Tuesday, September 3, 2013

प्रार्थनेचा सौदा

एकदा एका तुरुंगात फाशीची शिक्षा झालेल्या एका कैद्याचं आगमन झालं. ज्या दिवसापासून तो आला , त्या दिवसापासून तो तुरुंग त्याच्या ईश्वरभक्तीने निनादून गेला. त्याच्या प्रभू स्मरणाचा क्रम जवळजवळ रात्रंदिवसच चालू होता. पहाटेपासूनच त्याच्या पूजा आणि प्रार्थना यांना प्रारंभ होत असे. उठता-बसता , चालतांनाही त्याचे ओठ रामनाम घेत होते , हातात माळेचे मणी फिरत होते. त्याच्या चादरीवर देखील राम-रामच लिहिले होते. जेव्हाही त्या तुरुंगाचे अधिकारी निरीक्षणासाठी येत असत , तेव्हा त्याला साधनेत मग्न असलेला पाहत होते. त्याच्या ईश्वरभक्तीमुळे आणि धार्मिक उत्कटतेमुळे कारागृहातील इतर कैदी आणि तुरुंगातील अधिकारीही त्याचा आदर करु लागले होते. एके दिवशी अशी बातमी आली की त्या कैद्याची फाशीची शिक्षा रद्द करुन ती सात वर्षाच्या कारावासात रुपांतरित झाली आहे. सर्वांना खूपच आनंद झाला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी कारागृहाचे निरीक्षक पाहणी करण्यासाठी आले , तेव्हा त्यांना आढळले की तो कैदी निवांत झोपला आहे. त्याची रामनामाची चादर आणि माळ उपेक्षित अशी एका कोपऱ्यात पडलेली होती. अधीक्षकाला वाटले , कदाचित आज प्रकृती बरी नसावी. त्याने कैद्याला उठवले , आणि विचारले , '' ब्राह्ममुहूर्त टळून बराच काळ होऊन गेला. आज पहाटेची पूजा प्रार्थना करायची नाही का ?'' तो कैदी म्हणाला , '' आता कसली पूजा ? देवाकडून जे काम करवून घ्यायचं होतं , ते पुरं झालं आहे. त्या बिचाऱ्याला आता व्यर्थच त्रास देणं उचित नाहीये. ''

आपल्या सर्वांच्या प्रार्थनादेखील त्या कैद्याप्रमाणेच एक सौदा आहेत. आपण पाहतो , मंदिरांच्या बाहेर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. त्यापैकी बहुधा सर्वच जण ईश्वराशी सौदा करण्यासाठी आलेले असतात. त्यांचे खरोखरच परमेश्वरावर निस्सीम प्रेम असते असे काही नाही. संसारातील भय-भीतींपासून वाचण्यासाठी ते फत्तध् एक आसरा शोधत असतात , संसारातील प्रलोभनांमध्ये सहाय्यक होण्यासाठी फक्त लोक त्याची प्रार्थना करतात. ज्यांचे आयुष्य संपत चाललेले असते , ते पुढचा जन्म चांगला असावा यासाठी ईश्वराकडे आश्वासन मागत असतात. परंतु प्रार्थनेत जोपर्यंत कुठली मागणी आहे , तो पर्यंत ती प्रार्थना परमात्म्यासाठी नसतेच. प्रार्थना जेव्हा मागणीतून मुक्त होते , तेव्हा ती प्रार्थना बनते. स्तुती म्हणजे प्रार्थना नव्हे , तर खोटी प्रशंसा आहे , लाच आहे. प्रार्थना म्हणजे स्तुती नाही , तर ती कृतज्ञतेची अत्यंत गूढ अशी भावदशा आहे.

बरेच लोक मंदिरांमध्ये दर्शनाला जातात , ते काही मागण्यासाठीच जातात असे नव्हे. केवळ एक रुढी म्हणून ते सर्व पूजा पाठ करतात. घरातले लोक , नातेवाईक , आजूबाजूचे सर्वच लोक दर्शनाला जातात , म्हणून तेही जातात. त्यामुळे त्यांच्या सर्व कृतीमध्ये एक यांत्रिकपणा येऊन जातो , त्यामध्ये प्रार्थनेचा अंश शिल्लक राहत नाही. प्रार्थना म्हणजे पूजा नव्हे आणि प्रार्थनेसाठी काही विशिष्ट पूजागृहेही नाहीत. प्रार्थनेचा बाह्य कर्मकांडाशी काही संबंध नसतो , तर ती स्वत:चीच अंतरतम जागृती आहे. त्यामुळे ईश्वराकडे कधीही मागू नये , कारण आपण जे मागतो , त्यापेक्षा अधिक देण्यासाठी परमात्मा उत्सुक असतो - ' बिन माँगे मोती मिले , माँगे मिलै न भीक। '

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive