Monday, May 7, 2012

What is menstrual cycle? पाळीचक्राबद्दलची पूर्ण माहिती

 पाळीचक्राबद्दलची पूर्ण माहिती

डॉ. कामाक्षी भाटे / डॉ. पद्मजा सामंत

शाळेतल्या मुलींना ‘वयात येताना’बद्दलची माहिती देता यावी म्हणून सर्व विज्ञानाच्या शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करायचे होते. प्रशिक्षणाच्या वेळी हिरिरीने सहभागी होणाऱ्या शिक्षिका सरावाच्या वेळी मात्र थोडय़ा बावरायच्या. ‘तुम्हीच घ्या नां! आम्ही काही डॉक्टर नाही!’ असं म्हणायच्या. शरीराबद्दलची ही मूलभूत माहिती आपल्याच लेकींना देता येण्यासाठी डॉक्टर असण्याची गरज नाही.
१९८० च्या सुमारास लोकविज्ञान चळवळीने जोर धरला होता. आमची एक मैत्रीण सुकन्या आगाशे हिने ‘मासिक पाळीचक्रा’बद्दल एक ‘शास्त्रीय स्लाइड शो’ बनविला आणि त्याला पूरक म्हणून रचलं ‘न्हाणांचं गाणं’ - साधा हाताने हलवायचा स्लाइड शो- त्या गाण्याच्या साथीमुळे इतका मनोरंजक आणि माहितीपूर्ण झाला होता की, त्याचा वापर करून कितीही वेळा वस्तीतल्या मुलींसाठी आरोग्य शिक्षण घेतले तरी प्रत्येक वेळी मला स्वत:लाच काही तरी नवं शिकल्यासारखं वाटे. प्रश्नांची उत्तरे नवनवीन पद्धतीने कळत होती. सुकन्या काही डॉक्टर नव्हती आणि मी मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते. जे मला मेडिकल कॉलेजमध्ये शिकायला मिळालं नाही ते सुकन्या जाणत होती, लोकांपर्यंत आरोग्याबद्दलची माहिती सोप्या पद्धतीने पोहोचवायची क्लृप्ती!
या गाण्यातून पाळीचक्राबद्दलची पूर्ण माहिती दिली जाई. ‘न्हाणं’ म्हणजे मुलीतून ‘स्त्री’ बनल्याचा उत्सव! पाळीतलं रक्त अशुद्ध नसतं, पाळीचक्र मेंदूतील स्रावांच्या नालावर चालतं - अंडाशयात अंडी बनण्याची यंत्रणा असते, पण त्यावर मेंदूच्या असलेल्या नियंत्रणामुळे केवळ परिपक्व अंडेच बाहेर पडते - प्रत्येक परिपक्व अंडे फलित होऊ शकते - झाले तर त्याच्या वाढीसाठी होणारी गर्भाशयाची तयारी - अंडाशयातील इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे गर्भाशयात पेशींची बनणारी गादी - जर फलित अंडे या गादीवर विसावले तर त्याचे पोषण व्हावे म्हणून गादीत तयार होणाऱ्या रक्तवाहिन्या - फलित न झालेले अंडे या पेशींच्या गादीवर बसूच शकत नाही. हे कसे आपोआप नष्ट होते - फलित अंडय़ांची वाट पाहून कंटाळलेले गर्भाशय व अंडाशय आपले स्राव आकसून घेतात. मग ती पेशींची गादी व रक्तवाहिन्यांचे जाळे हळूहळू सुटे होऊन, पाळीच्या रूपाने योनीमार्गावाटे बाहेर फेकले जाते. हे बाहेर टाकण्यासाठी गर्भाशयसुद्धा आकुंचन पावते. हे सर्व टप्पे, मेंदू, गर्भाशय, अंडाशय इत्यादींच्या रंगीत चित्रांद्वारे या स्लाइड शोमधून अतिशय रंजक पद्धतीने समजावले जाते.
स्त्री शरीराच्या या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियांची शास्त्रशुद्ध माहिती अगदी तळागाळातल्या अशिक्षित किंवा अर्धशिक्षित आरोग्यसेविकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महिलांच्या गटांनी ‘बॉडी मॅपिंग’चा वापर केला. याबद्दल नेमकं सांगायचं तर त्यांनी शरीराच्या नकाशात वेगवेगळ्या अवयवांची चित्रे मांडली. त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध दाखविला. डोळ्यांना दिसणाऱ्या बाह्य़ांगांपासून, न दिसणाऱ्या अंतस्थ अवयवांपर्यंत माहिती देत नेणे आरोग्यसेविकांना सोपे जाते आणि मुली व त्यांच्या पालकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे ही सोप्या पद्धतीने मिळतात.
मुलींना पाळीच्या वेळी ओटीपोटात का दुखते? गर्भाशयात दर महिन्याला पाळीनंतर पेशींचा नवा थर व त्यात नवीन रक्तवाहिन्या बनतात. गर्भाशयाचा रक्तपुरवठाही वाढतो. पाळी येते तेव्हा पेशींचा थर व रक्तवाहिन्यांचे जाळे पडून जाताना गर्भाशय आकुंचन पावते, त्यामुळे ओटीपोटात, कंबरेत दुखू शकते. अंतस्रावामुळे काही मुलींना या काळात बद्धकोष्ठ तर काही मुलींना किंचित पातळ जुलाबही होतात. जसजसे वय वाढते आणि अंतस्रावांच्या चढउतारांची शरीराला सवय होते तसे हे दुखणे थोडे सुसह्य़ होते. या काळात वेदनाशामक गोळ्या घेण्यापेक्षा निदान सुरुवातीला तरी गरम पाण्याच्या पिशवीचा शेक घेऊन पाहावा, थोडी विश्रांती घ्यावी, योगासनांनी हे त्रास बऱ्याच अंशी कमी होतात.
अनेक मुली, स्त्रियांच्या मनात डोकवणारा आणि कुणाकडे न बोलता येणारा दुसरा प्रश्न म्हणजे पाळीच्या वेळी वास का येतो? अनेकजणींचा असा समज असतो की, पाळीचे रक्त अशुद्ध असते. कदाचित त्यामुळेच वास येत असावा! पण हे खरे नाही. हे रक्त शुद्धच असते. सकाळी शाळा-कॉलेजला निघालेली मुलगी कधीकाळी अख्खा दिवस कपडा, पॅड बदलू शकत नाही, तिला साबण आणि पाणी वापरून शरीराची स्वच्छता राखता येत नाही, शिवाय हे रक्त योनीमार्गातून बाहेर पडत असल्याने त्यात योनीस्राव मिसळल्याने हा वास येतो.
रुग्णालयात येणाऱ्या अनेक स्त्रियांची तक्रार अशी असते की, पूर्वी कसं भरपूर जायचं, आता एकदम कमी जातं! विशेषत: ज्या तरुणी गर्भधारणा होत नाही म्हणून चिंतित असतात त्या इतरांच्या स्रावाच्या प्रमाणाशी आपल्या रक्तस्रावाची तुलना करतात.
पण शास्त्राप्रमाणे सांगायचं तर ३० ते ८० मिलिमीटर रक्त स्त्रीच्या पाळीत जाते. काही मुलींना पहिल्यापासून तीन-चार दिवस अधिक आणि नंतर थोडेसे डागच- अशा प्रमाणात जाते. काहींना दोन ते तीन तर काहींना पाच-सहा दिवस कपडे घ्यावे लागतात. मग योग्य ते कोणते प्रमाण?
आपणा सर्वाची उंची, वजन, बांधा, चेहरेपट्टी, भूक, तहान सारखं असतं का हो? नाही ना, मग हा रक्तस्रावही सारख्याच प्रमाणात असेल असं नाही. जे पहिल्यापासून नैसर्गिकरीत्या होतं ते नॉर्मल असं म्हणायला हरकत नाही. मग त्याचं प्रमाण वाढलं, जास्त गाठी पडू लागल्या, दुखू लागलं तर ते अयोग्य! जर पहिल्यापेक्षा रक्तस्राव कमी झाला, दोन पाळ्यांतलं अंतर वाढलं तर ते अयोग्य! आता या दोन पाळ्यांतल्या अंतराचं परिमाणही काही ठरलेलं नाही.
२२ ते २५ दिवस पाळी सामान्य म्हटली जाते, पण जिची २२ दिवसांची पाळी ३२ची होते अथवा ३२ दिवसांची पाळी २२ दिवसांची होते तिने वैद्यकीय सल्ला घ्यावा.
आता असं पाहा; धमन्यातलं शुद्ध रक्त लालभडक असतं आणि नीलांमधलं जरासं गडद रंगाचं! ज्यांना अगदी अतिरक्तस्राव होतो त्यांना कधी कधी अगदी नळ सुटल्यासारखं लालभडक रक्त जातं. कधी कधी रक्त योनीमार्गात साठून राहून त्याच्या गाठी होतात. खूप वेळ शरीरातच राहिल्या तर त्या गाठींचा रंग काळपट होतो.
पॅड घ्यावं की कपडय़ाची घडी?
नवनवीन प्रकारच्या पॅड्सच्या जाहिराती टेलिव्हिजनवर रोज पाहायला मिळतात. स्वच्छ नवं पॅड दर सहा-सात तासांनी घेता आलं तर उत्तमच, पण सर्वाना ते परवडतं का? ज्यांना परवडत नाही त्यांनी काय करायचं? स्वच्छ सुती कापडाची घडी घेतली, वेळेवर बदलली, मुबलक पाणी व साबणाने धुऊन स्वच्छ सुकवली आणि आपला घडय़ांचा संच वेगळा स्वच्छ जागी ठेवला तर पुरेसं आहे.
पॅड्स कशी टाकावीत? कुठे टाकावीत? पॅड्स कधी संडासात टाकून देऊ नयेत. त्याने पाइपांमधल्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो व पॅड्सचे गठ्ठे अडकून सांडपाणी साचते. शक्यतो पॅडचे रक्त धुऊन टाकून पॅड कागदात बांधून कचऱ्यात टाकावे, नाही तर रक्ताने थबथबलेल्या पॅडच्या वासाने उंदीर-मांजरं कचरा उकरतात.
हाच प्रकार बाळांच्या, वृद्ध रुग्णांच्या डायपर्सचाही होताना दिसतो!
टॅम्पून म्हणजे काय? कोणी वापरावा? कोणी वापरू नये?
खूप शोषण क्षमता असलेल्या कापसाची, छोटय़ाशा चिरुटासारखी दिसणारी घट्ट वळकटी म्हणजे टॅम्पून असं म्हणता येईल. हा मुलीही वापरू शकतात. फक्त काही मुलींना योनीमार्गात टॅम्पून घालायची कल्पना थोडीशी भीतीदायक वाटू शकते. टॅम्पून बाहेर काढण्यासाठी एक छोटीशी दोरी असते. ती पकडून वापरलेला टॅम्पून योनीमार्गातून बाहेर काढता येतो. ज्या स्त्रियांचा योनीमार्ग अनेक वेळा प्रसूती झाल्यामुळे सैल झालेला असतो त्यांच्यासाठी टॅम्पून वापरणे गैरसोयीचे ठरते.
माझ्या सासूबाई अत्यंत प्रेमळ होत्या. आम्हाला खाऊपिऊ घालायला, कपडालत्ता वापरू द्यायला त्यांनी कधीच हात आखडला नाही, पण त्यांचे त्यांच्या वर्षांच्या लोणची, छुंदा वगैरे पदार्थावर फार कडक लक्ष असायचं.
पाळी असताना त्या आम्हा सुनांना कधी लोणच्याला हात लावू देत नसत.
पाळी म्हणजे वाईट, विटाळ, अशुद्ध, बाहेरचं - शब्दच किती बोलके आहेत नाही का? या समजुती आपल्या स्त्रियांमध्ये आणि त्यामुळे मुलींमध्ये अगदी घट्ट मूळ धरून बसलेल्या आहेत.
खरं तर लोणची, पापड या अशा वस्तू आहेत की, त्या बिघडायला पाण्याचा एक शिंतोडासुद्धा पुरतो. हवेतली आद्र्रता वाढली की यावर बुरशी येते. या वस्तू बनविताना स्वच्छतेची खूप काळजी घ्यावी लागते. पाळी जाऊन दहा वर्षे झालेल्या स्त्रीकडून जर स्वच्छतेमध्ये हयगय झाली तर लोणच्या, पापडांना बुरशी येते. पापडखाराचं प्रमाण कमीजास्त झालं तर पापड लाल होतात, त्यासाठी पाळी आलेल्या स्त्रीचा हात लागण्याची गरज नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पापड, लोणच्यांच्या कारखान्यांत शेकडो महिला काम करत असतात. त्यातल्या निदान पाचदहा टक्के महिलांना पाळी आलेलीच असते. तरीही हे पदार्थ अगदी प्रगत देशांमध्ये निर्यात करण्याच्या दर्जाचे असतात.
पाळीच्या वेळी देवळात गेलं तर चालतं का?
खरं तर वस्तीत काम करताना अनेकदा विटाळशी बसणं, बेनमाज होणं यावर बरीच चर्चा व्हायची. या काळात केलेली प्रार्थना जर फळत नसली तर त्या महिलेचा वाली कोण? प्रत्यक्ष परमेश्वरालाही आई लागते आणि तिला आई होण्यासाठी पाळी यावी लागते. अशी अंकुरणाऱ्या बीजाचं संगोपन करणारी, आपल्या रक्ताने बाळाला घडविणारी मासिक पाळी अशुद्ध कशी?
पण या समजुतीचा पगडा अगदी उच्चशिक्षित स्त्रियांच्या मनावरसुद्धा असतो. त्यामुळे अनेक मैत्रिणी, बहिणी, भाच्या, सहकारी पूजेसाठी, गणपतीसाठी, प्रवासासाठी, लग्नकार्यासाठी पाळी पुढेमागे करणाऱ्या गोळ्यांचं नाव मागतात. मग त्यांना पेपर काढून, तपासून घ्यायला या म्हणून सांगावं लागतं. मैत्रिणी गैरसमज करून घेतात. एक गोळी लिहून द्यायला हिचं काय जातं? असं त्यांना वाटतं.
यात दोन-तीन मुद्दे आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हार्मोन्सच्या गोळ्या अगदी पूर्णपणे सुरक्षित असे समजू नये. त्यांचे शरीरातल्या अनेक महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होत असतात. काही प्रकारच्या गोळ्या (उदा. आकडीच्या आजारावरील गोळ्या) चालू असताना हार्मोन्सच्या गोळ्यांचा प्रभाव होत नाही. म्हणून सुजाण डॉक्टर स्त्रीला तपासल्याशिवाय व तिची वैद्यकीय माहिती घेतल्याशिवाय हार्मोन्स देणार नाही.
दुसरा मुद्दा म्हणजे गोळ्या घेतल्या तरी शरीरातल्या नैसर्गिक अंतस्रावांच्या चढउतारांप्रमाणे या गोळ्यांचे परिणाम होतात अथवा अपेक्षेप्रमाणे परिणाम होतही नाहीत. मग ऐन वेळेला हिरमोड होतो.
तिसरा मुद्दा म्हणजे या गोळ्यांचे आपल्या शरीरातील अंतस्रावांच्या ताळमेळावर विपरीत परिणाम होऊन पाळीचे चक्र बिघडू शकते.
स्वत:च्या लग्नकार्याच्या वेळी पाळी येईल या विचाराने भांबावून गेलेल्या मुलीला या सल्ल्याचा काय फायदा?
अशा मुलींसाठी तिचे डॉक्टर तिच्या शरीरास योग्य अशा गर्भनिरोधक गोळ्या देतीलच. त्याचा तिला दुहेरी फायदा होईल.
आणि एवढं सगळं करूनसुद्धा पाळी आलीच तर तिचा जोडीदार एवढीशी समजूत निश्चितच दाखवेल नाही का?

menstrual cycle
menstrual cycle 

No comments:

Post a Comment

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive