Monday, July 26, 2010

चोख्याची महारी

चोख्याची महारी

एक शूद स्त्री ज्ञानाची आस बाळगते. त्याचा शोध घेते. स्वत:ला पारखते. समाजाशी झगडते. देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख्ख कण जनांसाठी मागे ठेवत भागवत्धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते. हे सगळंच अचाट आहे.

वारी सुरू आहे. पंढरीच्या वाटेनं लाखो पावलं पांडुरंगाच्या भेटीला निघाली आहेत. पंढरी जवळ येतेय तसतसा पावलांचा वेग वाढतोय. टाळ मृदुंगाच्या नादामधून विठूभेटीची आस पाझरते आहे. अभंगांचे सूर टिपेला पोहचलेत. जातीपंथाचे, गरीब श्रीमंतीचे भेद गळून जातात आणि एकत्वाचं दर्शन घडवत ही पावलं निष्ठेनं चालत राहतात. गेली सात-आठशे वर्ष याच वाटेवरून ही पावलं जाताहेत. तेराव्या शतकात सतरा वर्षांच्या कोवळ्या पोरानं संस्कृत आणि ब्राह्माण्याच्या लोखंडी पडद्याआडचं ज्ञान भावार्थ दीपिकेमधून सामान्यजनांच्या भाषेत रसाळपणे मांडलं आणि तो या समतेच्या क्रांतीचा 'माऊली' ठरला. समाजातल्या सगळ्या स्तरातले लोक या झेंड्याखाली गोळा झाले. ही समतेची गुढी पेलताना त्यांनी छळ सोसला, अवहेलना झेलली पण खांद्यावरची पताका खाली पडू दिली नाही. यांत नामदेव श्ंापिी होता, येसोबा खेचर होता, गोरा कुंभार होता, नरहरी सोनार होता, कुणबी तुकोबा होता, सेना न्हावी होता, सावता माळी होता, दासी जनी होती, गणिका कान्होपात्रा होती...पण या सगळ्या मांदियाळीत वेगळं होतं ते चोखामेळा आणि त्याचं कुटंुब !

 

तेराव्या शतकात मंगळवेढ्याच्या महारवाड्यात जन्मलेल्या चोखामेळ्यानं विठ्ठलाच्या पायाशी उभं राहून जोहार मांडला. जातिव्यवस्थेला चूड लावणारा हा पहिला संत. सोयराबाई त्याची बायको. निर्मळा त्याची बहीण. बंका महार त्याचा मेहुणा आणि कर्ममेळा त्याचा मुलगा. हे अख्खं कुटुंबच जातिव्यवस्थेला प्रश्ान् विचारणारं आणि पददलितांचं जगणं वेशीला टांगणारं पहिलं कुटुंब ठरलं. त्यांचं वेगळेपण असं की आपला सवतासुभा मांडता सगळ्यांच्यासोबत राहून ते आपल्या स्थानासाठी भांडत राहिले. म्हणूनच आज शेकडो वर्षांनी चोखोबांची पालखी ज्ञानोबांच्या पालखीसोबत मानाने मिरवली जाते.

 

आधीच महार आणि त्यात बाई, म्हणजे सोयराबाईचं जगणं आणखी एक पायरी खाली! नवऱ्याबरोबर मेलेली ढोरं गावाबाहेर ओढून नेता नेता या बाईनं सांगितलेलं जगण्याचं तत्त्वज्ञान अचंबित करतं.

 

अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग

 

मी तूपण गेले वाया पाहता पंढरीच्या राया

 

असा नितांत सुंदर अभंग लिहिणाऱ्या सोयराबाईचं स्थान तात्कालिन संतांहून तसूभरही कमी नाही. सोयराबाईचे एकूण ९२ अभंग उपलब्ध आहेत. त्यातल्या बहुतांश अभंगांमधून ती स्वत:चा उल्लेख चोख्याची महारी असा करते. चोखोबाची बायको असं अभिमानानं म्हणवून घेत असली तरी तिनं स्वत:चं वेगळेपण सिद्ध केलं आहे. सोयराबाईच्या अभंगांमधून डोकावणारं तत्त्वज्ञान सोपं आहे. त्यात जड शब्द नाहीत. भाषा साधी, सोपी आणि रसाळ आहे. अभंग आधी स्वत:साठी आणि मग जनांसाठी..आत्मशुद्धी ते परमात्मा.. असा तिचा प्रवास आहे. शुदांच्या सावलीचाही विटाळ होऊन सवर्ण आंघोळ करून शुचिर्भूत होत तो काळ....एक शूद स्त्री ज्ञानाची आस बाळगते. स्वत: त्याचा शोध घेते. स्वत:ला पारखते. समाजाशी झगडते. स्वत:शी, देवाशी वाद घालते आणि त्यातून गवसलेले लख्ख कण जनांसाठी मागे ठेवत भागवत्धर्माच्या मांदियाळीत अढळ स्थान मिळवते. हे सगळंच अचाट आहे.

 

सातशे वर्षांपूवीर् सोवळ्या ओवळ्याच्या कल्पना घट्ट असताना कुणी देहाच्या विटाळाबद्दल 'ब्र' काढायचा विचारही केला नसता पण ही बाई थेट प्रश्ान्च विचारते. देहात विटाळ वसतो मग देह कोणी निर्माण केला?

 

देहासी विटाळ म्हणती सकळ

 

आत्मा तो निर्मळ शुदध बुद्ध

 

देहीचा विटाळ देहीच जन्मला

 

सोवळा तो झाला कवण धर्म

 

सोयराबाईच्या कुटुंबाचा समाजानं भरपूर छळ केला. आयुष्यभर खालच्या जातीचे म्हणून हिणवलं गेलं. मारही खाल्ला. सोयराबाईंच्या अभंगातून ही वेदना शब्दाशब्दांमधून ठिबकत राहते...

 

हीन हीन म्हणोनी का गं मोकलिले परी म्या धरिले पदरी तुमच्या

 

आता मोकलिता नव्हे नित बरी थोरा साजे थोरी थोरपणे

 

विठोबाच्या दर्शनाची आस धरल्याची शिक्षा म्हणून पंढरपूरच्या बडव्यांनी चोखोबाला कोंडून मारलं. कपड्यांची लक्तरं झाली...चामडी लोळवली. हा बहाद्दर पायरीशी उभा राहून थेट विठोबाला 'जोहर मायबाप जोहार' म्हणत सवाल करता झाला, सोयराबाईनेही विठ्ठलाला साकडे घातले.

 

आमची तो दशा विपरित झाली

 

कोण आम्हा घाली पोटामध्ये

 

आमचं पालन करील बा कोण

 

तुजविण जाण दुजे आता

 

देवाला कितीही भेटावंसं वाटलं तरी महारांचे स्थान पायरीशी. परमेश्वरही 'बहुतांचा' ! पायी तुडवल्या जाणाऱ्यांचं सोयरसुतक त्याला कुठे? त्याला दीनांची चाड नाही. हा राग व्यक्त करीत सोयराबाई विठोबालाच खडसावते.

 

कां बा उदार मज केले कोण म्हणे तुम्हा भले

 

आम्ही बैसलोसे दारी दे दे म्हणोनी मागतो हरि

 

घेऊन बैसलासे बहुतांचे गोड कैसे तुम्हा वाटे

 

ही नीत नव्हे बरी म्हणे चोखियाची महारी

 

सोयराबाईंच्या अभंगात जगण्यातलं वास्तव फार रोखठोकपणे येतं. सुखात हजार वाटेकरी असतात दु: तुमचं एकट्याचं असतं, हे तिनं फार साजऱ्या शब्दांत सांगितलंय

 

अवघे दु:खाचे सांगाती दु: होता पळती आपोआप

 

आर्या पुत्र भगिनी माता आणि पिता हे अवघे सर्वथा सुखाचेचि

 

तिच्या अभंगांमधून नाममहात्म्यही पुन्हा पुन्हा येतं. तिचे बरेचसे अभंग या भोवतीच आहेत.

 

सुखाचे नाम आवडीने गावे

 

वाचे आळवावे विठोबासी...

 

हा प्रसिद्ध अभंगही तिचाच.

 

आत्मा परमात्म्याचं नातं उलगडणारी ही विदुषी रांधणारी, घर-संसार सांभाळणारी गृहिणी आहे... अपत्यासाठी आस लावून बसणारी आई आहे... नवऱ्याची वाट पाहणारी स्त्री आहे. साक्षात विठोबाला ती जेवायचं आवतण देते. विदुराघरच्या कण्या आणि दौपदीच्या थाळीतलं भाजीचं पान गोड मानणारा देव गावकुसाबाहेरच्या येसकराच्या घरी जेवेल याची तिला खात्री आहे. सोयरा- चोखोबाला बरेच दिवस मूल नव्हतं. अपत्यप्राप्तीच्या आसेनं कासावीस झालेली सोयराबाई अभंगात भेटते.

 

आमच्या कुळी नाही वो संतान

 

तेणे वाटे शीण माझ्या मना..

 

असं सांगताना उदास असलेली सोयराबाई कर्ममेळ्याचा जन्म झाल्यावर आनंदाने इतकी फुलून आली आहे की ती बारशासाठी विठ्ठल रुक्मिणीलाच निमंत्रण देते.

 

उपजता कर्ममळा वाचे विठ्ठल सावळा

 

विठ्ठल नामाचा गजर वेगे धावे रुक्मिणीवर

 

विठ्ठल रुक्मिणी बारसे करी आनंदानी

 

चोखोबा विठ्ठलभक्तीत रंगून गेलेला. त्याला प्रपंचाची शुद्ध नाही, बायकोची आठवण नाही. सोयराबाईचा हा अभंग विठोबाच्या आडून चोखोबांसाठी आहे हे जाणवते.

 

बहु दिस झाले वाटतसे खंती केधवा भेटती बाई मज

 

तुम्हासी तो चाड नाही आणिकांची

 

परि वासना आमुची अनिवार...

 

भेदाभेद आणि विटाळाच्या वास्तवाची होरपळ सोयराबाईच्या कुटुंबानं आयुष्यभर सोसली. ती त्यांच्या अभंगांमधून संयमितपणे येते. सोयराबाईने आपल्या मुलाकडे कर्ममेळ्याकडे हा वारसा समर्थपणे सोपवलेला दिसतो. आयुष्यभराची अवहेलना, पराकोटीचं दारिद्य, पावलापावलावरचा अपमान हे व्यक्त करण्यासाठी अभंग हे एकमेव माध्यम त्यांच्याकडे होतं. कर्ममेळ्याने आपल्या आईच्या कुशीतून हा विदोहाचा वसा घेतलेला दिसतो. हा पहिला विदोही कवी. आई बापाच्याही पुढे जात त्याने विठ््ठलाशी वाद घातला...

 

आमुची केली हीन याती

 

तुज का कळे श्रीपती

 

जन्म गेला उष्टे खाता

 

लाज ये तुमच्या चित्ता

 

असा रोकडा सवाल विचारत स्वत:च्या श्रद्धास्थानाशी भांडण मांडण्याचे बाळकडू त्याला सोयराबाईनं दिलं.

 

चोखोबाचं श्रेय त्याला थोडंफार तरी मिळालं. सोयराबाईच्या पदरी आली ती उपेक्षाच. मुक्ताई तिच्या भावंडांसोबत आपसूकच मोठी झाली. जनाई नामदेवांसह थोडीफार माहीत झाली. बाकीच्या स्त्रीसंतांच्या वाट्याला मात्र उपेक्षाच आली. ज्या समाजात ती जन्माला आली, ज्यांच्यासाठी तिनं विदोहचा पहिला आवाज दिला, त्या समाजानेही तिची उपेक्षा केली...

 

सातशे वर्ष उलटून गेल्यावरही तिची प्रतीक्षा संपलेली नाही.

 

उदारा पंढरीराया नको अंत पाहू

 

कोठ वरि मी पाहू वाट तुझी....

 

 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive