Thursday, November 15, 2012

धोक्याची घंटा घणघणते आहे...

वसु म्हणजे 'प्राण' किंवा 'जीवन'. जीवनाची धारणा करते ती 'वसुंधरा'. पृथ्वीची ही असाधारण क्षमता आता झपाट्याने नाहीशी होत आहे. मातीची धूप आणि खडकांच्या नाशामुळे दरवर्षी १६ हजार कोटी घनमीटर एवढ्या पाण्याच्या साठ्याची हानी होत आहे. जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत. फक्त एकट्या चीनमध्ये दरवषीर् १० हजार ४०० चौ. कि.मी. या वेगाने वाळवंटीकरण वाढत आहे. दररोज सुमारे दोनशे जीवजाती पृथ्वीवरून कायमच्या अस्तंगत होत आहेत. १९८४ सालापासून अन्नधान्य उत्पादनात सातत्याने घट होत आहे. अतिमासेमारी आणि किनारपट्ट्यांचा नाश, प्रदूषण यांमुळे मासळी कमी झाली. २०५०पर्यंत हा प्रथिनांचा साठा संपुष्टात येईल असा अंदाज आहे.

पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तापमानात होणारी वाढ ही अतिशय चिंतेची बाब ठरली आहे. वातावरणातील वाढत्या कार्बनच्या प्रमाणामुळे त्याच्या उष्णता वाढविणाऱ्या गुणधर्मामुळे आणि घडणाऱ्या बदलांमुळे त्याला मिळत असलेल्या चालनेमुळे तापमान वेगाने वाढत आहे. १७५० सालात म्हणजे औद्योगिकरण सुरू झाले तेव्हा वातावरणाच्या दर दहा लाख भागात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण २८० भाग इतके होते. आता ते ३९० भाग एवढे झाले आहे आणि दरवषीर् त्यात दोन भागांची भर पडत आहे. यामुळे तापमान दर दशकात ०.२ अंश सेंटिग्रेडने वाढत आहे. पृथ्वीचे हजारो वषेर् साधारण १५ अंश सेंटिग्रेडवर स्थिर राहिलेले सरासरी तापमान गेल्या अडीचशे वर्षांत एक ते दीड अंशाने वाढल्यामुळे गेल्या वीस वर्षांत वादळांची वारंवारिता आणि तीव्रता वाढली आहे. अवर्षणे आणि अतिवृष्टी यांचे आतापर्यंत न अनुभवलेले आविष्कार घडत आहेत. सतत महापूर येत आहेत.

वातावरण बदलावर काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाला (आय.पी.सी.सी.) तसेच इतरही संस्थांतील शास्त्रज्ञांना असे वाटते की, जर तापमान औद्योगिकरण सुरू होण्याच्या आधीच्या काळापेक्षा २ ते २.४ अंश सेंटीग्रेडने वाढले तर आशिया, आफ्रिका, युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका खंड, आणि ऑस्ट्रेलिया या भागांत दुष्काळ, वाळवंटीकरण, पूर आणि कृषि उत्पादन घसरणे असे दुष्परिणाम होतील. सुमारे ४० टक्के झाडांच्या जाती व जीवजाती नष्ट होतील.

' आय.पी.सी.सी.'च्या मते कार्बन डायऑक्साईड व तत्सम वायूंचे प्रमाण दर दहा लाख भागांत ४२० भाग एवढे झाले तर सरासरी तापमान दोन अंशाने वाढू शकते. याचा अर्थ धोक्याची घंटा घणघणत आहे. दरवषीर् दोन भाग या गतीने फक्त पुढील पंधरा वर्षांत तीस भागांची वाढ म्हणजेच ४२० भाग, हे कार्बनचे प्रमाण असेल. याचा अर्थ पृथ्वीवर आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दोन्ही ध्रुवांवरील व हिमालय, आल्प्स, अॅडीज, किलीमांजारो या पर्वतांवरील बर्फ वितळून नष्ट होत आहे, सागरांतील आम्ल पातळी वाढत आहे, टंड्रा विभागातील व ध्रुवीय प्रदेशातील बर्फाच्या साठ्याखाली दडलेला मिथेन वायू वातावरणात पसरू लागला आहे. बर्फ वितळल्यामुळे ध्रुवीय सागर सूर्यकिरणांचे परावर्तन करू शकत नाहीत. उलट उष्णता जास्त सामावून घेतात. वाढत्या तापमानामुळे जंगलांतील वणवे लागण्याचे प्रमाण जगभर तिपटीने वाढले आहे. तापमानात २ ते ३ अंशाने वाढ झाल्यावर अॅमेझॉनसारख्या जंगलांचे वणवे व दुष्काळ यांच्यामुळे गवत तयार करणाऱ्या क्षेत्रांत (सवाना) रूपांतर होणार आहे. कार्बन रिचवणारी जंगले गेल्याने दुष्टचक्र अधिक वेग घेईल. याचवेळी सागरातील प्रवाळ मृत होत आहेत. 'जेम्स लव्हलॉक' या अमेरिकन पृथ्वीतज्ज्ञाच्या मते वातावरणातील कार्बन डाय ऑॅक्साईडचे प्रमाण दहा लाख भागांत ५०० भाग झाले तर सागरातील शेवाळ ही कार्बन मोठ्या प्रमाणावर रिचविणारी वनस्पती मृत होण्याची गती वाढेल. पृथ्वीच्या वातावरणाचे, तापमानाचे स्वयंनियंत्रण करणारी ही यंत्रणा नाहीशी झाली तर जगाचे तापमान आतापेक्षा अचानक ६ अंशाने वाढेल. अशा वेळी फक्त कॅनडा, सायबेरिया, उत्तर युरोप, दक्षिण ध्रुवाजवळील काही थोडी ठिकाणे एवढ्या भूमीतच माणसे वस्ती करू शकतील.

' आय.पी.सी.सी.'चे अहवाल निखळ सत्य मांडत नाहीत, ते राजकीय तडजोडी करून तयार केले जातात. अगदी अलीकडे केलेली संशोधने टाळली जातात आणि फक्त गणिताने विश्लेषण होऊ शकणाऱ्या संशोधनाचाच समावेश केला जातो, असा अनेकांचा आक्षेप आहे. हवामानातील बदलांचे वेग व तीव्रता याबाबतचे मूल्यमापन प्रत्यक्षापेक्षा खालच्या पातळीवर केलेले असते, असे प्रत्यक्ष पुराव्यामुळे आढळले आहे. उदा. आय.पी.सी.सी.च्या २००७च्या अहवालानुसार उत्तर ध्रुवावरील उन्हाळ्यातील बर्फाचे डोंगर या शतकाच्या शेवटी पूर्ण वितळतील. परंतु प्रत्यक्षात असे आढळते की, १९६०च्या दशकापासून बर्फ वितळण्यास सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत ८० टक्के बर्फाचे डोंगर वितळून गेले आहेत. यावरून असा अंदाज बांधण्यात येतो की, सन २०३०पर्यंतच ते पूर्णपणे वितळून जातील. मात्र आय.पी.सी.सी.सारख्या संस्थांचा गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न पाहता असे वाटते की, तापमानवाढीने, आताच जेथून परत फिरता येणार नाही असा, विनाशाचा टप्पा पार पाडला असावा.

डॉ. हॅनसेनसारख्या शास्त्रज्ञांच्या मते जर वातावरणातील कार्बनचे प्रमाण दर दशलक्ष भागांत ३५० भाग (३५० पीपीएम) या सुरक्षित पातळीवर न्यावयाचे असेल तर जगाने ताबडतोब खनिज इंधनांचा वापर बंद केला पाहिजे. यातून हे स्पष्ट होते की, प्रत्येक दिवशी होणारा कोळसा, तेल, वायू आणि पूर्ण इंधन चक्राचा विचार केल्यास अणूचा (युरेनियम)देखील वापर आपल्याला अटळ आणि अपरिवर्तनीय अशा भीषण संकटाच्या दिशेने नेत आहे. या पार्श्वभूमीवर भारताप्रमाणे अनेक देशांत जल्लोषात अधिकाधिक मोटारी रस्त्यावर येताहेत, चंदपूरला कोळसा आणि सागरात तेल उत्खननाच्या योजना येताहेत तर रशिया व कॅनडा अलास्काजवळच्या सागरतळातील तेलावर हक्क दाखविण्यासाठी मध्ययुगीन पद्धतीने तेथे झेंडा रोवताहेत.

चलनावर आधारलेली आणि ठोक राष्ट्रीय उत्पन्नाला (जी.डी.पी.) प्रमाण मानणारी 'अर्थव्यवस्था' आणि प्रबोधनयुगाचा वारसा सांगणारे 'विज्ञान' या दोन गोष्टी याच्या मुळाशी आहेत. पाश्चात्यांच्या अर्थशास्त्रातील 'जी.डी.पी.'तील वाढ ही काही गोष्टींच्या, उत्पादनांच्या विक्रीच्या किंमतीतील वाढ आहे. वाढत्या उत्पादनासाठी वाढता यंत्रवापर आणि त्यासाठी वाढता ऊर्जावापर, वीजवापर, धातूंचा वापर अनिवार्य बनतो. 'माणूस हे वासनांचे गाठोडे आहे' हे या अर्थशास्त्राचा प्रथम प्रवक्ता असलेल्या, १७७६ साली वेल्थ ऑफ द नेशन्स हा ग्रंथ लिहिणाऱ्या अॅडम स्मिथचे आवडते घोषवाक्य आहे. उपभोग ही नैसगिर्क गोष्ट आहे, परंतु नफ्याचाच विचार करणाऱ्या अर्थव्यवस्थेत उपभोगवादापायी उत्पादनासाठी यंत्रांचा आणि पर्यायाने ऊर्जास्त्रोतांचा अमर्याद वापर होत राहिला. यातून पृथ्वीवर काय संकट ओढवले आहे ते आपण पाहत आहोत. या खनिज ऊर्जास्त्रोतांचा वापर २०१५ सालापर्यंत शिखरावर जाईल, असा अंदाज आहे. त्यानंतर खनिज स्त्रोतांच्या उपलब्धतेला उतरती कळा लागेल. नूतनीकरणक्षम ऊर्जास्त्रोतानी त्यांची जागा घेण्याची वेळ कधीच निघून गेली आहे. मात्र या झोप उडवणाऱ्या घडामोडींबाबत जगातील शिक्षित वर्ग उदासीन आहे. पर्यावरण ही काही तरी विशेष महत्त्वाची नसलेली बाब आहे आणि तंत्रज्ञान निसर्गाला पर्याय देईलच अशा विश्वासात हा तंत्रमोहीत समाज बेफिकीर आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive