Tuesday, January 1, 2013

'तिच्या' मित्राने जेवण सोडले

" १६ डिसेंबरच्या काळरात्रीने मला दिलेल्या जखमा आयुष्यभर विसरता येणार नाहीत . त्यादिवशी दिल्लीने मला अशा काही जखमा दिल्या आहेत ज्या मला प्रत्येक क्षणी छळत राहणार आहेत . माणुसकीला काळीमा फासणारी ती घटना राहुन राहुन माझ्या डोळ्यासमोर येत आहे ." असे सांगताना त्याला हुंदका आवरला नाही . ही अवस्था आहे दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेत बळी पडलेल्या त्या मुलीबरोबर असणा - या तिच्या साहसी इंजिनियर मित्राची ... आज आपल्या मैत्रीणीच्या मृत्यूच्या बातमीनंतर तर त्याने अन्नपाणीच त्यागलेय .

त्या रात्री बसमध्ये तरुणीबरोबर चढलेला हा २८ वर्षीय तरुण तिच्या मृत्यूची बातमी कळल्यापासून सतत रडत आहे . तिच्या मृत्यूमुळे त्याला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे . त्याने जेवणही सोडून दिल्याचे त्याचे नातेवाईकांनी सांगितले . या मुलाची मानसिक स्थीती सध्या इतकी गंभीर आहे की त्याच्याशी फक्त त्याचे वडिल , मामा आणि जवळचा मित्रच संवाद साधत आहेत . त्याची ते सतत समजूत घालत आहेत . मात्र आपण आपल्या मैत्रिणीला वाचवू शकलो नाही म्हणून त्याला सारखा स्वत : चाच राग येत आहे . आपण ती बरोबर असताना अशाप्रकारची बस का पकडली याचा त्याला पश्चाताप होत आहे . जर ७६४ क्रमांकाची दिल्ली परिवहन मंडळाची बस वेळेत बसस्टॉपवर आली असती किंवा रिक्षा येण्यासाठी तयार झाली असती तर आज आपली मैत्रिण जिवंत असती या विचाराने त्याला सारखे रडू येत आहे .

१६ डिसेंबरच्या रात्री दक्षिण दिल्लीतील साकेत येथून घरी जाताना त्या मुलीचा हा मित्र आणि ती दोघेही त्या नराधमांच्या जाळ्यात अडकले आणि त्यांच्या बसमध्ये बसले . काही अंतर गेल्यावर त्या लोकांनी या मुलाला मारहाण केली . त्या सहा जणांशी हा लढला मात्र त्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला केल्यानंतर त्याची शुद्ध हरपली . त्यावेळी ती मुलगी त्याला वाचवण्यासाठी आली असता त्यांच्यापैकी दोघांनी तिला बसच्या मागे नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यास सुरुवात केली . बाकीच्या तीघांनी या मुलाच्या हाता पायावर रॉडने मारहाण करुन चालत्या गाडीतून त्याला फेकून दिले . बेदम मारहण झालेल्या या मुलाच्या डोक्याला सात टाके पडले आहेत तसेच त्याचा उजवा पायही फ्रॅक्चर झाला आहे .

त्याने पोलिसांना तपासात मदत केलीय . आरोपींची ओळख परेड होईपर्यंत तो रोज बेर सराई येथील घरापासून वसंत विहार पोलिस स्टेशनला पाय दुखत असतानाही चालत जास असे . सकाळी वाजताच तो पोलीस स्टेशनला पोहोचत असे . पोलीस चौकशीच्या गराडयात त्याला रोज रात्री घरी येण्यासाठी खूप उशीर होत असे . त्याने पोलिसांना लहान लहान गोष्टींचीही इंत्यभूत माहिती दिली आहे . त्याच्या जबाबामुळेच आरोपींना इतक्या लवकर पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले . लहानपणापासूनच तो कोणाशीच खूप बोलायचा नाही . मात्र वेळ आल्यास तो आपल्या हक्कासाठी लढत असे . १६ डिसेंबरच्या रात्रीही त्याने साहस दाखवले होते . मात्र दुर्भाग्याने सहा जणांपुढे त्याचा प्रतिकार फार काळ टिकू शकला नसल्याची खंत त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive