Saturday, January 12, 2013

बलात्कार करणाऱ्याचे हात - पाय तोडणे ही शिक्षा योग्य असल्याचे शिवाजी महाराजांना वयाच्या चौदाव्या वर्षी कळले .


Nana.jpg
आजकाल कुणीही उठून जीवन गौरव पुरस्कार देतं . एक लाख रुपये रोख आणि सन्मान चिन्ह ... कलाकारांची किंमत ठरवणारे हे कोण ? यांचा पैसा सरळ मार्गाने आलेला असतो का ? भारत सरकारने ' रत्न ' ठरवलेली मंडळीसुद्धा हे पुरस्कार घेतात तेव्हा वाईट वाटते . असे पुरस्कार स्वीकारणे हा एक प्रकारचा गुन्हाच आहे , असे एकावर एक प्रहार जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी बुधवारी केले .

ठाणे पोलिसांनी आयोजित केलेल्या ' लढा बदलत्या सामाजिक गुन्ह्यांशी ' या चर्चासत्रात नाना पाटेकर बोलत होते . लहानपणापासून मी एवढं भोगलं , असे सांगत ही मंडळी पुरस्कार घेताना आपलं दुःख उगाळत बसतात . दुःखाचं भांडवल करणं हा सर्वात मोठा गुन्हा असून अशा लोकांच्या मुस्कटात मारावीशी वाटते , असा राग नाना पाटेकर यांनी व्यक्त केला . मात्र , ही टिका करताना त्यांनी कुणाचा नामोल्लेख केला नाही .

दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत वक्तव्य करताना नाना पाटेकरांनी समाजातील माणुसकीच्या मुद्द्याला हात घातला . माणूस म्हणून आपल्यातला निर्मळपणा संपत चाललाय . मी , माझं घर , माझी बायको एवढ्यापुरतंच आपलं विश्व मर्यादित झालं आहे . समर्पणाची भावनाच राहिलेली नाही . गरजेपेक्षा जास्त संचय करण्याची वृत्ती वाढली आहे . बाप मेल्यावर भाऊ प्रॉपर्टीसाठी भांडतात . कुठली नातीच शिल्लक राहिलेली नाहीत .

दिल्लीच्या घटनेत मेलेली मुलगी ही आपली बहिण , आपली मुलगी आहे , असं कुणालाच का वाटत नाही ? सगळ्याच गोष्टी पोलिसांवर टाकता येणार नाहीत . या वर्दीचा खाकी रंग आणि इतरांच्या दुःखाच्या संवेदना आपल्यातही झिरपल्या पाहिजेत . त्यासाठी मेणबत्ती आंदोलनाच्या पलिकडे जाण्याची वेळ आता आल्याचे पाटेकर यांनी नमूद केले .

ढाली आहेत , तलवारी नाहीत

समाजात काही अनुचित प्रकार घडला तर आम्ही दुसऱ्याकडे बोट दाखवणार . माझ्यावर वार होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार . सभोवताली घडणाऱ्या गोष्टींशी आपलं काही देणं घेणं नाही , अशी मानसिकता संपत नाही तोपर्यंत गुन्हे घडतच राहणार . स्वतःच्या रक्षणासाठी आज सर्वांकडे ढाली आहेत पण तलवार नाही , अशा शब्दांतही पाटेकर यांनी कोरडे ओढले .

विकृती चिंताजनक

लोकसंख्या वाढली की गुन्हे वाढणार ; परंतु , या गुन्ह्यांमधली जी विकृती वाढत आहे त्याची चिंता वाटते . बलात्कार करणाऱ्याचे हात - पाय तोडणे ही शिक्षा योग्य असल्याचे शिवाजी महाराजांना वयाच्या चौदाव्या वर्षी कळले . आपल्याला मात्र या गुन्ह्याला काय शिक्षा द्यायची ते आजही कळत नाही , अशी नाराजीही पाटेकरांनी व्यक्त केली .

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive