Saturday, November 17, 2012

बाळासाहेब... राज ठाकरेंच्या मनातले

Cartoon of Balasaheb... by  Raj Thackeray


राज ठाकरे यांच्यामध्ये लोकांना बाळासाहेब दिसतात... मग ते त्यांचे बोलणे असो, चालणे असो किंवा व्यंगचित्रांमधून एखाद्याची ' काढणे ' असो...
राज यांना याबाबत छेडले तर ते म्हणतात की, ज्यांच्या अंगाखांद्यावर लहानाचा मोठा झालो, त्यांची सावली माझ्यावर पडणारच ना ?
खरंच राज ठाकरे ही बाळासाहेबाची सावली आहे. आज ही सावली वेगळी झाली असली तरी तिची निष्ठा, भक्ती, श्रद्धा बाळासाहेबांशी अखंड जोडलेली आहे. म्हणूनच आजही बैठकीच्या खोलीत राज यांच्या खुर्चीमागे बाळासाहेबांचा फोटो आहे. बाळासाहेबांचा विषय निघाला की ते हळवे होतात, त्यांच्या आवाजात कंप जाणवतो...
बाळासाहेबांनी कितीही शिव्या घातल्या तरी त्याला मी प्रत्युत्तर देणार नाही असे सांगणारे राज आपला हा संकल्प पाळण्याचा सतत प्रयत्न करतात...
२६ जुलैच्या पावसात बाळासाहेब एवढ्या पाण्यातून बोटीमधून राज यांच्या घरी आले. बाळासाहेब लीलावतीत दाखल झाल्यावर सारे-सारे विसरून राज तडक हॉस्पिटलमध्ये पोहोचले. एवढेच नाही तर ते घरी परतल्यावर सारे दुःख पचवून मातोश्रीच्या पाय-या चढले...
पक्ष सोडला तरी बाळासाहेब हे राज ठाकरे यांच्या मनातले कायमच हळवे पान राहिले आहे. शिवसेना सोडताना बाळासाहेबांना विठ्ठलाच्या विटेवर उभे केल्यापासून आजपर्यंतच्या त्यांच्या अनेक विधानातून राज यांच्या मनातलं बाळासाहेबांचं स्थान सगळ्यांना दिसलंय. राज यांच्या मनातले बाळासाहेब दाखवणारे हे काही उद्गार...

..........................................

बाळासाहेबांचे वय झालेय , अशी भाषा करणा-या अबू आझमीच्या गाडीबाहेर हे शेंबडे उभे राहतात. ऐसा क्यों बोला... ऐसा क्यों बोला.. एवढंच विचारतात. अरे , गाडीबाहेर काढून हाणला पाहिजे होता त्या अबू आझमीला... पण काहीही अंगाला चिकटवून घ्यायला तयार नाहीत हे आता. बाळासाहेबांच्या कृपेने खूप काही कमवून ठेवले , आता नकोत त्या भानगडी... असे म्हणत अंगावर साधी केस घ्यायला तयार नाहीत. मनसेचे आमदार असते तर चांगले ठोकून काढले असते ...

(१ डिसेंबर २००९ ला झालेल्या मनसेच्या मेळाव्यात )

..........................................


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चित्र काढायचे झाले तर अजूनही मी त्यांना बाणशय्येवर पडलेल्या भीष्म पितामहांसारखेच दाखवेन... बाळासाहेबांची अवस्था आज तशीच आहे. वाईट वाटते मला. पण काय करणार त्याला ?

(ऑक्टोबर २००९ )

..........................................

' मतभेदाचा प्रश्नच कुठे येतो हो ! ... घर हे घर असतं...त्यामुळे बाळासाहेबांबद्दल अजूनही तितकंच वाटतं...त्यांची रोज आठवण येते...आजही बाळासाहेबांना खूप ' मिस ' करतो... '

राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्याला आता तीन वर्षं झाली , पण बाळासाहेबांशी त्यांचे ऋणानुबंध आजही कायम आहेत. मधल्या काळात बाळासाहेबांनी जाहीर भाषणात राज यांना चार खडे बोल सुनावले , त्यांच्यावर टीकाही केली. परंतु ती शिवसेनाप्रमुखांनी मनसेप्रमुखांवर केलेली टीका होती. पडद्यामागे काका-पुतण्याचं नातं मात्र तितकंच हळवं आणि आदराचं होतं. प्रत्येक आजारपणात राज यांचं बाळासाहेबांना भेटायला जाणं , व्यंगचित्रांबद्दल फोनवरून चर्चा करणं , हे सगळं सुरूच होतं. अगदी आजही राज ठाकरेंना रोज बाळासाहेबांची आठवण येते.

' गेल्या काही महिन्यात आमचं फोनवरून बोलणं झालेलं नाही. पण त्याआधी होत होतं. शेवटी घर हे घर असतं , तिथे मतभेदाचा काही प्रश्नच नाही '

(सप्टेंबर २००९ )

..........................................

शिवसेनाप्रमुखांवर माझी नितांत श्रद्धा असून त्यांचेही माझ्यावर प्रेम आहे. मात्र महाराष्ट्राचे प्रश्न जर कोणाच्या माध्यमातून सुटत असतील तर त्यांना निश्चितच आनंद होईल.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गेल्या ४० वर्षांत मराठी माणसांविषयी जे काही काम केले ते पक्षाच्या कार्याध्यक्षांना किती समजले ? लोकसभा निवडणुकांआधी छटपूजा आणि उत्तर प्रदेश दिन कोण साजरा करीत होते ? मराठी भाषा आणि मराठी माणूस यांच्या उत्कर्षासाठी आंदोलन सुरू असताना शिवसेनेचे खासदार का गप्प होते ? मराठी भाषेविषयी यांना प्रेम नसून हे लोकसभा निवडणुकांनंतर सुचलेले शहाणपण आहे.

(सप्टेंबर २००९)
..........................................


शहरात १९९५ पर्यंतच्या झोपड्या कायम करण्याचा निर्णय शिवसेना-भाजप युतीच्या काळात घेण्यात आला असून तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अंधारात ठेवून हा निर्णय घेतला.

(ऑगस्ट २००९ )

..........................................


बाळासाहेबांनी काय प्रतिक्रिया दिली , ते त्यांचे प्रेम आहे , अधिकार आहे . त्यावर मी काहीही बोलणार नाही . पण बाकीच्यांनी बकबक करायची नाही . स्वतः उद्धव ठाकरे यांनी महेश जेठमलानी या अमराठी उमेदवरालाच मत दिले ना ? बाळासाहेंबांनी मला काहीही बोलावे मी त्याला प्रत्युत्तर देणार नाही . त्यांनी घातलेल्या शिव्याही माझ्यावरचे प्रेम आहे . पण त्यांच्या आजुबाजुला असणा - या कोणीही काहीही बोललेले खपवून घेतले जाणार नाही

( मराठी माणसाचा दुष्मन तो माझा दुष्मन असे बाळासाहेब म्हणाले होते . त्यावर २२ मे २००९ रोजी षण्मुखानंद सभागृहात )

..........................................

नुसता मुद्दा माझा म्हणून काही चालत नाही , त्यासाठी कृतीही करावी लागते. गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेने जे जाहीरनाम्यात लिहीले तेच आताच्या जाहीनाम्यात दिले आहे. शिवसेनेने मराठी माणसांसाठी केवळ प्रयत्न केले. पण कृती कधी केली नाही.

(बाळासाहेबांनी मराठी हा शिवसेनेचा मुद्दा म्हटले त्यावर एप्रिल २००९ मध्ये)

..........................................

बाळासाहेब ठाकरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अग्रलेख लिहिणे थांबवले आहे. त्यांच्यासाठी दुसराच व्यक्ती अग्रलेख लिहित आहे. पूर्वी त्यांचे विचार लिहिले जायचे मात्र आता शिवसेना प्रमुखांच्या नावाने आपले विचार मांडण्याचे काम सामना या वृत्तपत्रात होत आहे. बाळासाहेब आता या बाबत काहीच करू शकत नाही. हा मुद्दा शिवसेनेने उचलून नाही असे मी म्हटले आहे का ? शिवसेना काहीच कामाची राहिली नाही , असे तरी मी म्हटेल आहे का ? मी म्हटले की हा महाराष्ट्राचा अपमान आहे. तुम्ही राज्याचा नेत्याचा अपमान करतात. तेव्हा तो त्या राज्याचा अपमान होतो. असेच मी शरद पवारांच्या बाबतीत ३ मे रोजी बोललो होतो.

(शोभा डे यांना ऑक्टोबर २००८ मध्ये दिलेल्या मुलाखतीत)

..........................................

या मा.शिवसेनाप्रमुखांविरुद्धच्या हक्कभंग नोटीशीला प्रथम मी सामोरा जाईन.महाराष्ट्राचे महानेते ही आमची भूषणे आहेत.ते माझे काका आहेत ही वेगळी गोष्ट.त्यांचा पक्ष वेगळा आहे याचीही मला जाण आहे.पण महाराष्ट्राच्या अस्मितेला दिल्लीने आणि उत्तरेने आकसाने नेहमीच पायदळी तुडवलेले आहे.हे पक्षापलिकडचं आहे.आम्ही हे होऊ देणार नाही.

महाराष्ट्रात रक्ताचे पाट वाहतील.दिल्लीच्या गोळ्या संपतील.पण मा.शिवसेनाप्रमुखांपर्यंत हक्कभंग समितीसमोर उभं राहण्याची नोटीस पोहोचणार नाही.नाही म्हणजे नाहीच ! वाटल्यास कायदे बदला.घटनादुरुस्ती करा.जनता सार्वभौम आहे पण जनता सार्वभौम असेल तर त्यात महाराष्ट्राची जनताही येतेच.तिचा असा अवमान मी व महाराष्ट्र नवनिर्माण सेना करू देण शक्यच नाही. नपेक्षा तुम्हाला आमच्या प्रेतांवरून जावं लागेल.

(सप्टेंबर २००८, लोकसभेच्या हक्कभंग समितीने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना नोटीस देण्याच्या शक्यतेला राज यांनी आव्हान दिले होते. त्यावेळी जनतेला उद्देशून लिहिलेले पत्र)

..........................................


बाळासाहेबांनी माझे फोटो वापरू नकोस असे म्हटल्यावर मी होर्डिंगवरची त्यांची छबी काढली , पण माझ्या हृदयातील त्यांची छबी कोण काढणार.

( फेब्रुवारी २००६ )

..........................................

माझा वाद विठ्ठलाशी नाहीच मुळी , त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. आजपर्यंत
बडव्यांमधूनच मी माझ्या विठ्ठलाचं दर्शन घेत आलोय. पण हे मंदिर माझ्या विठ्ठलाचं , बडव्यांचं नाही...

(नोव्हेंबर २००५)

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive