलांना मिळाले.

छत्रपती संभाजीच्या वधानंतर स्वराज्याचा सर्व भाग अगदी काहीच दिवसात मोगली अमंलाखाली आला होता. स्वराज्य राहुन राहुन सातारा-परळी, विशाळगड, रत्नागिरीचा काही भाग मोजकेच दोन्-पाच किल्ले ऐवढे मर्यादित झाले. राजाराम महाराज स्वतः ह्या वेळी पन्हाळ्यास होते. मोगलांनी पन्हाळ्यास देखील वेढा घातला. राजाराम महराजांवर संकटावर संकट येत होती. रामचंद्रपंत जे संभाजीच्या काळात स्वराज्यात अमात्य होते त्यांना "हुकुमतपन्हा" हा किताब दिला गेला प्रतिनिधीस सर्वतोपरी सहकार्य करान्याचे ठरविले गेले. अंधार्या रात्री महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातुन निसटले जिंजीच्या मार्गावर लागले. भवानीने दुसर्यांदा पन्हाळ्यावर महाराष्ट्राला साथ दिली. राजाराम महाराज सुटल्याचे बहादुरखानाला लक्षात आले. तुंगभद्रा नदीतिरी भिषण संग्राम झाला. महाराज स्वत लढत लढत नदित उडी मारुन पळुन गेले. बेदनुरला राणि चन्नामा राज्य करत होती. तिने औरंगजेबाची पर्वा करता महाराजांना आश्रय दिला त्यांची सुखरुप रवानगी जिंजीला केली. जिंजीला महाराजांचे जावई हरजीराजे महाडीक होते पण ते त्याच काळात वारले होते, अशातच राजाराम महाराज तिथे पोचल्यामूळे गोंधळ उडाला, घरच्याच लोकांस मात देऊन राजांनी जिंजी हस्तगत केली.

वर मी जी परिस्तिथी मांडली त्यावरुन राजाराम महाराजांचे कार्य आपल्या लक्षात यावे. छत्रपती शिवाजी, संभाजी यांचा कार्यामुळे दिपलेले आपण राजाराम महाराजांच्या कार्यकडे दुर्लक्ष करतो. जिंजी सारख्या -९०० मैल दुर असलेल्या प्रदेशातुन महाराजांनी ओरंगजेबाविरुध्द दोन आघाड्या उघडल्या होत्या. जवळ पैसे नाही, सरदार नाही, सैन्य नाही अशा काळात सरदारांना परत बोलाविन्यासाठी त्यांनी वतनदारी द्यायला सुरु केली. वतनदारीच्या आमिषा मूळे परत जुने लोक स्वराज्याला सामिल होऊ लागले. एवढीच एक काय ती चांगली गोष्ट. राज्यात दुष्काळ मोगलांची जाळपोळ यामूळे राज्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली. यावर त्यांनी एक सरदारच नेमला जो गावागावत फिरुन गुन्हेगारास शासन देई. राज्य कर्जबाजारी झाले. महाराजांनी हुंड्याचा रुपात वतने द्यायला सुरुवात केली. आणि ईथुनच राज्यावरच्या एकछत्री अंमल संपायला सुरुवात झाली. वतनाप्रमाने सरदार स्वतः फोज फाटा बाळगी जेव्हा राजाला गरज पडली तेव्हा त्याचा साह्यास जाई. ह्यात झाले काय की ते वतनदार त्यांचा वतनापुरते राजे बनले. त्यांचा सैन्यात जे शिपाई असत त्यांचे ईमान हे मुख्य राजा सोबत नसुन वतनदारासोबत असे त्यामूळे "स्वराज्य" ही कल्पनाच नष्ट झाली वतनदारीस सुरुवात् झाली. अवघड लढाई दिसली की हे वतनदार स्वराज्याकडे पाठ फिरवीत मोगलांना जाउन मिळत. एकच वतन अनेक लोकांना यामुळे दिले गेल भलत्याच भानगंडींना स्वराज्याचा न्यायाधिशाला नंतर सामोरे जावे लागले.

अशातच एका मर्द मराठ्याने औरंगजेबाच्या तुळापुर येथील छावनीवर अंधारात हल्ला चढवला प्रत्यक्ष औरंगजेबाच्या तंबुचे सोन्याचे कळस कापुन आणले. "हिमंते मर्दा तो मदते खुदा" या वेळेस ओरंगजेबाचा खुदा मराठ्यांकडुन होता. लगेच् पंधरा दिवसात घोरपडे बंधुनीं झुल्फीकारखाणावर हल्ला चढवुन त्याचे पाच हत्ती पळवुन आनले. मराठी सैन्यातील मुख्य सरदारांची दुसरी फळी तयार व्हायला सुरुवात झाली. स्वराज्यावर आलेल्या अमावस्येत राजाराम महाराजांना उगवत्या सुर्याची किरने लांबवर दिसायला सुरुवात झाली होती.

धनाजी जाधव, संताजी घोरपडे हे दोघे सरदारपण वतनदार होते पण दोघेही देशप्रेम नावाची चिज बाळगुन होते. ह्या दोघांनी परत गनिमी कावा सुरु करुन थोरल्या महाराजांप्रमाने अकस्मात हल्ले करायला सुरु केले. ह्या दोघांसोबत हुकुमतपन्हा, प्रतिनिधी, घोरपडे बंधु (बर्हीर्जी मालोजी) ह्या सरदारांनी अनेक छोट्या आघाड्या उघडल्या. दिवस रात्र पायपिट करुन ही लोक हल्ले करुन अकस्मात माघार घ्यायची. "स्वराज्य" ही कल्पना टिकवुन ठेवन्यासाठी ह्या लोकांनी अहोरात्र मेहनत घेतली.
पुढे जिंजीवरच झुल्फीकारखानाने हल्ला केला. त्याला सोबत होती फ्रेंच सैन्याची. महाराज परत अडचनीत आले. जिंजी किल्ला मोठा कठीन. लढवायला मजबुत. महाराजांनी स्वराज्यात मदतीसाठी सांगावा धाडला आणि दिवसरात्र वाटचाल करत धनाजी जाधव संताजी कर्नाटकात येऊन पोचले. त्यांनी मोगलांचा ( शाहजादा कामबक्ष झुल्फीकारखान) धुव्वा उडवत परत एकदा जिंजीच्या आजुबाजुच्या परिसर जिंकुन घेतला. ह्यानंतर लगेच संताजी राजारामचे काही कारनावरुन बिनसले. संताजी वापस महाराष्ट्रात निघुन आला. पण ईमान बघा या माणसाच, तो मोगलांना वा ईतरांना मिळता स्वराज्यासाठी मरेपर्यंत झुंज देत होता. हे ईमान पैदा केल शिवाजी महाराजांच्या स्वराज्याने. संताजीला एक वैषम्य होते ते म्हणजे महराज जे नविन लोक येतात (मोगलांकडुन फुटून) त्यांना जास्त विचारतात जे जुने आहेत त्यांची काळजी घेत नाहीत. महाराजांनी पत्र पाठवुन निर्धोक राहा असे सांगतीले पण त्याच वेळेस तंबीही दिली होती. नविन लोकांसोबत संताजीचे जास्त जमले नाही त्यामुळे संताजीस त्याची फौज खाली करन्याचा हुकुम पण महाराजांनी दिला सरसेनापतीपद धनाजीला दिले पण संताजीने फौज सोडली नाही, तो लढत राहीला पण स्वराज्याच्या बाजुनेच. स्वराज्यासाठी नामुष्कीची गोष्ट अशी की संताजी धनाजी यात पण एक लढाई झाली. म्हणजे बघा आपण आपापसात पण लढतोय शिवाय मोगलांशीही लढतोय. ओरंगजेबाकडे १४३००० खडी फोज ९६ मराठे सरदार होते यावरुन तुम्हाला राजाराम महाराजांचा लढा किती विचीत्र होता हे कळेल. ह्या लढ्याची तुलना जगातील ईतर ईतिहासाशी होऊ शकत नाही. मला स्वतःला मिर्झाराजा जयसिंगच्या स्वारी पेक्षाही हा काल जास्त महत्वाचा होता असे वाटते कारण मिर्झा राजाच्या वेळेस महाराजांनी स्वराज्याची कल्पना पार शेवटच्या थरापर्यंत रुजविली होती पण गेल्या दशकात ती पुर्णपणे उखडली गेली. मराठी सैन्यात त्यावेळेस साधारण (वतनदारी मिळून) ३० ते ५०००० पण भरत न्हवते. ऐकास साडेतिन असा हा लढा होता. शिवाय मोगलांबरोबर हत्ती, तोफखाना हे सर्व तर आपले सैन्य हे तलवार, बर्च्या ढाली एवढेच घेऊन लढत होते.
१६७९ ते १७०० पर्यंत महाराष्टावर सतत स्वार्या होत्या, दुष्काळ, जाळपोळ यामुळे महाराष्ट्र खचुन गेला. राज्याची तिजोरी नाही, राजा परागंदा, परेशी फौज नाही अशाकाळात वतनदारीशिवाय दुसरा पर्याय राजाराम महाराजांसमोर न्हवता असे वाटते. पण नंतर याचे भंयकर दुष्परीनाम महाराष्ट्राला भोगावे लागले. ते पुढे येतीलच.

सततची धावपळ, सोबत वाईट प्रकृती (बहुतेक अफुचे व्यसन असे काही ईतिहासकार लिहीतात) यामुळे राजाराम महाराज लवकरच वारले. छत्रपती राजाराम वारल्यावर स्वराज्य परत एकदा डळमळीत झाले. राजाराम महाराजांना दोन पुत्र होते. संभाजी (दुसरा) आणि कर्ण. पैकी राजाराम महाराजांच्या मृत्यु नंतर कर्णाला गादीवर बसवल्याचा उल्लेख रिसायसकार करतात पण तो आठवड्यात वारला. गादी परत पोरकी झाली. संभाजी दुसरा हा राजसबाई पासुन झालेला तर राजा कर्ण नाटकशाळेपासुन.

राजाराम हा मूळात शांत स्वभावाचा माणूस होता. त्याने राज्यकारभाराची घडी व्यवस्तिथ घालन्याचा प्रयत्न केला त्यात तो बर्यापैकी यशस्वी झाला. व्यक्तीगत रित्या तो गुणी, धोरणी मुत्सद्दी राजकारणी होता. आक्रस्ताळेपणा त्याचा अंगी न्हवता. धाडसी मनोवृत्तीचे उदा वर आपण पाहीलेच पण त्याने एका पत्रात दिल्लीवर स्वारी करायची इच्छा व्यक्त केली. काल पाहीला तर औरंगजेब दक्षिन गिळंकृत करत होता, पैसे न्हवते, पुरेसे सैन्य न्हवते आणि हा माणूस दिल्लीला घशात घालु हे त्याचा अनुयायांना पत्राद्वारे लिहीत होता. काय म्हणावे ह्या धैर्याला. बेडर वृत्ती, धाडसीपणा की आणखी काही. ( ईतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात, ती लगेच झाली १७२८ ला साली निझामाने पुणे घशात घातल्यावर बाजीरावाने औरंगाबादवर हल्ला चढविला) हे गुण त्याला त्याचा वडिलांकडुन आले. ऐवढेच नाहीतर वडिलांसारखी त्याने सुरतेला तिसरेंदा हल्ला चढविन्याची तयारी केली होती पण ऐनवेळी बातमी फुटल्यामुळे त्यांना मोगली सैन्याशी महाराष्ट्रातच मुकाबला द्यावा लागला ते झाले नाही. राजाराम महाराज महाराष्टात परत १६९८ मध्ये आले. त्यांनी आल्याबरोबर आपल्या पवित्रा बदलला. आजपर्यंत ज्या लढाया झाल्या होत्या त्या बचावासाठी. नंतर ज्या झाल्या त्या आक्रमन करन्यासाठी. मोगली सैन्य मराठ्यांच्या प्रतिकारापुढे जास्त असुनही टिकत न्हवते कारण त्यांचा राजा हाल सोसुन त्यांना लढन्यास भरीस पाडत होता. स्व: स्वार्यावर जात होता. औरंगजेबाने त्याचा युध्दनितीत १६९८ ला परत बदल करुन मोठी चढाई केली त्याला घाबरुन जाऊन परत एकदा जिंजीला जान्याबद्दल बोलने चालले पण त्या बोलन्यास राजाराम महाराजांनी नकार दिला त्यांनी स्वतः अनेक स्वार्या चालु केल्या गदग, वर्हाड येथे जाउन संपती लुटून आणली. महाराज परत एकदा कर्नाटकात गेल्याचा उल्लेख आहे पण त्या स्वारी बद्दल जास्त माहीती नाही. संताजी धनाजी असे दोन थोर सेनापती त्याला लाभले. भरताने जसे रामाचे राज्य स्विकारले तसे राजारामाने शाहुचे (संभाजीचे) राज्य स्विकारले. त्याला छत्रपतीपदाचा मोह न्हवता. कित्येक कागदपत्रात हे दिसुन येईल की तो बरेचदा राज्य थोरल्या भावाचे आहे मी फक्त काही दिवस त्या राज्याची काळजी घेतोय असे सरदारांना लिहीतो. असा थोर राजा महाराष्ट्राला लाभला हे आपले भाग्य. त्यांनी नविन राष्ट्र उदयास आनले ही त्यांची कामगीरी. जुन्या इतिहासकारांनी राजारामवर थोडा अन्यायच केला असे वाटते. नविन पुस्तकात मात्र त्याला जे श्रेय दिले पाहीजे ते दिले जात आहे.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ह्या घटना अनेक पुस्तकांवर आधारित आहेत. त्यातील मला आवडलेले तिन पुस्तक म्हणजे मराठी रियासत - लेखक गो..सरदेसाई, मराठ्यांचा ईतिहास - सपांदक . रा. कुळकर्णी, . . खरे आणि केम्ब्रीज हिस्ट्री ऑफ ईंडीया ( वा भाग), काही माझी ऐतीहासीक पुस्तक वाचुन तयार झालेली स्मरणशक्ती त्यामुळे यात लिहीताना कमीजास्त झाले तर दोष लेखकाचा धरावा. बरेचदा ह्या मोठ्या माणसांचा उल्लेख एकेरीवर् झाला आहे पण तो तेव्हा, तिथे, योग्य वाटला म्हणुन ठेवला आहे. ह्यात त्यांच्या बद्दल अनादर नाही तर रामाला जसे आपण तो राम म्हणताना जी जवळीकता ठेवतो ती आहे.

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive