Tuesday, September 3, 2013

जीवन संगीत


जीवन संगीत



एकदा एका शेतकऱ्याला शेत नांगरताना एक सुंदर संगमरवरी पुतळा सापडला . त्याने तो पुतळा एका जुन्या , दुर्मिळ सुंदर वस्तूंचा हौसेने संग्रह करणाऱ्या गृहस्थाला नेऊन दाखवला . त्या गृहस्थाने त्या शेतकऱ्याला खूप मोठी रक्कम देऊन तो विकत घेतला . तो शेतकरी पैसे घेऊन घरी परत जात असता स्वत : शी म्हणाला , ' पैसा हेच खरं जीवन ! असं असताही हजारो वर्षांपासून जमिनीच्या पोटात दडून राहिलेल्या आणि कुणी स्वप्नातही पाहिलेल्या एका दगडी निर्जीव पुतळ्यासाठी मला इतके पैसे देणारा तो गृहस्थ विचित्रच नाही का ?' इकडे तो पुतळा विकत घेणारा शौकीन गृहस्थ त्या सुंदर पुतळ्याकडे पाहून मनाशी म्हणत होता , ' किती सुंदर ! काय हे जीवन ! जणू एखाद्या कलावंत आत्म्याचं स्वप्नच ! रुक्ष , निर्जीव नाण्यांच्या मोबदल्यात इतकी सुंदर वस्तू देऊन टाकणारा माणूस विचित्रच नाही का ?'

कोणत्याही गोष्टीकडे किंवा घटनेकडे पाहण्याची प्रत्येक व्यक्तीची दृष्टी किती वेगवेगळी असू शकते ! जगाकडे पाहण्याची दृष्टीच एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळी बनवते . परमेश्वराने सर्व व्यक्तींना वेगवेगळे बनवले आहे , सर्व फुलांना वेगवेगळा सुगंध दिला आहे , सर्व वस्तूंना वेगवेगळे रूप दिले आहे ; त्या वेगळेपणातच खरे सौंदर्य आहे . प्रत्येक मनुष्याने स्वत : च्या आत्म्याचे सौंदर्य आणि त्यातील संगीत हे आपल्या गाभार्यात जपून ठेवले पाहिजे . ईश्वराने प्रत्येक व्यक्तीला वेगळे बनवले आहे आणि तसे असण्यातच खरी परिपूर्ती आहे . जिथे स्वरूप आणि स्वभाव यांच्या अनुकूल विकास आहे , तिथेच धन्यता आहे . मानव दु : खी आहे ; कारण तो स्वत : च्याच विरोधात आहे . स्वत : च्या मूळ प्रवृत्तीशीच तो झगडत असतो . तो जो आहे , त्यापेक्षा दुसरं कुणी होण्याच्या संघर्षात नेहमी असतो . दुसरे कोणी होण्याची इच्छा म्हणजेच कामना आहे . इतरांसारखे होण्याच्या कामनेमुळे मनुष्य कायम भविष्यात जगू लागतो .

एके दिवशी येशू आपल्या शिष्यांसह चालले होते . चालता चालता अचानक ते लिलीच्या फुलांच्या झुंडीपाशी येऊन थांबले . येशू म्हणाले , ' बघा ! ही लिलीची फुले सॉलोमनपेक्षाही किती भाग्यवान आहेत .', शिष्य म्हणाले , ' असे कसे म्हणता ? सॉलोमन तर सम्राट ! त्याच्या वैभवाला तुलना नाही . तो हिऱ्या - मोत्यांच्या महालात राहतो . आणि ही रानफुले , धुळीत मिळणारी !' येशू म्हणाले , ' म्हणूनच ही भाग्यवान आहेत . सम्राट सॉलोमन इतर सम्राटांपेक्षा श्रेष्ठ होण्याच्या कामनेमध्ये सदैव भविष्यात जगत असतो ; पण ही फुले प्रवृत्तीने त्यांना जसे बनवले , त्यातच समाधानी आहेत . त्यामुळे ती सदैव वर्तमानात जगत असतात . सॉलोमनची सारी ऊर्जा ही कामना आहे . जेथे कामना असते , तेथे सदैव भविष्याचा विचार असतो .' फुले देठापासून विलग होऊनही सुगंधच देत राहतात , पण माणसाचा देह प्राणापासून विलग झाला , तर त्याला दुर्गंधी येऊ लागते . कारण त्याने आपला देह कामनेसह सोडलेला असतो . फुले देह सोडतात , तेव्हा ती समर्पित होतात , विसर्जित होतात . इतरांसारखे होण्याची कामना नष्ट झाली तर मनुष्य स्वत : जीवनही सुगंधी बनवू शकेल त्याने इतरांनाही आनंदित करू शकेल .

No comments:

Post a Comment

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive